बीड-परळी येथील वर्षभर बंदावस्थेत असलेला वीज प्रकल्प आणि कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने वीजनिर्मितीवर मर्यादा आल्याने गेल्या दोन दिवसांपासून राज्याला आवश्यक वीजपुरवठयापैकी २ ते अडीच हजार मेगावॉट विजेचा तुटवडा भासू लागला आहे.
रत्नागिरी- बीड-परळी येथील वर्षभर बंदावस्थेत असलेला वीज प्रकल्प आणि कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने वीजनिर्मितीवर मर्यादा आल्याने गेल्या दोन दिवसांपासून राज्याला आवश्यक वीजपुरवठयापैकी २ ते अडीच हजार मेगावॉट विजेचा तुटवडा भासू लागला आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी अनियमित भारनियमनाला सुरुवात झाली आहे.
राज्यात यंदा कमी पडलेल्या पावसाचा पहिला फटका बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक वीज प्रकल्पाला बसला आहे. मागील वर्षीपासून हा प्रकल्प बंदावस्थेत आहे. तरीही गेले वर्षभर राज्याची विजेची गरज पूर्ण होत होती. दरम्यान, कोयना धरणातही आता केवळ ८.०८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. याचा परिणाम वीजनिर्मितीवर झाला आहे.
केंद्राकडून वीज घेऊनही राज्याची दैनंदिन पूर्तता होताना दिसत नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासूनच राज्यात अनियमित भारनियमनाला सुरुवात झाली आहे.
राज्यात केंद्र व राज्याकडून १६ हजार ५८८ मेगावॉट वीज उपलब्ध झाली होती. त्यात औष्णिक वीज प्रकल्पांमधून ५ हजार २१२ मेगावॉट वीजपुरवठा होत आहे. नाशिक येथील एकलहरे प्रकल्पातून ४५९ मेगावॉट, कोराडी प्रकल्पातून ८९४ मेगावॉट, खापरखेडा येथून ९८९ मेगावॉट, अकोलास्थित पारस येथून ३९६ मेगावॉट, चंद्रपूर येथून १५४७ मेगावॉट, तर दीपनगर भुसावळ येथून ९२८ मेगावॉट वीजपुरवठा होत आहे.
उरण येथील गॅस प्रकल्पातून ३३२ मेगावॉट विजेचे उत्पादन होत आहे. जलविद्युत प्रकल्पांपैकी घाटगर येथून १२२ मेगावॉट; तर कोयना प्रकल्पातून अवघी ४० मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे. धुळे जिल्ह्यातील साखरी येथील दोन सौरऊर्जा प्रकल्पांतून राज्यासाठी ४० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे.
राज्यातील खासगी वीज प्रकल्पांपैकी जिंदालकडून ८६२ मेगावॉट, अदानीमधून ५२० मेगावॉट, अमरावती येथील इंडियाबुलमधून ६९५ मेगावॉट, नाशिक येथील रिलायन्सच्या प्रकल्पातून ४२० मेगावॉट, वर्धा पॉवर प्लांटमधून १६२ मेगावॉट तर अन्य छोटया प्रकल्पांमधून एकत्रित १५४५ मेगावॉट अशी एकूण ४ हजार २०९ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे.
शुक्रवार संध्याकाळपर्यंत राज्याची मागणी १८ हजार ६१० मेगावॉट झाली होती. त्यामुळे उपलब्ध विजेच्या तुलनेत सुमारे २ हजार मेगावॉट विजेची तूट निर्माण झाली होती. यामुळे राज्यात इमर्जन्सी भारनियमन सुरू झाले आहे.