गीत-संगीताचे अनेक लाइव्ह शो करून अशोक हांडे यांनी रसिकांना ख-या अर्थाने ‘आवाज की दुनिया’मध्ये नेलं आहे. ‘मनचाहे गीत’ गात त्यांना ‘गाने सुहाने’चा प्रवास घडवला आहे. अभिजात संगीतातले ‘माणिक मोती’ वेचून रसिकांच्या डोळ्यांत ‘गंगा जमुना’ उभ्या केल्यात. सुरांची ‘अमृतलता’ बांधत ‘मधुरबाला’ला ‘आदरांजली’ वाहिली आहे. हे सगळं करताना त्यांनी आपला ‘मराठी बाणा’ जपला आहे आणि ‘आझादी ५०’ सारख्या कार्यक्रमातून राष्ट्रीय बाणाही दाखवला आहे. आकडेवारीच सांगायची तर त्यांनी पंधरा वेगवेगळे शो करून त्याचे साडेसात हजारहून अधिक प्रयोग केलेत. लोककला-लोकसंगीताचे ते चांगले अभ्यासक असलेले, मराठी कवितांचा नाद असलेले अशोक हांडे संकल्पना, गायन, अभिनय, दिग्दर्शन, सूत्रसंचालन, कलादिग्दर्शन अशा अनेक प्रांतांत लीलया वावरतात. ‘प्रहार मित्र’ उपक्रमाच्या पहिल्या पुष्पात अष्टपैलू अशोक हांडे यांनी मांडलेला त्यांच्या कारकिर्दीचा हा ‘चौरंग’.
अशोक हांडेंमधल्या कलाकाराचा जन्म कसा झाला?
पुणे जिल्ह्यातील उमरज हे माझं गाव. नारायणगावपासून आमचं गाव केवळ सहा किलोमीटर अंतरावर. माझं आजोळही गावापासून चार किलोमीटरवर असलेलं काळवाडी. आमची आई जात्यावर बसून गाणी गायची. वडील गायकच होते. त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार होते. आमच्या गावात लळिताची परंपरा होती. त्याचं प्रमुखपद आमच्या घरात होतं. लळिताच्या रिहर्सल आमच्या घरीच व्हायच्या. आमच्या गावात नवरात्रात देवीचा उत्सव असतो. त्यावेळी निरनिराळी कीर्तनं व्हायची. शेवटच्या दिवशी आमच्या गावक-यांनी बसवलेलं नाटक व्हायचं. असं सगळं वातावरण लहानपणी माझ्या आजूबाजूला होतं. माझं जास्त बालपण हे आजोळी गेलं. बलुतेदारी वगैरे असलेलं हे आदर्श गाव होतं. आजोबांच्या मुखामध्ये सतत पांडुरंग हरी असायचं. या काळवाडी गावात एक थिएटरही होतं. तिथे चैत्रात तमाशे व्हायचे. या काळवाडीत गोष्टीवेल्हाळ माणसंही भरपूर असायची. त्यामुळे तिकडे भरपूर टाइमपास व्हायचा. तिकडे माझ्यावर भजन-कीर्तन, काकडआरतीच्या सुरापासून भजनाच्या बारीपर्यंत सगळे संस्कार माझ्याबरोबर झाले. गावी असताना माझ्या आजूबाजूला नांदणा-या लोकसंस्कृती, लोकरहाटीचा प्रभाव माझ्यावर पडला.
तिथून मी लहान असतानाच आम्ही मुंबईला लालबागच्या रंगारी बदक चाळीत आलो. इथेही तसंच वातावरण होतं. आमच्या या चाळीत अठरापगड जातीचे लोक. चाळीत सतत काहीतरी चाललेलं असायचं. कुठे बाल्या डान्स चाललेला असायचा, तर कुठे शिवजयंती किंवा आंबेडकर जयंती साजरी होत असायची. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यामुळे लाऊडस्पीकर सतत चालू असायचा आणि त्यावर लागलेली गाणी आपोआप पाठ व्हायची. या सगळ्यांमुळे अधिकाधिक समृद्ध होत गेलो. लहान वयात सगळंच मला आपलं वाटायचं. मग ती मालवणी भाषा असो की, घाटी संस्कृती असो, प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्टय़ असायचं म्हणजे कोकणातला भजनातला चकवा वेगळा, घाटावरच्या भजनातले टाळ वेगळे. या चाळीत दशावताराचे खेळ व्हायचे आणि रामलिलाही व्हायची. निजामपुरकर बुवांचं दहा दिवस कीर्तन असायचं. तिथे मला शाहीर अमरशेख ऐकायला मिळाले. आचार्य अत्रेंचं भाषण मला अजून आठवतंय. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेचं व्याख्यानही मी ऐकलंय. तिथे सादर होणारी नाटकं तर अचाट असायची. ‘जल्लाद’ नावाच्या नाटकाचं नेपथ्य असं होतं की, राक्षसाच्या तोंडातून नायिका बाहेर यायची. ही कल्पकता अफाट होती. त्यात व्यावसायिकता नव्हती, पण आत्मीयता होती. या सगळ्या वातावरणाने माझ्यातील कलाकाराला जन्माला घातलं नसतं तरच नवल. आता मी मराठी बाणात जे करतोय, ते सगळं मी या चाळीतच जगलोय. मी ‘मराठी बाणा’त वेगळं काही केलेलं नाही.
लोककलांचं वातावरण तुमच्या अवतीभवती होतं, पण कवितांची आवड कशी लागली?
शाळेत असल्यापासून मला कवितांची आवड होती. मी खणखणीत आवाजात कविता बोलायचो. काही कवितांना मी थोडय़ाफार चाली लावायचो. मला वृत्त-छंद येत असल्यामुळे चाली आपोआपच सुचायच्या. मी कॉलेजमध्ये सायन्सच्या पहिल्या वर्षाला असताना एक घटना घडली. मला रस्त्यावर शंभर रुपयांची नोट सापडली. ती मी खिशात ठेवली, पण ती मला बोचायला लागली. रात्रभर मला झोप लागली नाही. आपल्यावर काही बालंट येईल, या भीतीने मी सकाळी वडिलांना याबद्दल सांगितलं. त्यांनी मला सांगितलं, ‘हे शंभर रुपये मी तुझ्याकडून घेतले तर मला त्यात आणखी शंभर रुपये टाकावे लागतील. कारण सापडलेल्या धनामध्ये तेवढेच पैसे टाकून धर्म करायचा असतो, परंतु आता माझ्याकडे शंभर रुपये नाहीत. तेव्हा तूच ते ठेव आणि तुझ्या बुद्धीला सुचेल तसे ते खर्च कर,’ असं सांगून त्यांनी मला धर्म आणि कर्तव्यही शिकवलं. मी खूप विचार केला आणि दादरला आयडियल बुक डेपोत गेलो. तिथे कवितांची पुस्तकं खरेदी केली. दीड-पावणेतीन रुपयांना कुसुमाग्रज, ना. घ, देशपांडे, मर्ढेकर, ना. धो. महानोर यांची पुस्तकं मिळाली. खूप पुस्तकं घेतली, तरी पैसे संपेनात. मग मी मॅजेस्टिकमध्ये गेलो. तिथे बा. भ. बोरकरांची पुस्तकं मिळाली. ती पुस्तकं घेऊन मी घरी आलो आणि मी ती वाचण्याचा सपाटाच लावला. या कविता वाचून मला एवढा आनंद मिळाला की, त्याचं वर्णन करणं अवघड आहे
गायनाच्या, लाइव्ह शोच्या क्षेत्रात यायचं, असं कधी ठरवलं होतं का?
असं काही ठरवलं नव्हतं. पण अभिनय, गायनाची मला लहानपणापासून आवड होती. शाळेत असताना मी शाहीर साबळेंचं ‘यमराज्यात एक रात्र’, दादा कोंडकेंचं ‘विच्छा माझी पुरी करा’ अशी नाटकं केली होती. मी भारुडात कृष्णाचं, राधेचं काम करायचो. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्य गायन स्पर्धा, अभिनय स्पर्धा सगळ्यात मी भाग घ्यायचो. माझ्या भावाची ‘मीलन कला झंकार’ नावाची गायन पार्टी होती. त्यात मी इयत्ता सहावीला असताना ‘ए भाय जरा देखके चलो..’ हे गाणं बोलायचो. माझ्यावर पैशाचा पाऊस पडायचा. ‘मेरे यार शब्बा खेर..’ या गाण्यावर डान्सही करायचो. मी लिटल वंडरच होतो. मी गायचो, नाचायचो आणि अभिनयही करायचो. १९८० मध्ये मी मुलुंडला गेलो. तिथे आमच्या घराच्या खाली बसस्टॉपवर आमचा अड्डा जमला. मग एकांकिका वगैरे सुरू झाल्या. कॉलेजमध्ये गाण्याचे कार्यक्रम करतच होतो. ‘मंगलगाणी दंगलगाणी’ १९७७ साली मी कॉलेजमध्येच केला. तिथे मला कळलं की, आपल्या लोकसंगीतात दम आहे. ‘काठीनं घोंगडं घेऊन द्या की रं’ किंवा ‘अग२ग२ग२ग२ विंचू चावला’ ही आपली पॉप आणि रॉकच आहेत. खरं तर त्याहून भारी आहे. मी त्यावेळी महंमद रफी, किशोर कुमारची गाणीही सतत बोलत असायचो. पण मी ट्रेन्ड गायक नव्हतो. किंबहुना गाणं शिकायचं असतं, हेही माहीत नव्हतं. मी ‘मंगलगाणी..’ करेपर्यंत मला काळी पाच कशाला म्हणतात, तेही माहीत नव्हतं. मी पिकनिकला जायचो, गाणी गायचो. धम्माल करायचो. आम्ही पिकनिकला जायचो, तेव्हा पिकनिकला आलेले इतरही माझी गाणी ऐकत राहायचे. पिकनिकमध्ये मी स्टार होतो. त्यामुळे पिकनिक कुठल्याही वर्गाची असू दे, मला खास बोलावून घेऊन जायचे. मी गाण्याबरोबर टेबल टेनिस, कबड्डी, क्रिकेट, कॅरमच्या खेळातही निपुण होतो. कॅरममध्ये पैजेचा गेम खेळून तर दोन-पाच रुपयांची कमाईही करायचो. तोपर्यंत पुढे गाण्याचे कार्यक्रम वगैरे करायचेत असं काही मनात नव्हतं. आम्ही कॉलेजमध्ये असताना आदिवासी भागात जायचो, तेव्हा त्यांना जमवण्यासाठी थोडीशी गाणी वगैरे करायचो. मग तिथे आम्ही एक लोकनृत्य स्पर्धाही आयोजित केली होती. त्यात पहिल्या आलेल्या ग्रुपचा आम्ही मुंबईत कार्यक्रम करायचा ठरवलं. यासाठी आम्ही लाला लजपतराय कॉलेजचं ऑडिटोरियम घेतलं. हा कार्यक्रम झाल्यानंतर कुणीतरी मला सुचवलं, तुम्ही या कार्यक्रमात सादर केलीत तशा गाण्यांचा कार्यक्रम करा. मग त्यात काव्यसंगीताचा इतिहास वगैरे टाकून आम्ही ‘पसायदान ते कसायदान’ तयार केला. आमच्या मुलुंडच्या ग्रुपमध्ये कुणाकडे सत्यानारायणाची पूजा असेल तर किंवा कुणाकडे गणेशोत्सवात तो कार्यक्रम कर, असं चालू होतं. एकदा नंदू लबडे नावाच्या माझ्या कलाकार मित्राच्या घरी कार्यक्रम सादर करत होतो. त्यावेळी आनंद दिघे तिकडे आले. सगळ्यांना वाटत होतं की, मी कार्यक्रम थांबवावा, पण दिघे बाहेरच बसले आणि त्यांनी सगळ्यांना चूप राहायला सांगितलं. त्यांनी सगळा कार्यक्रम बाहेर बसून ऐकला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्यानंतर त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाले. यातून कार्यक्रमाची जाहिरात होत गेली.
‘चौरंग’ या संस्थेची स्थापना तुम्ही कधी केलीत?
कॉलेजमध्ये असताना मी ‘मंगलगाणी दंगलगाणी’चे व्यावसायिक प्रयोग करत होतो. ‘चौरंग’ मी त्याच सुमारास स्थापन केली. ही गोष्ट १९८७ची. त्यावेळी होणा-या ‘नाटय़दर्पण रजनी’मध्ये ‘मंगलगाणी दंगलगाणी’चा खेळ ठेवला होता. ती रजनी झाल्यावर दुस-या-तिस-या दिवशी ‘लोकसत्ता’मध्ये पद्माकर कुलकर्णी यांनी आपल्या वृत्तांतामध्ये लिहिलं होतं, या वर्षीच्या नाटय़दर्पण रजनीचे फलीत अशोक हांडे हा कलाकार. त्याचा केवढा मोठा परिणाम झाला. खरं तर ते अतिशय खडूस पत्रकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. त्यांनी केलेल्या कौतुकामुळे मात्र कार्यक्रमाला खूप प्रसिद्धी मिळाली आणि तो प्रोफेशनल झाला. त्यावेळी ‘झपाटा’ ऑर्केस्ट्रावाल्यांनी माझ्याकडून तो घेतला होता, परंतु त्यांना तो नीट करता आला नाही. माझ्याकडून पैसे घेतले. नाव स्वत:चं लावलं आणि चालवलाही नाही. शेवटी त्यांनी मला सांगितलं की, ‘आम्हाला नाही चालवता येत. तुम्हाला चालवायचा तर तुम्ही चालवा.’ त्यांनी त्यांचे एक लाख रुपये या कार्यक्रमात गुंतल्याचं सांगितलं. त्यांना लाख रुपये दिले आणि मी कार्यक्रम करायला सुरुवात केली. खरं तर त्यांच्यामुळेच मी निर्माता म्हणून उभा राहिलो. कारण ‘तुम्ही कलाकार असाल तरी कार्यक्रम चालवणं सोपं नाही,’ असं त्यांनी मला सांगितलं. मी ते आव्हान म्हणून स्वीकारलं. त्यानंतर मी हा कार्यक्रम चालवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या. संक्रातीला महिलांना वाणं वाटली. कधी गजरे वाटले. पुण्यात जाहिरात केली की, कार्यक्रम न आवडल्यास तिकिटाचे सगळे पैसे परत. एकाही तिकिटाचे पैसे परत गेले नाहीत. तरीही ‘मंगलगाणी..’ म्हणावा तसा चालत नव्हता. नंतर आम्हाला लंडनला शो करण्याचं आमंत्रण मिळालं. तिथे आम्ही कसेबसे पैसे गोळा करून स्वखर्चाने गेलो. त्यात आम्हाला काही हजारांचं नुकसान झालं, परंतु तिथल्या मराठी माणसांसाठी आम्ही प्रयोग केले. तिकडे कार्यक्रम करताना ‘ने मजसी ने परत मातृभूमीला..’ सादर करत असू, तेव्हा प्रेक्षकांचे डोळे पाणावत. लंडनमध्ये असतानाच आम्ही तू दूरदूर तेथे, हुरहुर मात्र येथे’ अशी जाहिरात मुंबईतल्या वर्तमानपत्रात केली. त्यानंतर आम्ही भारतात आल्यावर ठाण्यात झालेला पहिलाच शो हाऊसफुल्ल झाला. आपल्याकडे काय आहे की, एखादी गोष्ट आपली असली की, तिची कोणी किंमत करत नाही. ती बाहेरून आली की, लोक डोक्यावर घेतात.
तुम्ही तुमच्या कार्यक्रमांच्या जाहिराती नेहमीच कल्पकतेने करता?
आम्ही ‘मंगलगाणी..’ची जाहिरात अतिशय वेगळ्या पद्धतीने केली. त्यात मी शब्दांचा खेळ करत असे. ‘आवाज की दुनिया’ची जाहिरात मी एखाद्या व्यक्तीचं छायाचित्रं आणि एक ओळ अशी केली. म्हणजे जाहिरातीत वर अमिताभचा फोटो आणि त्याखाली ‘एकमेव’ हा शब्द. वर नूतनचा फोटो, खाली ‘टवटवीत’ हा शब्द. वहिदा रहेमानच्या फोटोखाली ‘खानदानी’ असं शीर्षक. ‘भारतीय संस्कृतीचा मंगल स्वर’ आणि वर लता मंगेशकर यांचा फोटो. थोडक्यात ‘आवाज की दुनिया’ आणि जाहिरातीतील फोटोसाठी एकच कॉमन शीर्षक, जे दोघांनाही लागू होतं. या जाहिरातींमुळे कार्यक्रमांविषयी बरंच कुतूहल निर्माण झालं. एका जाहिरातीत मदा-याचं चित्र टाकून लिहिलं होतं, खरा ऑर्केस्ट्रावाला. हे सगळं मी माझ्या लालबागच्या ‘विद्यापीठा’त असताना पाहिलं होतं, शिकलो होतो. तेच हे संचित होतं.
आजपर्यंत तुम्ही किती कार्यक्रम केलेत आणि त्यांचे किती ‘लाइव्ह शो’ झालेत?
मी जवळजवळ पंधरा शो केले. त्या सगळ्यांचे मिळून साडेसात हजार प्रयोग झाले असतील. ‘मराठी बाणा’चे १६२९, ‘मंगलगाणी दंगलगाणी’चे १८४०,‘आवाज की दुनिया’चे १५५० प्रयोग झाले म्हणजे पाच-साडेपाच हजार प्रयोग या तीन कार्यक्रमांचे झाले. या व्यतिरिक्तही मी काही कार्यक्रम केले. २००० साली चित्रपट महोत्सव केला. टी-ट्वेंटी वर्ल्डकपवरही मी कार्यक्रम केला. वानखेडे स्टेडियमवर मी सहा तास कार्यक्रम केला. ‘माणिक मोती’, ‘मधुरबाला’, ‘अमृतलता’, ‘गंगा जमुना’ हे अनुक्रमे माणिक वर्मा, लता मंगेशकर, मधुबाला आणि पी. सावळाराम यांच्यावर चरित्रात्मक कार्यक्रम केले. ‘मी यशवंत’मधून यशवंतराव चव्हाण यांचं, ‘आनंदयात्री’मधून पु. ल. देशपांडे यांचं, ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’मधून आचार्य अत्रे यांचं जीवन सुरेलरीत्या उलगडून दाखवलं.
तुमची कार्यक्रम बसवण्याची काय पद्धत असते?
सगळ्यात संकल्पना महत्त्वाची. त्यानंतर रिसर्च. रिसर्चसाठी प्रचंड संयम हवा. मग संकल्पनेचा कल्पनाविलास, लेखक म्हणून सगळ्या शक्यतांचा विचार येतो. सरतेशेवटी एडिटिंग. ते करताना मी कर्दनकाळ असतो. अर्थात, प्रत्येक कार्यक्रमाची स्वतंत्र कहाणी आहे. ‘अमृतलता’ या कार्यक्रमांचंच उदाहरण. लताबाईंच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एक रिमिक्सचा कार्यक्रम त्यांच्या पुतण्यानेच सादर केला होता. तो मला आवडला नाही. मग मी विचार केला की, आपण एक चांगला कार्यक्रम करू. लताबाईंच्या पंचाहत्तरीनिमित्त आपण त्यांची ७५ गाणी बसवू. मग आम्ही त्यांच्या ५ हजार गाण्यांतून ७५ गाणी काढण्यासाठी आधी अडीच हजार गाणी निवडली. मग आम्ही पंधराशे गाण्यांची प्रत्यक्ष रिहर्सल केली. मग त्यातून हजारवर आलो. मग आणखी पाचशे काढली. सरतेशेवटी अडीचशे गाण्यावर आल्यावर आमच्यात मारमारा व्हायची वेळ आली. हे गाणं हवं की, दुसरं? नौशादची, सी. रामचंद्रची तीनच गाणी घ्यायची, मग त्यातून ते दिसले पाहिजेत अशीच ती गाणी असायला हवीत. पु. ल. देशपांडेचं सगळं जीवन आपण दाखवलं. त्यासाठी आम्ही त्यांची सगळी जुनी गाणी शोधली. चरित्रात्मक कार्यक्रम असेल तर पहिल्यांदा त्या माणसाची स्टोरी, त्या विषयाचा अभ्यास करून स्क्रिप्ट लिहायची. ‘आवाज की दुनिया’साठी मी काय रिसर्च केला तर काव्य कुठून आलं? तर क्रौंच पक्ष्याच्या वधातून वाल्मिकीने काव्य लिहिलं. मराठीत ते कधी आलं तर ज्ञानेश्वरांचं पसायदान, त्याच्या आधी चक्रधर स्वामी, चामुंडाराजाचा शिलालेख. ही सगळी रेंज बघायची, मग गुंफण करायची. ‘आवाज की दुनिया’ तर आम्ही पन्नास दिवसांत केला. कोलकात्यात ‘संगीत कला मंदिर’ ही मोठी संस्था आहे. ती त्यांना हवे तेच शो घेते. १९९६ साली तिथे ‘आवाज की दुनिया’ केल्यावर त्यांनी सांगितलं, पुढच्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यावर कार्यक्रम करा. त्यावेळी आपल्या स्वातंत्र्याचा पन्नासावा वर्धापनदिन होता. तो आम्ही पार विसरून गेलो. १९९७ च्या १९ जूनला त्यांच्याकडून फोन आला की, तुम्ही कुठला कार्यक्रम करणार आहात? त्यानंतर सुरुवात करून १५ ऑगस्टपर्यंत आम्ही ‘आझादी ५०’ कार्यक्रम बसवला. त्यासाठी पाच हजार वर्षाचा इतिहास मी लिहून काढला आहे. तो एकदम एक्सायटिंग झाला. एकेक लाख प्रेक्षकांसमोर मी तो कार्यक्रम केला. आता‘ माणिक मोती’ कार्यक्रमाची गोष्ट सांगतो. ७ एप्रिल या तारखेला एकदा भारती आचरेकर माझ्याकडे आली. त्याच्या आधी तिचा मला फोन आला होता की, माझं तुझ्याकडे काम आहे. एप्रिल महिन्यात आमचा आंब्याचा सीझन असतो, पण त्या वर्षी सुमारास ट्रकवाल्यांचा संप सुरू होता. म्हणून मी ‘चौरंग’च्या कार्यालयात बसलो होतो. भारतीला फोन करून तिथे बोलावलं. ती म्हणाली, ‘मी लगेच येते.’ तोपर्यंत मी कागदावर काही खरडलं होतं. ‘माणिक मोती’ कार्यक्रमाच्या सेटचा तो कच्चा आराखडा होता. अगदी शीर्षकासहित. तो मी भारतीला दाखवत म्हटलं, ‘तुझं माझ्याकडे हेच काम आहे का?’ ते पाहून ती अगदी रडायलाच लागली. ‘तुला कसं कळलं?’ तिने विचारलं. मी म्हटलं, ‘माणिकताई गेल्या म्हणजे त्यांच्यावर कार्यक्रम व्हावा, अशी तुझी इच्छा असणार हे मी ओळखलं.’ त्यानंतर मी कामाला लागलो, पण त्याच वेळी आमचा आंब्याचा सीझन आला. मी बिझी झालो. मग मी माणिकताईंची गाणी गाडीत ऐकायचो. तशी मला ती पाठ होती. मग त्याची लाइव्ह स्टोरी कर, पुण्याला जा, शूटिंग कर, माणिक वर्मा तयार कर, ती लहानपणी कशी होती, किशोरी आमोणकरची मुलाखत हे सगळं केलं. किशोरी आमोणकर पडद्यावरून स्टेजवरील भक्तीशी बोलताहेत, असा अगदी वेगळा प्रयोग आम्ही त्यावेळी केला होता. त्याचं शूटिंग अक्षरश: जमिनीवर झोपून केलं. कार्यक्रमात ते एवढं छान व्हायचं की, प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करायचे. ‘मराठी बाणा’ तर मी आठ दिवसांत बसवलाय. ‘आवाज की दुनिया’ला एक वर्ष लागलं. ‘अत्रे अत्रे..’ एक महिन्यात बसवलं. अत्रेंच्या कार्यक्रमासाठी मी खूप पुस्तकं वाचली. ती वाचून त्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही, हे ठरवलं. तसंच ‘आझादी ५०’साठी मी सगळा इतिहास वाचून काढला. अगदी आदिमानव कुठल्या काळात आला, समाज म्हणून तो कधी व कसा विकसित झाला, संस्कृती कशी जन्माला आली, पहिली स्वातंत्र्याची लढाई कुणी केली, वगैरेचा अभ्यास करण्यासाठी मी मेसोपोटेमियन संस्कृतीपासून भारतीय संस्कृतीपर्यंत सगळं वाचून काढलं, तर ‘मंगलगाणी..’ची पसायदानापासून कसायदानपर्यंत अशीच थीम होती. १९७८ साली पु. ल. देशपांडे यांचं ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक आलं. त्यात ‘आता पैशात्मकें देवे, येणे वाग्यज्ञें तोषावें, तोषोनि मज द्यावें, कसायदान हे..’ असं होतं. त्यावरून मला ‘पसायदान ते कसायदान’ सुचलं.
तुमच्या कुठल्या कार्यक्रमाला आजवर सगळ्यात मोठी दाद मिळाली आहे आणि ती कोणाकडून?
अटलबिहारी वाजपेयी आणि हेमा मालिनी यांनी दिलेली दाद मोठी वाटते. अटलबिहारी वाजपेयींनी तर कार्यक्रम झाल्यावर मला जेवायला बाजूला बसवलं होतं. ‘मंगलगाणी..’ बघून सुधीर फडके तर अक्षरश: भारावून गेले. भाषणात ते म्हणाले की, लाइव्ह शो करणं किती कठीण असतं हे मी गीतरामायणाचे १४०० प्रयोग केल्यावर म्हणतोय. हा माणूस हिंदीत गेला तर कहर करेल. ‘मराठी बाणा’ला तर अनेकांनी दाद दिली.
तुम्ही हिंदी कार्यक्रमही अनेक केलेत?
आम्ही ‘दंगलगाणी’ घेऊन लंडनला गेलो होतो तेव्हा तिथल्या अमराठी लोकांकडून कार्यक्रम करण्याची मागणी येऊ लागली. त्यांना मराठी कार्यक्रम नव्हे तर हिंदी कार्यक्रम हवा होता. मग आम्ही इथून तिथून गाणी घेऊन, काही आम्हाला माहिती असलेली गाणी निवडून ‘मनचाहे गीत’ या नावाने हिंदी कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही एक दानपेटी ठेवली होती. कार्यक्रम संपल्यावर आम्ही रक्कम मोजली तर पेटीत सहाशे पौंड जमा झाले होते. ‘मंगलगाणी’चे आम्हाला साठ पौंड मिळायचे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, हिंदीत पैसा आहे.
तुम्ही मधुबाला, लता मंगेश्कर, पी. सावळाराम यांच्यावरील चरित्रात्मक कार्यक्रमाबरोबर आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यावरही सांगीतिक कार्यक्रम केलेत. हे काम कितपत अवघड होतं?
अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या कार्यक्रमांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांनी लिहिलेल्याच काही गाण्यांचा आम्ही वापर केला, परंतु यशवंतराव चव्हाणांच्या कार्यक्रमासाठी मात्र आम्ही इतरांची गाणी वापरली. उदा. संथ वाहते कृष्णामाई, यशवंत हो, जयवंत हो, माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू वगैरे. यशवंत कार्यक्रमासाठी गेट-वे ऑफ इंडिया येथे आम्ही दीडशे फुटांचा तीन मजली स्टेज उभारला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो फिरतो. म्हणजे यशवंतरावांचं ऑफिस, तेच त्यांचं घर होतं, तोच त्यांचा बंगला होतो. एका बाजूला सह्याद्री, दुस-या बाजूला हिमालय असा देखावा होता. मी पहिल्या मजल्यावर निवेदन करत होतो. खाली यशवंतरावांचा अभिनय कलाकार आपली भूमिका करत होता. हा कार्यक्रम पाहून राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी शिष्टाचार मोडून मला स्वत: पुष्पगुच्छ दिला. खूप मोठा सन्मान होता तो.
तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, सूत्रसंचालन, कलादिग्दर्शन, गायन, अभिनय, व्यवस्थापन अशा सगळ्या भूमिका एका वेळी करता. हे कसं काय जमतं?
गरज हे यामागचं एकमेव कारण. मी जर ‘मंगलगाणी..’चं स्क्रिप्ट घेऊन बाजारात गेलो असतो तर मला कुणी उभं केलं नसतं. ‘आझादी ५०’ तर कुणीच केलं नसतं. म्हणून मी त्यांची निर्मिती केली. मी सगळं करतो. लायटिंग, साउंड इम्प्रुव्हायझेशन करतो. माझ्या सगळ्या कार्यक्रमाचं कलादिग्दर्शन मीच करतो. कारण गरजेप्रमाणे ते होणं आवश्यक असतं. कारण मला माहितीय, गरजेप्रमाणे किती जागा लागते. एकाच आर्चमध्ये मी त्याला मशीद करतो आणि देऊळही करतो. ‘आझादी ५०’ मध्ये शिवाजी जिथून येतो तिथूनच औरंगजेबही येतो.
तुम्ही पार्श्वगायन आणि जाहिरातीतही काम केलंय. त्यात तुम्ही रमला नाहीत?
भरपूर सिनेमांसाठी मी पार्श्वगायन केलं लक्ष्मीकांत बेर्डेसाठी केलं. अशोक पत्की, अनिल मोहिले अशा ब-याच संगीतकारांसाठी मी काम केलं. काही एकांकिकांना संगीतही दिलंय. मी संगीत दिलेल्या आंब्याच्या एका फ्लोटला पारितोषिकही मिळालं. मी अनेक जिंगल्सही केल्यात. त्यात रमलो नाही, असं नाही.
एवढे शो केल्यावर तुम्हाला अजूनही एखादा शो करायचा राहिलाय का, असं मनात येतं?
१९९८ साली मी अमेरिकेला गेलो तेव्हा फँटम ऑफ द ऑपेरासारखी काही नाटकं बघितली. त्यावेळी माझ्या डोक्यात आलं की, असं एखादं ओपन थिएटर किंवा संकुल मला मिळालं तर तिथे मी माझं विश्व उभं करेन. लोक ते बघायला तिथे येतील. हे माझं स्वप्न आहे.