आंब्याचा नवा हंगाम सुरू झाला असतानाही अद्याप फळासाठी अनुकूल वातावरण तयार झालेले नाही.
रत्नागिरी- आंब्याचा नवा हंगाम सुरू झाला असतानाही अद्याप फळासाठी अनुकूल वातावरण तयार झालेले नाही. त्यामुळे यंदाही आंबा, काजूच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हंगामाला अनुकूल हवामान असणे अपेक्षित होते. परंतु कमी झालेले पर्जन्यमान व त्यामुळे वाढलेला उष्मांक त्यामुळे जवळ जवळ ९० टक्के झाडांना पालवी आली व अजूनही येत आहे.
डिसेंबर महिना आला तरीही हवे असणारे पोषक थंड हवामान नाही. उलट गेले आठ दिवसांपूर्वीपर्यंत पाऊस पडत होता. या वातावरणामुळे झाडांवर विविध कीड, कीटकांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होत असून या वर्षीही अवकाळी पावसाचा त्रास आंबा व काजू पिकांना होणार आहे. त्यामुळे याही वर्षी पीक हातातून जाण्याची शक्यता सर्वाधिक बळावली आहे, असे बागायतदारांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीपेक्षा कमीच मदत उत्पादकांना हातात आली होती. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच मिळणार नाही, असे घोषित करून प्रति हेक्टरी २५ हजारप्रमाणे कमाल २ हेक्टपर्यंतच नुकसानभरपाई जाहीर केली. अजूनही निम्म्याहून जास्त लाभार्थीना मदतच प्राप्त झाली नसल्याचे आंबा बागायतदारांच्या या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. यंदाही हवामानाने दगा दिल्यावर मदतीचे असे तीनतेरा झाल्यास आत्मदहनाशिवाय पर्याय राहाणार नाही, असा इशारा रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेने दिला आहे.
गेल्या वर्षी ऐन पीक हातात येण्याच्या दिवसातच फेब्रुवारीअखेरपासून २ मार्चपर्यंत सलग चार दिवस सातत्याने पाऊस पडला. हवामान ढगाळ राहिले. त्यामुळे संपूर्णपणे मोहोर आणि लहान आकाराची फळे गळून गेली. काढणीस तयार असलेला आंबा डागाळला होता. त्यामुळे उत्पादकाच्या हातात केवळ २० ते ३० टक्केच पीक हातात आले. वाढता उत्पादन खर्च बघता उत्पादकांच्या हातात काहीच शिल्लक राहिले नाही.
आंबा बागायतदारांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल कृषी व महसूल खात्याने सादर केला. सरकारच्या प्रतिनिधींकडे निवेदने देण्यात आली. एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण करून गतवर्षीचे पीककर्ज माफ व्हावे, अशी मागणीही करण्यात आली, मात्र सरकारने कर्जाचे पुनर्गठन करण्याचे निर्देश बँकांना दिले होते, परंतु बँकांच्या आडमुठया अटी व शर्ती तसेच लोकांपर्यंत माहिती उशिराने गेल्याने या सवलतीचा लाभही अत्यल्प लोकांना मिळाल्याचे या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
या संदर्भात संस्थेच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या वेळी संघटनेचे सचिव मंदार सरपोतदार, खजिनदार तु. सो. घवाळी, पावस परिसर आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश साळवी, उमर धामस्कर, प्रदीप सावंत, प्रसन्न पेठे आदी उपस्थित होते.
आता आंब्याचा नवा २०१५-१६ चा हंगाम सुरू झाला आहे. वाढलेला उत्पादन खर्च, घेतलेले कर्ज व पुनर्गठित कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबलेला असताना पुन्हा नुकसान सोसण्याची शेतक-यांची परिस्थिती नाही. त्यामुळे याची दखल सरकारने आतापासूनच घेणे आवश्यक आहे. यासाठी बागायतदारांना मिळणा-या विमा भरपाईचे निकष बदलणेही आवश्यक असून; बागायतदारांवरचे हे संकट गंभीर असल्याने सरकार यावर कोणती भूमिका घेणार हे सरकारने येत्या १५ दिवसांत स्पष्ट करावे, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.
विमा योजनेचे निकष ठरवताना कृषी अधिका-यांसोबत अनुभवी आंबा बागायतदारांना सोबत घ्यावे, हप्ता कमी करावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. अन्यथा येथील सर्व बागायतदार येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे धडकून आत्मदहन करील, असा इशारा बागायतदारांनी दिला आहे.