ज्या पद्धतीने कोकणातील शेतक-यांकडे युती सरकारने दुर्लक्ष केले ते पाहता कोकणातील शेतक-यांवर आत्महत्येची वेळ यायचीच होती. सतत दोन अधिवेशनात कोकणातील बागायतदारांचा प्रश्न मी मांडत आहे.
देवगड – ज्या पद्धतीने कोकणातील शेतक-यांकडे युती सरकारने दुर्लक्ष केले ते पाहता कोकणातील शेतक-यांवर आत्महत्येची वेळ यायचीच होती. सतत दोन अधिवेशनात कोकणातील बागायतदारांचा प्रश्न मी मांडत आहे.
मोर्वे येथील शेतकरी पांडुरंग कोले याची आत्महत्या हे सरकारचेच पाप आहे. कोकणात झालेली ही आत्महत्या पहिली आणि शेवटची. नितेश राणे काय आमदार आहे हे मी युती सरकारला दाखवूनच देईन. कोकणाने २३ आमदार निवडून युती सरकारला बळ दिले ते हेच दिवस दाखवण्यासाठीच काय? अशा शब्दांत सोमवारी देवगड येथे आमदार नितेश राणे यांनी युती सरकारची अब्रु चव्हाटय़ावर आणली.
हिंदळे-मोर्वे येथील शेतकरी पांडुरंग हरी कोले यांनी रविवारी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांची भेट आमदार नितेश राणे यांनी घेऊन त्यांना धीर दिला. यापुढे तुमचे कुणीही नसले तरी मी आहे, अशा शब्दांत त्यांनी सांत्वन केले.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना युती सरकार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यावर तिखट शब्दात टीकास्त्र सोडले. मृताच्या घरी युती सरकारचे आमदार येतात व फोटो काढून घेतात, कर्ज माफीचे आश्वासन देतात ही बाब योग्य नव्हे. फोटो काढण्यापेक्षा काहीतरी करा तरच त्यातून शेतक-याला काहीतरी मिळेल.
कोकणावर ही परिस्थिती येणारच होती आम्ही कर्जमाफी मागून थकलो, अवकाळी पावसाबाबत मदत मागितली, नागपूर अधिवेशनात कोकणचा साधा उल्लेख नाही, कोकणावर आलेल्या या वाईट दिवसांना जबाबदार कोण? याचेही उत्तर शोधले पाहिजे.
मागील नियोजन समितीच्या सभेत १५ दिवसांत भातविक्री करतो असे सांगितले, मात्र अद्यापही गोडावूनमध्ये भात सडत आहे. वारंवार वस्तुस्थिती मांडण्याचे काम आम्ही केले, मात्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही. एका कलमामागे ५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मागितली. मात्र सरकारने एकही पै दिली नाही. २० टक्के आंबा पीक केवळ आले आहे ही वस्तुस्थिती पाहता बागायतदारांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
केवळ युती शासनामुळे आत्महत्येचा कलंक कोकणला लागला. मात्र ही पहिली आणि शेवटची आत्महत्या. यापुढे शासनाला गप्प बसू देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शासनाला मदत द्यायला लावणारच, असा निश्चय आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. यावेळी सभापती डॉ. मनोज सारंग, तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, विभागीय अध्यक्ष शैलेश लोके व अनेक मान्यवर उपस्थित होते.
राणे कुटुंबीयांकडून १ लाखांची मदत
देवगड तालुक्यातील हिंदळे-मोर्वेवाडी येथील आंबा बागायतदार पांडुरंग कोले याने हापूस बागायतीत झालेले नुकसान सहन न झाल्याने गळफास लावून आत्महत्या केली. आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच राणे कुटुंबीयांकडून त्यांना १ लाखांची मदत जाहीर केली.