आंध्रप्रदेशातील चित्तोर जिल्ह्यातील तिरुपती परिसरातील सेशातचलम जंगल परिसरात चंदन तस्कर आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत २० तस्कर ठार झाले.
चित्तोर -आंधप्रदेशातील चित्तोर जिल्ह्यात चंदन तस्कर आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत २० चंदन तस्कर ठार झाले. तसेच या चकमकीत काही पोलीस आणि वनअधिकारीही जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
चित्तोरमधील चंद्रगिरी मंडळ परिसरातील सेशाचलम जंगलात दोन ठिकाणी या घटना घडल्या. चीकातीकोना येथे ११ तस्कर ठार झाले तर इतागुंटा येथे नऊ जण ठार झाले.
सोमवारपासून पोलिसांच्या विशेष पथकाची चंद्रगिरी मंडल भागातील श्रीनिवासा मंगापुरम, श्रीवरीमेट्टु आणि इतागुंटा यापरिसरात शोध मोहीम सुरु होती. यावेळी पोलीस आणि रक्त चंदनाची तस्करी करणा-यांमध्ये जोरदार चकमक झाली.
पोलिसांनी तस्करांना शरण येण्यास सांगितले. मात्र तस्करांनी पोलिसांवक दगडफेक सुरु केली. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. अनेक तास ही चकमक सुरु होती. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला.