गेल्या काही वर्षात पुण्याने मराठी सिने-नाटय़सृष्टीला अनेक चांगले कलाकार दिले आहेत. निखिल रत्नपारखी हा त्यातलाच एक. जाहिरात क्षेत्रातून करिअर सुरू करून तो सिनेमा-टीव्ही सीरियलमध्ये आला आणि तिथून त्याने व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकलं. एक प्रकारे उलटा प्रवासच केलेल्या निखिलचं पहिलं वैशिष्टय म्हणजे या चारही माध्यमांत तो लिलया वावरतो आणि दुसरं वैशिष्टय असं की, तो अभिनय, लेखन, दिग्दर्शन यातलं काहीही किंवा हे सगळं एका वेळीही करू शकतो. त्याने लिहिलेलं, अभिनित आणि दिग्दर्शित केलेलं ‘टॉम आणि जेरी’ हे पहिलं नाटक हिट ठरलं. सध्या त्याचं ‘बेगम मेमरी आठवण गुलाम’ हे दुसरं नाटकही चर्चेत आहे. या केवळ दोनच नाटकांनी निखिलला आजच्या पिढीच्या ‘स्मार्ट’ नाटककारांमध्ये नेऊन बसवलं आहे. जाहिरात, चित्रपट, मालिका आणि रंगभूमी या चार प्रांतांत लेखन-अभिनय-दिग्दर्शन या तीन अंगांनी केलेला आपला प्रवास तो उलगडून सांगतो, तेव्हा थक्क व्हायला होतं.
कुठलीही कला एकतर उपजत असेल किंवा आजूबाजूला तसं वातावरण असेल तरच कलाकारात येते. तुमच्या बाबतीत काय झालं?
> मी मुळचा पुण्याचा. मध्यमवर्गीय घरातला. आमच्या घरातलं कुणीच या क्षेत्रात नव्हतं, पण अभिनयाची कला माझ्यात उपजत होती, असं मला वाटतं. नाटकाशी माझा संबंध मी प्राथमिक शाळेत असल्यापासून आला होता. त्यावेळी मी शाळेच्या नाटकांत काम केलं. त्यानंतर कॉलेजला असताना मी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतही नाटकं केली आणि १९९३ साली आम्ही केशवराव दाते पुरस्कारही जिंकला होता. मग मी ‘समन्वय’ संस्थेतर्फेही पुण्यात नाटकं केली. ही पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण खरं सांगायचं तर मी व्यवसाय म्हणून कधी अभिनय करेन, असं मला कधीच वाटलं नव्हतं. अगदी मी पुण्याहून मुंबईला आलो तेव्हाही माझ्या डोक्यात असा काही विचार नव्हता. कारण मी मूळचा कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि जाहिरात हा विषय घेऊनच ग्रॅज्युएट झालोय. त्यामुळे जाहिरात क्षेत्र माझं आवडतं होतं, पण मुंबईत आल्यावर जाहिरातीच्या क्षेत्रात काम करत असताना हा वेगळा प्रवास सुरू झाला.
पण तुमचा पुणे ते मुंबई प्रवास कसा झाला?
> खरं तर मी परदेशी चाललो होतो. दुबईत एका जाहिरात एजन्सीत मला काम मिळालं होतं, पण त्याच्या आधी कधी मी एवढया मोठया स्केलवर काम केलं नव्हतं. म्हणून मी मुंबईत आलो. हेतू हा होता की, या क्षेत्रात थोडया मोठया स्केलवर काम करावं, नंतर दुबईला जावं. पण मला मुंबईच एवढी आवडली की, मी दुबईला गेलोच नाही. थोडक्यात, जाहिरात क्षेत्रात काम करण्यासाठीच मी मुंबईत आलो होतो. अभिनय किंवा नाटक तेव्हाही सिनेमा माझ्या डोक्यातच नव्हतं. लोक आपल्याला अभिनयाच्या क्षेत्रातच यायचंय, असं ठरवून येतात, तसं माझ्या बाबतीत नव्हतं. म्हणजे हौसेखातर नाटक वगैरे ठीक आहे, परंतु नाटकात काम करून पैसे कमवायचे आहेत, असा काही विचार मनात नव्हता. नंतर मी दुबईला गेलो नाही, तरीही आपण याच क्षेत्रात आर्ट डायरेक्टर वगैरे म्हणून काम करायचं, असंच डोक्यात होतं.
मुंबईत आल्यावर तुम्हाला संघर्ष वगैरे करावा लागला?
> जाहिरातींमुळे लोकांना माझा चेहरा माहीत झाला. म्हणजे कुणीतरी असा एक कलाकार आहे, हे कळलं, त्यामुळे लोक मला ओळखू लागले आणि पुढे काम मिळणं मला सोपं झालं. त्यामुळे ती स्टेप (जाहिरातींची) माझ्यासाठी चांगली ठरली. अर्थात, जाहिरातींमध्येही मला स्ट्रगल करावा लागलाच, पण खरं सांगायचं तर टिपिकल स्ट्रगल म्हणतात, तसा मला करावा लागला नाही. टिपिकल म्हणजे तेव्हा मी स्ट्रगलर्सच्या गप्पा ऐकायचो, तेव्हा ते म्हणायचे, ‘चहा-बिस्किटांवर दिवस काढावे लागतात. खूप अपयश येतं. खूप स्ट्रगल असतो. खूप फ्रस्टेशन येतं.’ वगैरे. पण माझ्या वाटयाला तेवढं आलं नाही, कारण माझं जाहिरातींचं काम चालू होतं. त्यातून मला पैसे मिळायचे. त्यामुळे आर्थिक बाजू कधीच कमकुवत नव्हती. मध्यमवर्गीय घरातला असल्याने मला पैशाची तेवढी चणचण कधीच भासली नाही. आता काय करायचं, असा मला प्रश्न कधीच पडला नाही किंवा कुणाकडून कधी उधारही घ्यावे लागले नाहीत. अर्थात, मला वैयक्तिक स्ट्रगल करावा लागला नाही. म्हणजे खाण्या-पिण्यासाठी, हिंडण्या-फिरण्यासाठी स्ट्रगल असा बेसिक गोष्टींसाठीचा स्ट्रगल नाही करावा लागला. किंवा शहराचा स्ट्रगल म्हणतात तसा नाही करावा लागला; पण या क्षेत्रात काम मिळवण्यासाठी जो स्ट्रगल लागतो, तो आजही मला करावा लागतोय. तो अगदी ग्रासरूट लेव्हलपासून मला करावा लागतो. प्रत्येक वेळी तुम्हाला सिद्ध करावं लागतं की, तुम्ही अॅक्टर आहात. कारण लौकिकार्थाने लागतो तसा कलाकाराचा चेहरा माझ्याकडे नाही.
तुम्ही जाहिरात क्षेत्रात काम करता करता जाहिरातींचा चेहरा कसा बनलात?
> जाहिरातीच्या क्षेत्रात फ्रीलान्स इलस्ट्रेटर म्हणून काम करताना जाहिरात क्षेत्रातील लोकांशी संबंध आला आणि मी जाहिरातींतून अभिनय करू लागलो. पुढे मी दोनशेक जाहिराती केल्या. म्हणजे तेवढया मोजल्या. नंतर नंतर मोजायच्या सोडून दिल्या. मी अनेक जाहिराती लिहिल्यादेखील. मी मॅकन एरिक्सन वगैरे एजन्सींसाठी फ्रीलान्स स्टोरीबोर्डिगचं काम करायचो. त्यातून माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. रवी देशपांडे यांच्याकडे मी पहिली जाहिरात केली. तीही अपघातानेच. मी रुईया नाक्यावर उभा होतो. एक मित्र म्हणाला, ‘चल ऑडिशनला.’ तेव्हा ऑडिशन म्हणजे नेमकं काय, हेही माहीत नव्हतं. मी ऑडिशन दिली आणि मला त्यांनी एका जाहिरातीतही घेतलं. ती एका कोल्ड्रिंकची जाहिरात होती, परंतु ती प्रेक्षकांसमोर आलीच नाही, पण दुसरी ग्लायकोडिनची अॅड खूप हिट झाली. त्यानंतर मला जाहिरातींमघ्ये कामं मिळायला लागली. मग मी सिनेमांमध्ये कामं केली. नंतर सीरियल आणि शेवटी नाटक, असा माझा उलटा प्रवास झाला. साधारणपणे लोक आधी नाटक, मग सिनेमा-मालिका आणि शेवटी जाहिराती, असा प्रवास करतात. त्यातही जाहिरातींचं क्षेत्र खूप अनप्रेडिक्टेबल असतं, तिथे कुठले निकष नसतात. म्हणजे काय केलं तर तुम्हाला अमुक जाहिरात मिळेल, असे काही निकष नसल्याने फारसे लोक या क्षेत्राकडे फिरकत नाहीत. म्हणून आज नाटक, सिनेमा, टीव्ही आणि जाहिराती या चार क्षेत्रांत काम करणारे खूप कमी कलाकार दिसतात.
हा उलटा प्रवास तुमच्यासाठी अवघड ठरला नाही?
> नाही, माझ्याकडे वेगळं स्किल आहे, असं मला वाटतं. मी कमर्शियल आर्टिस्ट असल्याने माझ्याकडे व्हिज्युअलायझेशनची कला आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे इलस्ट्रेशन हे माझं स्पेशलायझेशन असल्यामुळे मी कुठलीही गोष्ट व्हिज्युअलाइज करू शकतो आणि या गोष्टीचा मला सगळीकडे फायदा होतो. अभिनय, दिग्दर्शन करताना होतो. ही अशी गोष्ट आहे की, जी तुम्हाला सगळीकडे लागते. नाटक करताना तर लागतेच लागते. म्हणजे तुम्ही जे करता ते तुम्हाला आधी दिसलं पाहिजे, तर तुम्ही त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करता. ते स्किल सुरुवातीपासून माझ्याकडे होतं. ते खूप कमी लोकांकडे असल्यानेच अॅडव्हर्टायजिंग, सिनेमा, सीरियल आणि नाटक या सगळ्या क्षेत्रांत एका वेळी काम करणारे खूप कमी लोक पाहायला मिळतात. ज्यांच्याकडे व्हिज्युअलायझेशनची कला आहे ते कुठेही काम करू शकतात. त्या त्या क्षेत्राच्या लिमिटेशन किंवा अॅडव्हांटेज ओळखून ते काम करू शकतात. ते स्किल माझ्याकडे असल्याने मला हे करणं शक्य होतं. ही देणगी दैवी असते. ती तुम्हाला कुणाकडून घेता येत नाही. त्यामुळे ज्या माणसाकडे व्हिज्युअलायझेशन आहे, त्याच्यासाठी या गोष्टी अवघड होत नाहीत. त्याचा फायदा असा होतो की, मला एक सांगतात तर मी त्यांना दहा गोष्टी सांगतो.
अभिनय, लेखन, दिग्दर्शन या सगळ्या गोष्टी एका वेळी केल्याने फायदा होतो की, काम अधिक अवघड होतं?
>मला वाटतं, यामुळे माझं सोपं होतं. मी तुम्हाला तेच सांगतोय की, या सगळ्याचं मूळ व्हिज्युअलायझेशनमध्ये आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या होतात. सगळ्याचं मूळ तिकडेच आहे. अभिनयाचं म्हणा, लेखनाचं म्हणा, दिग्दर्शनाचं म्हणा. मी जेव्हा लिहीत असतो. तेव्हा मला ते दिसतही असतं. त्याचा सेट कसा असेल. वेशभूषेची रंगसंगती काय असेल, पडदे कसे असतील, लायटिंग कशी असेल? मी लिहीत असताना सगळ्या वातावरणासह ते लिहीत असतो. रंगसूचनाही मी त्यात लिहीत असतो. त्यामुळे जेव्हा मी ते नाटक बसवतो, तेव्हा ते सोपं जातं. कारण लिखाणातच मी बरंचसं काम केलेलं असतं.
पण तुम्ही सगळ्या माध्यमात काम करता तेव्हा या माध्यमांच्या फॉर्मचा म्हणून फरक असणारच..
>तेच तर. हे सगळं व्हिज्युअलायझेशनवर आहे. नाटकात तुम्हाला स्टेजच्या फ्रेममध्ये दिसतं ते तुम्ही करता. सिनेमात कॅमे-याच्या फ्रेममध्ये दिसतं ते करायचं असतं. तीस सेकंदात काय काय यायला पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. मी एका जाहिरातींच्या दिग्दर्शकाला प्रश्न विचारला होता की, ‘सर, तुम्ही एवढय़ा अॅड केल्यात, एवढं छान कन्सिव्ह करता, हे तुम्ही करत असाल तर फिल्म का नाही करत?’ त्यांनी खूप छान उत्तर दिलं, ‘मी फक्त तीस सेकंद बघू शकतो, त्यापेक्षा जास्त नाही. म्हणूनच मी म्हणतो, लिमिटेशन अँड अॅडव्हांटेज तुम्हाला कळली की, तुम्ही मुक्तपणे त्या क्षेत्रात वावर करू शकता.
तुम्ही लेखन, अभिनय, दिग्दर्शन सगळे प्रकार हाताळले आहेत. यात तुमच्यासाठी सगळ्यात जास्त सोपी आणि अवघड गोष्ट कुठली?
>मला सगळ्यात काय आवडतं तर अभिनय. कारण त्यात काहीच त्रास नसतो. त्यानंतर दिग्दर्शन. ते मला इंटरेस्टिंग आणि चॅलेजिंग वाटतं आणि त्याच्या बाबतीत मी पॅशनेटही असतो, पण लेखन ही जी प्रक्रिया आहे, ती सगळ्यात वेदनादायी आहे. बरेचदा तुम्हाला सुचत नाही. यापुढे काय घडायला पाहिजे, हे दिसत नाही. त्यानंतर जी अस्वस्थता असते. म्हणजे मला पुढचं कधीच सुचणार नाही का, ही भावना तुम्हाला हेल्पलेस बनवणारी असते. ही हेल्पलेस असल्याची भावना लेखनामध्ये येतेच येते आणि दिग्दर्शनामध्येही येते. पण नशिबाने मला ती दिग्दर्शन आणि अभिनयामध्ये येत नाही. हा, आता दुस-या कुणाचं तरी स्क्रिप्ट असेल आणि मला नाटक बसवायचं असेल तर मला माझ्या पद्धतीने पात्रं उभी करावी लागलीत, रंगसंगतीपासून नेपथ्यापर्यंत सगळं ठरवावं लागेल. मग ते नाटक दिग्दर्शकाचं होईल. मग त्यात प्रसंग काढणं-घालणं होईल. इथे मीच नाटक लिहीत असल्याने ते लिहीत असतानाच त्याचं दिग्दर्शन झालेलं असतं. ते मला माझ्या कलाकारांपर्यंत पोहोचवायचं असतं. ‘बाबा रे, असं मला कंपोझिशन दिसतंय. तेव्हा असं करून बघ.’ त्यात सुधारणा शेवटपर्यंत होत राहतात, पण माझं नाटक कागदावरच उभं राहतं. मला अजून एका गोष्टीचा शोध लागलेला नाही की, सिद्धहस्त लेखक असतात, त्यांना विषय सांगितला की सुचतं, पण त्यांना ते व्हिज्युअलाइज होऊन सुचतं की, आणखी कुठली प्रेरणा असते त्यामुळे सुचतं. मला दिसतं ते सुचतं. मगच लिहता येतं.
पण मुळात ही लिखाणाची प्रेरणा तुमच्यात आली कुठून?
> ते मी एवढया वर्षाचं फलित समजतो. मी लिहायला सुरुवात केल्याला फक्त चार वर्षच झालीत. त्याच्या आधी मी काही लिहिलं नव्हतं. मला आयडियाज सुचायच्या, पण त्या तुकडया तुकडयांमध्ये होत्या. मधलं जे जोडकाम आहे, त्याला आपण क्राफ्टिंग म्हणतो, ते कसं करायचं, हे कळायचं नाही. मला चित्रपट बघण्याची प्रचंड आवड आहे. हिंदी, इंग्रजी, मराठी सगळे चित्रपट मी बघतो. त्याचा मला खूप फायदा झाला. प्रॅक्टिकली क्राफ्टिंग कसं करायचं, ते कळलं. इंग्रजी चित्रपटांत खूप मेहनत घेतली जाते. अगदी साधं दृश्य अतिशय सुंदर पद्धतीने मांडलं जातं. मला ते प्रचंड आवडतं. आपल्याकडेही असं काम होतं, पण व्हिज्युअलायझेशन बेस्ड काम मला इंग्रजी चित्रपटांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळालं. त्याच्यामुळे मला क्राफ्टिंगचा सेन्स आला. आयडिया सुचल्यावर त्या शब्दांत कशा उतरवायच्या, हे मला इंग्रजी चित्रपट पाहून कळलं.
तुमच्या लेखनाची पद्धत साधारणपणे काय असते?
>आज सांगितलं नि उद्या लिहून दे असं मला नाही जमत. विषय डोक्यात बरेच दिवस घोळत असतो. नंतर कधीतरी मी ते कागदार उतरवतो. ‘टॉम आणि जेरी’ हे पहिलं नाटक मी लिहिलं, त्याच्या आधी त्यावर सहा-सात महिने विचार करत होतो. अर्थात, सगळा विचार एकदम नाही करायला लागत. तोही तुकडया-तुकडयांमध्ये होतो. प्रत्यक्ष कागदावर ते नाटक मी फक्त आठ दिवसांत लिहिलं. ‘बेगम मेमरी आठवण गुलाम’च्या बाबतीत सांगायचं तर मी हे नाटक कधी लिहीन, असा विचारही माझ्या मनात नव्हता. मी आणि माझी बायको, असं आम्हा दोघांसाठी एखादं नाटक लिहावं, असं सुरुवातीला माझ्या डोक्यात होतं, पण तिने मला ‘लिहून बघ’ असं सांगितलं असतं तर मी लिहिलंच नसतं. या नाटकाच्या बाबतीत मी पहिल्या नाटकाच्या तुलनेने कमी वेळ घेतला. मी तीनेक महिनेच विचार केला. त्यानंतर मी आठ-दहा दिवसांतच मी नाटक लिहून काढलं.
तुमच्या या दोन्ही नाटकांत एक कॉमन गोष्ट अशी आहे की, पती-पत्नीचं नातं नाटकांच्या केंद्रस्थानी आहे. आजच्या परिस्थितीत हा विषय जाणूनबुजून निवडलाय का?
>हा योगायोग म्हणावा लागेल. कारण कल्पना माझ्या डोक्यात होती की, अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवली तर काय होईल? नवरा-बायकोचा विषय घेऊनच नाटक करायचं, असं काही मी डोक्यात ठेवलं नव्हतं. हे नाटक नवरा-बायकोवर असलं तरी त्यात नाटक म्हणून ब-याच गोष्टी आहेत. ‘टॉम आणि जेरी’ पूर्णपणे नवरा-बायकोचं नाटक होतं, पण हे तसं नाही. यात मी सर्वसामान्य प्रेक्षकांच्या दृष्टीने ब-याच गोष्टी टाकल्यात. यात त्या पती-पत्नीचे मित्र आहेत. अनेक विचित्र गोष्टी आहेत. त्यातून अनेक नव्या गोष्टी येत राहतात, ज्या पती-पत्नीच्या होत जातात.
नाटकं लिहिताना व्यावसायिक गणिताचाही विचार करावा लागतो?
>मी माझ्या आजूबाजूला सध्या कुठल्या गोष्टी सध्या व्यावसायिकदृष्टया यशस्वी होताहेत, हे पाहतोय, तर माझ्या असं लक्षात येतंय की, ज्या गोष्टी प्रेक्षकांशी रिलेट होतात, त्यांनाच व्यावसायिक यश मिळतंय. म्हणजे लोकांना जे कुठेतरी आपल्या आयुष्याच्या जवळचं वाटतं, त्या गोष्टींच्या यशाचं प्रमाण जास्त दिसतंय. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की, जे विषय लोक आपल्या आयुष्याशी जोडून पाहू शकतील, त्यांची स्वीकारार्हता जास्त असते. नाटक असो की, सिनेमा असो, सगळीकडे हेच दिसून येतं. प्रेक्षकांची विशिष्ट अभिरुची असते, असं म्हणतात, पण मला असं वाटतं की, प्रेक्षकांचं एक सरासरी वय असतं. कारण अभिरुची ही अनप्रेडिक्टेबल असते. उदा. अमुक नाटक यशस्वी होण्याचं, आवडण्याचं काय कारण आहे, असा प्रश्न तुम्हाला पडेल, पण प्रेक्षकांच्या अभिरुचीला ते आवडलेलं असतं. मी आणि माझी बायको यांच्याच अभिरुचीत इतका फरक आहे की, मला एखादा चित्रपट खूप आवडतो तेव्हा तिला तो अजिबात आवडत नाही. फक्त तुम्ही प्रेक्षकांचं वय लक्षात घेऊ शकता. मला असं वाटतं की, मराठी प्रेक्षकांचं वय तेरा किंवा चौदा वर्ष आहे किंवा आजच्या काळात ते पंधरा आहे, असं समजू या. त्या वयाच्या मुलाला जे कळेल त्याच पद्धतीचं त्यांना आवडतं. तेच ते बघतात.
पण एका बाजूला प्रेक्षकांना ‘काटकोन त्रिकोण’सारखी नाटकं आवडतात, तर दुसरीकडे पुनरुज्जीवीत नाटकांनाही ते गर्दी करताना दिसतात. याचा अर्थ काय?
>याचा अर्थ लोकांना दोन्ही आवडतायत. मला असं वाटतं की, लोकांना आता वेगवेगळं बघायला आवडतं. ज्याप्रमाणे वेगवेगळी चॅनेल बघायला आवडतात. तसं हे आहे. म्हणून त्यांना जुनी नाटकं बघायला आवडताहेत आणि नवीन काही आलं तर तेही बघायला आवडतंय. आता यात कमर्शियल दृष्टिकोन आलाय. म्हणून टीव्हीवरचा हिट कलाकार घेऊन नाटकं काढली जातात आणि ती चालतातही. शेवटी सगळ्या गोष्टी पैशापाशी येऊन अडतात. तुम्हाला नाटक चालवायचं तर पैसे लागतात. मग निर्मात्याला नाटकाच्या आशयाबिशयापेक्षा इतर गोष्टींवर भर द्यावा लागतो.
आज मराठी रंगभूमीबद्दल तुमचं काय मत आहे. नाटकं खूप येताहेत, पण दर्जा वाढलेला आहे?
>आता हीच गोष्ट चित्रपटांच्या बाबतीतही आहे. जिकडे पैसा जास्त आहे, तिकडे लोक धाव घेणार. कारण त्यांना दिसतंय की, नाटकाला गर्दी होतेय. पैसा हा या सगळ्याच्या मुळाशी आहे, हे डावलता येणार नाही. मी आता ठरवलं की, मी माझी तत्त्वं आहेत आणि मी त्यांनाच चिकटून राहीन. मग मी असाच निर्माता शोधेन की, जो माझ्यासोबत काम करेल. उद्या एखादा अभिनेता सीरियलमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि त्याला नाटकात घ्यायचंय, पण तो टीव्हीवर लोकप्रिय आहे, म्हणून फक्त त्याला नाटकात घ्यायचंय तर मी त्याला घेणार नाही. तो त्या भूमिकेसाठी योग्य असेल, तर मी त्याला घेईनच. मग तो लोकप्रिय वगैरे आहे का, हेही बघणार नाही. एरवी इतरांच्या बाबतीत हे होईलच असं नाही, पण हा कमर्शियल दृष्टिकोन आहे, हे विसरून चालणार नाही. एखाद्या नटाला घेऊन जर दीड लाखाचं बुकिंग होणार असेल तर मी का नाही घ्यायचं? मी उद्या निर्माता झालो तर हाच विचार करेन. पण हेही खरं की, आता थोडंसं गोंधळात टाकणारं वातावरण आहे. म्हणजे एवढा चांगलं नाटक किंवा चित्रपट, पण लोक का बघत नाहीत? नक्की काय चालेल, हे सांगता येत नाही. कारण जाहिरातींचा जमाना असल्याने लोक बऱ्याचशा कलाकृती खूप जाहिरात, मार्केटिंग करून घराघरात पोहोचवतात आणि चालवतात, पण त्याचा दर्जा तेवढा चांगला नसतो.
नाटक, सिनेमा, सीरियल आणि जाहिराती यात कुठलं माध्यम अधिक आनंददायी वाटतं?
>मी या सगळ्या माध्यमांत काम केलंय म्हणून सांगतो, सगळ्या माध्यमाचं आपलं म्हणून वैशिष्टय आहे. सिनेमा किंवा नाटक या चिरकाल लक्षात राहणा-या गोष्टी आहेत. म्हणूनच पूर्वीची नाटकं, सिनेमे अजूनही लोकांच्या लक्षात राहतात, तर जाहिरातींचं क्षेत्र तुम्हाला नावाची ओळख मिळवून देऊ शकत नाही. टीव्ही सीरियल हा प्रकार मला फारसा आवडला नाही, पण मी पैशासाठी करतो. या सगळ्यात मला जे आवडतं ते मी करतो. ते काही लोकांना आवडतं, तर काही लोकांना आवडत नाही, पण छोटयाशा गोष्टीतूनही छाप पाडता येते. म्हणून मी माझ्या कामात आत्मा शोधायचा प्रयत्न करतो.