जर कुणी शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करत असेल, तर यापुढे त्याची गय केली जाणार नाही, त्यांना सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे.
नवी दिल्ली- सीमेची सुरक्षा करणे हे भारतीय सैन्याचे काम असून सैन्य ते करेलच, मात्र जर कुणी शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करत असेल, तर यापुढे त्याची गय केली जाणार नाही, त्यांना सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या ६९व्या सेना दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सोशल मीडियावरून तक्रारी करणा-या जवानांचेही त्यांनी कान उपटले.
‘भारतीय सैन्य कधीही चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम असून देशाच्या सीमेवर शांतता राखणे हे सैन्याचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र त्यातही जर कुणी वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही’, असे रावत म्हणाले. यावेळी सोशल मीडियावरून तक्रारी करणा-या जवानांनाही त्यांनी चांगलेच सुनावले.
अशा प्रकारे तक्रारी केल्याने सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचे मनोधर्य खच्ची होऊ शकते, त्यामुळे सोशल मीडियावरून तक्रारी करणा-यांवर यापुढे कडक कारवाई केली जाईल, अशी ताकीद त्यांनी दिली. वरिष्ठ अधिका-यांकडे तक्रार करा, तिथे समाधान न झाल्यास थेट माझ्याकडे तक्रार करा, त्याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, मात्र अशा प्रकारे सोशल मीडियावर तक्रारी करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमात त्यांनी अमर जवान ज्योतीवर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच परेडची मानवंदना स्वीकारून शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला.