चांगली माणसे अचानक काळाच्या पडद्याआड कशी चालली आहेत? अंतुलेसाहेब निसर्गनियमाने वार्धक्यामुळे गेले, दत्ता खानविलकर तसेच गेले, सदाशिव अमरापूरकर, स्मिता तळवलकर ही कला क्षेत्रातील मंडळी अचानक गेलेली आहेत. आर. आर. आबांचे निधन असेच अचानक झाले आहे आणि ते महाराष्ट्राला चटका लावून गेले आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम करणारी जी काही थोडी माणसे होती, त्यातले आबा हे प्रकर्षाने महाराष्ट्राच्या लोकमानसात लोकप्रिय नेतृत्व होते. वसंतदादा पाटील यांनी जी चांगली माणसे वेचून काढली त्यात आर. आर. आबा होते.
पंचायत समितीपासून त्यांचा प्रवास सुरू झाला. जिल्हा परिषद, आमदार, मंत्री, अशा सर्व जागांवर काम करताना आबांमधला कार्यकर्ता इतका जिवंत राहिला की, आबा आबाच राहिले, ‘आबासाहेब’ झाले नाहीत. मतदारसंघात घराघरातील त्यांची हाक ‘आबा’ अशीच होती आणि महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांमध्ये आर. आर. आबा अशीच त्यांची जिव्हाळ्याची ओळख होती. ते शरद पवार यांच्या सोबत होते, तरी आणि वसंतदादांशी काँग्रेस एसचे भांडण झाले होते तरीही. आबा मंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयात जसा शरद पवारांचा फोटो लावला, तसाच त्यांच्या स्वत:च्या खुर्चीमागे वसंतदादांचाही फोटो लावला. अशी कृतज्ञता जपणारी राजकारणात फार थोडी माणसे आहेत. वसंतदादांच्या पुण्यतिथी आणि जयंतीला यशवंत हफ्ते वसंतदादांच्या पुतळ्याजवळ जो आदरांजली कार्यक्रम व्यक्त करतात, त्याला हटकून आणि हमखास येणा-या दोनच व्यक्ती असतात, एक शिवाजीराव देशमुख आणि दुसरे आर. आर. आबा. आता या १ मार्चला आबा असणार नाहीत. पण ते वसंतदादांना भेटायला स्वर्गात नक्की जातील.
मंत्री म्हणून आबांच्या कर्तृत्वात अनेक मोरपिसे खोचलेली आहेत. ‘डान्सबार बंदी’ ही गोष्ट काही सोपी नव्हती. अतिशय प्रखर असा विरोध झाल्यानंतरही आणि अनेक प्रलोभने आबांना दाखवल्यानंतरही आबा कशालाही बळी पडले नाहीत. कोटय़वधी रुपयांचा चुराडा होत असलेल्या आणि दलालांचे गल्ले भरणा-या या आधुनिक ‘दौलतजादा’ कार्यक्रमाला आबांनी बंदी घातलीच. या लेडीज बारमध्ये काम करणा-या ज्या मुली होत्या, त्या नाइलाजाने आणि पोट भरण्याकरिता तिथे येत होत्या. या मुलींना रोजगार मिळावा अशी योजनाही त्यांनी आखली होती. पण पुरुषांची मानसिकता बदलण्यात अनेक कायदेशीर अडचणी आल्या आणि आबांनी चांगल्या उद्देशाने केलेले कायदे कोर्टात टिकू शकले नाहीत. ज्या दिवशी कोर्टाचा निकाल विरोधात गेला, त्या दिवशी आबा जेवले नाहीत, हे महाराष्ट्राला माहिती नसेल. गृहमंत्री म्हणून आबांनी आपल्यापरीने खूप चांगले काम करण्याचा, निदान स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ठरवले असते तर, पाच हजार कोटींची माया ते जमा करू शकले असते. ना त्यांचा वेश बदलला, ना त्यांच्या पायात चप्पलऐवजी कधी बूट आला.
चुकून ते एकदा चीनला जायला निघाले, तर लेस असलेला बूट कसा बांधायचा हेही त्यांना माहीत नव्हते. एकदा आबांवर एक विशेष अंक काढताना मी लिहिले होते, ‘राष्ट्रवादीचा पॉन्टिंग’ आणि त्यात आबांचा फोटो टाकला होता. आबांनी फोन करून मला विचारले की, पॉन्टिंग कोण? आबांचे जे विषय होते त्याखेरीज त्यांना बाकी कशात रुची नव्हती. त्यांच्याकडे जे काम असेल ते काम ते जीव घालून करायचे, असा एक साधा सरळ कार्यकर्ता म्हणजे आबा.
गृहमंत्री असताना विधानसभेत किंवा मंत्रालयात दुपार झाली की टेबलावरच ते त्यांची पुरचुंडी सोडायचे आणि त्यातले भाकरी-पिठले जेवढे असेल ते सगळ्यांना खायला घालायचे. द्राक्षांचा मोसम सुरू झाला की, तासगावहून बिन बियांच्या द्राक्षांच्या पेटय़ाच्या पेटय़ा ते मागवायचे आणि विधानसभेत त्यांच्या कार्यालयात येणा-या प्रत्येकाला भरभरून खाऊ घालायचे.
गृहमंत्री म्हणून आबा लक्षात राहतीलच, कारण कसाबच्या हल्ल्यानंतर त्यांना आपले गृहमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यांना कसाबचा हल्ला रोखला नाही, याची खूप खंत होती. ‘बडे बडे शहरो में ऐसे चुटपुट हल्ले होते है’ असे त्यांचे अनवधानाने आलेले वाक्य त्यांच्यावर खूप टीका सहन करून गेले. पण मनाने हा माणूस खूप निर्मळ होता, स्वच्छ होता आणि काहीतरी चांगलं करावं, असं त्यांना नेहमी वाटायचं.
अलीकडे महात्मा गांधींच्या नावाने झाडू हातात घेऊन स्वच्छता अभियान सुरू करणारे अनेक आहेत. पण पंधरा वर्षापूर्वी ग्रामविकास खाते हाती आल्यानंतर आबांनी संपूर्ण महाराष्ट्रात ‘गाडगेबाबा स्वच्छता अभियान’ म्हणून जी योजना सुरू केली ती देशपातळीवर प्रसिद्ध झाली. या योजनेला गाडगेबाबांचे नाव देणे ही अत्यंत सूचकता होती. गाडगेबाबा कोणत्याही गावात गेले की रस्ते झाडायला सुरुवात करायचे. आबांच्या या योजनेत गाव साफ करण्याची सुरुवात याच पद्धतीने झाली. म्हणून अनेकदा आबांना महाराष्ट्रात ‘आधुनिक गाडगेबाबा’ असेही म्हटले गेले. तंटामुक्त गाव योजना ही कल्पनाही आबांचीच. राजकारणात कोणताच पक्ष तंटामुक्त होऊ शकला नाही, पण आबांनी अनेक गाव तंटामुक्त केले. अशा अभिनव कल्पना घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात २५-३० वर्ष वावरणारे आबा हे वामनमूर्ती होते. पण वामनाच्या पावलांनी पृथ्वी पादाक्रांत केली होती. आबांनी त्यांच्या अभिनव योजनांनी महाराष्ट्रात काही नवे पादाक्रांत केले. तंबाखूमुळे महाराष्ट्रातील राजकारण्यांचे जे नुकसान झाले आहे, त्यात आबांचाही बळी गेला. त्यांच्या कन्येने काही दिवसांपूर्वी असे जाहीर केले होते की, ‘आबांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांची प्रकृती बिघडण्याच्या निव्वळ अफवा आहेत.’ या त्यांच्या निवेदनानंतर महाराष्ट्राला खूप समाधान वाटले होते. आबा लवकर बरे होतील आणि ही वामनमूर्ती पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात वावरताना दिसेल, ही आशा खोटी ठरली. आबा गेले, महाराष्ट्राला चटका लावून गेले.
आबांना bhavpurn श्रद्धांजली!!!
आमचे आबा होते manusakichi खान