खेळ व चित्रपट हे मनोरंजनाचे दोन प्रमुख आधारस्तंभ आहेत. या दोन्ही ठिकाणी आवश्यक असते ती कोणत्याही व्यक्तीची प्रतिभा. शेवटी चित्रपट म्हणजेही एका माणसाची कथाच असते. मिल्खा सिंग या आंतरराष्ट्रीय धावपटूच्या आयुष्यावर बेतलेला ‘भाग मिल्खा भाग’ हा एक आनंद प्रवास आहे. त्यासाठी घेण्यात आलेल्या मेहनतीनं तो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट झाला आहे.
खेळांचा थरार चित्रपटात पकडणं तसं कठीणच. मात्र दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यानं हा थरार अगदी नेमकेपणानं आपल्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात आणला आहे. त्याच्या दिग्दर्शनीय कौशल्याचा हा एक मैलाचा दगड आहे, असं म्हणायला हरकत नाही.
खेळांना केंद्रस्थानी ठेवून आतापर्यंत जगभरात अनेक चित्रपट आले. त्याचप्रमाणे चरित्रात्मक(बायोपिक) चित्रपटांचीही एक मोठी परंपराच आपल्याकडे आहे. अगदी ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’पासून ते आजपर्यंत. चित्रपटातली महत्त्वाची गोष्ट असते ती त्या चित्रपटाचं कथानक. चरित्रात्मक चित्रपटात एका जीवनसंघर्षाची कथा असते. ती पडद्यावर नेमकीकाळाच्या चौकटीत मांडणं हे खरोखरच एक आव्हानच असतं. हे आव्हान राकेश ओमप्रकाश मेहरानं अगदी योग्य पद्धतीनं पार पाडलंय. ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाची कथा ही तशीअनेकांना ठाऊक असलेली. मिल्खा सिंग यांनी भारताला ऑलिंपिकमध्ये मिळवून दिलेल्या यशाची ही गाथा. अगदी सर्वसामान्य आयुष्य जगणा-या एका शीख तरुणाची एक जागतिक दर्जाचा धावपटू होण्याची ही कथा आहे. मात्र तो माहितीपट न होता ती एका माणसाची कथा असावी असा प्रयत्न इथे करण्यात आला आहे. चित्रपटाचा एकंदरीत प्रभाव पाहता तो प्रयत्न यशस्वी झालाय, असंच म्हणावं लागेल.
सिनेमा सुरूहोतो तो रोममधल्या कामगिरीनंतर, तिथे निराश झालेल्या मिल्खा सिंग यांना पाकिस्तानमधील मैत्री स्पर्धामध्ये खेळण्यासाठी आमंत्रण येतं. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणारे मिल्खा सिंग हे पाकिस्तानात मात्र जाण्यास नकार देतात. त्यांची मनधरणी करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूयांचे विश्वासू सहकारी चंदिगढला जातात. त्यांच्याबरोबर मिल्खा सिंग यांचे दोन्ही प्रशिक्षक असतात. त्यांच्या बोलण्यातून मिल्खा सिंग यांची कथा उलगडत जाते. चित्रपटाच्या या प्रवासात ते पाकिस्तानात जाण्यास का इच्छुक नाहीत याची कारणंही आपल्याला मिळतात.
चित्रपटाची जबरदस्त उंचीचा आहे. त्याचप्रमाणं या चित्रपटाची लांबीही. दिग्दर्शकानं या चित्रपटातून सध्याचं अत्याधुनिक तंत्र वापरलंय. चित्रपटाची कथा सलग न मांडता व त्यात काळाचा विचार न करता एक एक प्रसंग मांडत कथा हळूहळू पुढे नेणारं हे तंत्र आहे. जीवनातल्या कालखंडापेक्षा प्रसंगातल्या भावनांशी समकक्ष अशा प्रसंगांची एक मालिकाच आपल्यासमोर मांडली जाते. तुम्हाला ‘स्लमडॉग मिलेनियर’ हा चित्रपट जर आठवत असेल तर तिथे या प्रकारची शैली वापरण्यात आलीय.
चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. चांगला दिग्दर्शक त्यांच्या जीवनातल्या नेमक्या प्रसंगावर किती प्रभावी सिनेमा करूशकतो हे राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या चित्रपटातून दाखवून दिलंय. चांगला दिग्दर्शक एखाद्या व्यक्तीची जीवनकथा ही पडद्यावर एक कथा म्हणून किती प्रभावीपणे दाखवू शकतो हे या चित्रपटातून दिसून येतं. अनेक लहानमोठया प्रसंगांची जी परिणामकता राकेशनं साधली आहे त्याला खरोखर तोड नाही.
चित्रपटाचं कलादिग्दर्शनही असंच उच्च दर्जाचं झालंय. इतर लोकेशन बाहेरून मिळाली असली, तरी जे इंटेरिअर त्यानं तयार केलं त्यालाही तोड नाही. पंजाबमधली घरं, वस्त्या, शरणार्थीचा निवारा, जुनी दिल्ली, शहादरा पोलिस स्टेशन या गोष्टी तर इतक्या छान आणल्या आहेत, की वाह क्या बात है. त्यावर कडी म्हणजे रेल्वेचा प्रथम श्रेणीचा जुना लाकडी डबा, त्याची रचना, त्यातला साधेपणा इथपासून ते त्रिमूर्ती हाऊसपर्यंतच्या सगळ्याच गोष्टी यात नेमकेपणानं टिपण्यात आल्या आहेत. त्यातही त्या काळातला वॉल्वचा रेडिओ व इतर सर्वच गोष्टी या चित्रपटासाठी घेण्यात आलेली मेहनत दाखवून जातात. केवळ सोनम कपूर राहते ती रेल्वेस्थानकालगतची वस्ती दाखवताना दिसणारे रेल्वेचे विजेचे खांब मात्र मनात संभ्रम निर्माण करतात. ते दाखवताना काळ दाखवण्यासाठी कोळशाचं इंजिन आहे. मात्र हे विजेचे खांब कशासाठी, असा प्रश्न निर्माण होतो. यासारख्या काही थोडय़ा बाबी वगळता चित्रपटात कुठेही नाव ठेवायला जागा नाही. त्या काळातल्या कपडयांची शैली व तेव्हाची फॅशनही अगदी रंगांच्या बारकाव्यांनिशी दाखवण्यात आली आहे. चित्रपटाबाबत लक्षात राहतं ते अत्याधुनिक कॅमे-याच्या साहाय्यानं केलेलं छायांकन व वेगवेगळ्या टोनमधली प्रकाश योजना.
दिग्दर्शकाच्या सर्व कल्पना सत्यात उतरवण्यासाठी अभिनेत्यांनी घेतलेली मेहनतही लाजवाब आहे. मिल्खा सिंग यांची भूमिका फरहान अख्तर अक्षरश: जगलाय. त्याच्या भूमिकेची तुलना केवळ ‘गांधीं’ची भूमिका केलेल्या ‘बेन किंग्ज्ले’ यांच्याशीच होऊ शकते. फरहान अख्तरनं या चित्रपटातून मिल्खा सिंग यांना अक्षरश: समोर उभं केलंय. यासाठी आपलं शरीर त्यानं धावपटूसारखं करून घेतलं. धावपटू होण्यासाठीची दृश्यं तर अशा पद्धतीनं केलीत जणू तो स्वत:च धावपटू होण्यासाठी मेहनत करतोय. त्याचप्रमाणं या चित्रपटातल्या इतरही सर्व संवेदनशील प्रसंगांना त्यानं योग्य न्याय दिला आहे. फरहानच्या आयुष्यातली ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका ठरावी. इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. खास उल्लेख करायला हवा तो दिव्या दत्ताचा. मिल्खा सिंग यांच्या बहिणीची भूमिका तिनं जबरदस्त ताकदीनं उभी केली आहे.
चित्रपटाचं संगीतही त्याच्या सर्वच भावनांना अधोरेखित करणारं झालं आहे. गाण्यांचे शब्द व या चित्रपटातले संवाद प्रसून जोशीनं लिहिले आहेत एवढं सांगितलं तरी पुरे होईल. ‘ये तुम्हारी जिंदगी की आखिरी रेस होगी.’ या संवादाला ‘भागुंगा भी वैसेही’ हे दिलेलं उत्तर लक्षात राहण्यासारखं. चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं शर्यतींचा थरार चित्रित करण्यात आलाय त्यालाही तोड नाही. या चित्रपटाचं सगळ्यात मोठं वैशिष्टय म्हणजे, या चित्रपटाची कथा ही जितकी मिल्खा सिंग या खेळाडूची आहे तितकीचं ती मिल्खा सिंग या माणसाचीही आहे. ती आवर्जून पाहायलाच हवी. चित्रपट थोडा मोठा आहे. काही काही प्रसंगांमध्ये दिग्दर्शक काहीसा रेंगाळल्यासारखा वाटतो, मात्र ही आपली तक्रार त्यानं शेवटच्या प्रसंगात अशा पद्धतीनं दूर केली आहे की, आपण त्याच्या प्रेमात पडलोच पाहिजे.