परीक्षांच्या कालावधीत बरेच विद्यार्थी आपापले ‘देव’ वाटून घेत असतात. चांगले यश मिळावे म्हणून त्यांचा हा प्रयत्न असतो. तसाच काहीसा ‘केविलवाणा’ प्रयत्न विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून केला जात असल्याचे चित्र सध्या दिसते आहे. त्यात ‘म-हाटयां’चे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रमांक पहिला लागतो. अनेक सभांची, कार्यक्रमांची सुरुवात महाराजांच्या नावे केली जाते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की..’ असे म्हटल्यावर आपसूकच ‘..जय’ अशी गगनाला भिडणारी आरोळी प्रत्येकाच्या तोंडून निघते. गेले काही दिवस निवडणुकीची धामधूम सगळीकडे सुरू आहे. प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये असणा-या ‘व्हॉट्स अॅप’प्रमाणे बरेचसे राजकीय पक्ष छत्रपती शिवरायांना आपल्या ‘ग्रुप’मध्ये सामील करून घेऊ इच्छितात आणि तसा त्यांचा प्रयत्न देखील सुरू आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात २५ वर्षानंतर स्वबळाची परीक्षा घेत लढणा-या अनेक राजकीय पक्षांचे भवितव्य पणाला लागले आहे. मुंबईसारखी आर्थिक राजधानी असलेल्या राज्यात कोकण, पश्चिम भाग आणि उत्तरेकडील प्रदेशांचे महत्त्व इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. याच महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने अनेक निवडणुका एकत्र लढवल्या. प्रामुख्याने ‘हिंदुत्वा’च्या मुद्दयावर निवडणुका लढवल्या गेल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेत नेतृत्वाची कमतरता नेहमीच दिसून आली आहे. शिवसेना योग्य नेतृत्वाअभावी चाचपडत असताना भाजपला देखील महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान असणारा गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा अनमोल हिरा अचानकपणे गमवावा लागला. त्यामुळे, आजच्या घडीला दोन्ही पक्षांमध्ये राज्याच्या भविष्याचा विचार करणारा आणि राज्याचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर करणारा नेता नाही. त्यातच, २५ र्वष कुरबुरत का होईना पण सुरू असलेला हा संसार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोडला. मैत्री संपुष्टात आली, घटस्फोट झाला आणि दोघांचेही मार्ग वेगवेगळे झाले. येथूनच आजवर छत्रपतींच्या नावावर राजकारण करून मतांचा जोगवा मागणा-या या दोन्ही पक्षांमध्ये शिवरायांची वाटणी होण्यास सुरुवात झाली. एकच मुद्दा, तो पण प्रभावी असलेला आणि ‘हुकुमाचा एक्का’ असल्याप्रमाणे दोन्ही पक्षाकडून त्यांचा वापर होऊ लागला.
संपूर्ण भारतात ‘अब की बार’चा नारा देऊन लोकसभा निवडणूक लढवणा-या भाजपने महाराष्ट्रात मराठी माणसाची मते ‘एन्कॅश’ करण्यासाठी शिवछत्रपतींच्या नावाचा वापर करण्यास सुरुवात केली. ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद’ या घोषणेचा विविध जाहिरातींतून वापर होताना दिसत आहे. शिवरायांचे नाव घेतल्यामुळे शिवसेनेतील तथाकथित शिवप्रेमींचा मात्र जळफळाट झाला. ‘अरे, हा आमचा राजा आहे. आम्ही त्याची प्रजा आहोत. आमच्या राजावर फक्त आमचाच हक्क आहे’, असे सेनेकडून ठणकवण्यात आले. त्यात भरीस-भर म्हणून आयुष्यात कधी शिवजयंती साजरी केली आहे का, असा खडा सवाल वेळ-काळ (घडय़ाळ) पाळणा-यांनी पण केला. इंजिनाचा रोख महाराजांच्या नाव प्रकरणात कमी असून तो ‘गुजराती’ ट्रॅकवर घसरला आहे. आता या शिवभक्तांकडून टीकेचा भडीमार होत असताना महाराजांना हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपने ‘शिवाजी महाराज ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही’ असे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र आजवर शिवरायांशी (प्रत्यक्ष कृतीनुसार) काडीचाही संबंध नसलेल्यांकडून असले युक्तिवाद ऐकून मराठमोळी जनता मात्र व्यथित झाली आहे.
त्या जनतेमधून एक आवाज उमटतो आहे.. ‘‘अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ बोलणा-यांनो शिवाजी महाराज ही काय प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? आजही ‘जय भवानी, जय शिवाजी’ या जयघोषामुळे रक्त उसळून येते. आमच्या रक्तातच शिवाजी आहे. तुमच्या सोयीनुसार वापरात येणा-या कपडयांसारखा नाही आमचा शिवाजी. आज महाराज हयात असते तर कसं सहन केलं असत त्यांनी? स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन उत्तम प्रशासन आणणारे महाराज, आज सत्तेच्या हव्यासापोटी सुरू असलेल्या या गलिच्छ राजकारणामुळे व्यथित झाले नसते तर नवलच! एक पक्ष शिवछत्रपतींच्या आशीर्वादाला सोबत घेऊन खोटेनाटे दावे करत आहे, तर त्याला दुस-याने अफझल खानाची उपमा दिली आहे. समोरच्याला अफझल खान समजून स्वत:ला ‘शिवाजी’ समजण्याचा त्यांचा प्रयत्न तर आणखीनच हास्यास्पद आहे. ‘मुख्यमंत्री’पदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून बेताल बडबड करणा-यांनी आता लक्षात घ्यावे की, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश वेगळे होते. त्याची पुनरावृत्ती होईल या भ्रमात राहू नये.’’
शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत. ते या राष्ट्राचे दैवत आहेत. त्यांचा राजकीय पातळीवर अशा पद्धतीने वापर होणे हे कोणाही स्वाभिमानी देशभक्ताला आवडणारे नाही, पटणारे नाही आणि पचणारेही नाही. महाराष्ट्राची जनता ही पुरोगामी विचारांची आहे, संस्कृतीची जाणीव असणारी आहे, पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारी आहे. महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि सध्या महाराष्ट्राला देखील ‘स्वच्छ कारभार आणि स्वबळा’चे स्वराज्य हवे आहे. सुरक्षित, समतोल, समृद्ध असलेले राज्य हवे आहे. महाराजांच्या नावाचा वापर करून आजवर मागितलेल्या मतांवर जगलेल्यांनी काय केले हे आज सर्वासमोर आहेच. त्यामुळे, पुन्हा एकदा शिवरायांवरून राजकारण खेळणा-यांशी मायमराठी जनता काय करते, हे १९ ऑक्टोबरलाच स्पष्ट होईल!