मुंबईतील अँटॉप हिल परिसरात बुधवारी सकाळी दरड कोसळून दोन ठार झाले आहेत, तर एक जखमी झाला आहे.
मुंबई- मुंबईतील अँटॉप हिल परिसरात बुधवारी सकाळी दरड कोसळून दोन ठार झाले आहेत, तर एक जखमी झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन जणांचा समावेश आहे. जखमींवर शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाकडून सायंकाळी उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
अँटॉप हिल येथील जुने पोस्ट कार्यालयाजवळच्या देवराम चाळीवर सकाळी अचानक दरड कोसळल्यामुळे एकच हाहाकार उडाला. अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने संदीप रामअवतार केवट(२३) यांना ढिगा-यातून बाहेर काढून तातडीने शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केले. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास संदीपचे वडील रामअवतार केवट यांचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला. केवट यांच्या कुटुंबातील संदीपची आई आणि बहीण घटनेपूर्वी बाहेर गेल्याने पुढचा अनर्थ टळला.
या दुर्घटनेत सलीम शेख जखमी झाले आहेत. त्यांच्या मानेला, छातीला इजा झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. जोरदार पाऊस आणि घटनास्थळी जाण्याचा मार्ग चिंचोळा असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. यंदाच्या पावसाळ्यातील ही सहावी घटना आहे.
पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे रस्ते वाहतुक कोलमडली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कांदिवलीहून बांद्र्याकडे येणारी वाहतूक पूर्णत: कोलमडली आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग, लालबहादूर शास्त्री रोड, एस. व्ही रोड आणि पश्चिम उपनगरातील लिंक रोडवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
रेल्वे वाहतूक सुरळीत
मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्या वेळेवर धावत असून हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्या मात्र १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत.
मुसळधार पावसाची शक्यता
ओरिसा किनारपट्टी व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या ७२ तासांत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली.
बुधवारी कुलाबा येथे ५६.४ तर सांताक्रुझ येथे २३.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळपासून हळूवार सरींनी पावसाने सर्वत्र हजेरी लावली. मात्र दुपारी बाराच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. धारावी येथील कुंभारवाडा आणि ट्रॅफिक कॅम्प आणि परळ येथे पाणी साठले. पश्चिम उपनगरातील दहिसर, वांद्रे, मालाड, कांदिवली या भागांनाही पावसाने झोडपले.
चेंबूर, देवनार, कुर्ला विभागातदेखील पावसाने चांगलाच जोर धरला. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. शहर, पूर्व आणि पश्चिम भागांत अनुक्रमे ४८.४६, २८.६५, ३२.११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता ३.८३ मीटर उंच लाटेची भरती असून, सकाळी सव्वासात वाजता ओहोटी असेल. दुसरी भरती दुपारी दोन वाजून १७ मिनिटांनी असून, ४.२८ मीटपर्यंतची उंच लाट अपेक्षित आहे. रात्री आठ वाजता १.४६ मीटर उंच लाटेची ओहोटी असेल.