रत्नागिरी की देवगड हापूस या वादात परप्रांतातील आंबा ‘हापूसचा बापूस’ बनेल. कोकण कृषी विद्यापीठातील कोकणच्या या ‘हापूस’चे नामकरण करावे. कोकणातील या हापूसची महती सातासमुद्रापार गेली आहे. परंतु कोकण कृषी विद्यापीठाने अद्याप कोकणातील या हापूसला ब्रँडनेम दिलेले नाही. कृषी विद्यापीठानेही हा विषय अद्याप गंभीरपणे घेतलेला नाही. फळांच्या नामांकनामध्येही कोकणातील या हापूसला स्थान नाही.
कोकणामध्ये एखादा प्रकल्प यायचा असू दे किंवा उद्योग वा विकासाची चर्चा असू दे, या सर्वामध्ये एकमत होऊन सकारात्मक काही घडेल याची सुतराम शक्यता नाही. सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकतेने विचार करण्याची मानसिकता तिथल्या माणसांमध्ये दिसून येते. याला फळांचा राजा म्हणून आंब्याचे नाव घेतले जाते. हाच कोकणातील हापूस आंबा गेली काही वष्रे वादात सापडला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. देवगडचा हापूस की रत्नागिरी हापूस? या हापूस आंब्याच्या सीमारेषांवरून असणारा अलिखित विवाद थेट कोकण कृषी विद्यापीठातही सुरू आहे. एकीकडे गेली काही वर्षे कोकणातील आंबा, काजू, कोकम आणि मच्छीमार व्यवसायाच्या बाबतीत अवस्था फारच बिकट आहे. कोकणातील सर्वसामान्य आंबा बागायतदार सातत्याने घडणा-या हवामानातील बदलाने पुरता हैराण झाला आहे. आंबा पिकातील अनियमितता आणि हवामानाचे परिणाम यामुळे बागायतदाराला नीट पीक घेता येत नाही. बागायतदार शेतक-यापुढे आपण काय करावे, असा प्रश्न उभा आहे. हवामान बदलात पुढील वर्षी आंब्याचे चांगले उत्पन्न येईल अशी अपेक्षा ठेवून बागायतदार प्रयत्न थांबवत नाहीत. या वर्षी झालेल्या नुकसानीने जरी बागायतदार तोटय़ात असला तरीही पुढील वर्षी आंबा बाग बहरेल अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु गेली १० वष्रे पुढल्या वर्षीचा हा खेळ असाच सुरू आहे. राज्य सरकारकडून काही प्रमाणात काही आंबा बागायतदार शेतक-यांना नुकसानभरपाई मिळते. परंतु या नुकसानभरपाईने आंबा बागायतीच्या फवारणीवर झालेला खर्चही हाती येत नाही. असंख्य वेळा खेपा मारून कृषी आणि महसूल विभागाच्या अधिका-यांकडे वारंवार फे-या मारल्यानंतर हक्काची असणारी ही रक्कम वर्षभरानंतर हाती येते. आंबा, काजू पिकांची ही स्थिती आहे.
इंग्लंडची राणीही कोकणच्या या अल्फांसोच्या फार प्रेमात आहे, असे सांगितले जाते. त्याचा कोकणवासीयांना अभिमान आहे. इंग्लंडची राणी कोकणातीलच हापूस आंब्याची चव चाखते. या अभिमानावरच आपली आंबा व्यवसायातील वाटचाल सुरू आहे. गेल्या काही वर्षात जगभरात सुरू असलेल्या ओपन मार्केटचा प्रभाव आपल्या बाजारपेठांमध्येही दिसू लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोकणच्या या हापूस आंब्याचे केव्हाच ब्रँडिंग व्हायला हवे होते. परंतु तसे प्रयत्नही नाहीत आणि झालेच असतील तर ते फार तुटपुंजे झाले आहेत. हा राजकारणाचा विषय नाही. कोकणातील एका फळ उद्योगामध्ये किती काळ आपले अस्तित्व शोधत ते टिकवत बसणे यासाठी धडपडत राहायचे याचा विचार बागायतदारांबरोबरच कोकणवासीयांनीही करण्याची आवश्यकता आहे. कोकण कृषी विद्यापीठातही कोकणच्या हापूस आंब्याच्या ब्रँडिंगविषयी यापूर्वीही बरीच चर्चा झाली आहे. परंतु हापूस आंबा रत्नागिरीचा की देवगडचा हा वाद काही थांबवता आलेला नाही. कोकणच्या या हापूस आंब्याचे ब्रँडिंग झाले पाहिजे. आंबा बागायतदार शेतक-यांनी या महत्त्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील जागोजागी पिवळ्या जर्द आंब्यांची विक्री सुरू आहे. मोठय़ा प्रमाणावर कर्नाटक आदी राज्यांतून आलेला आंबा कोकणचा आंबा म्हणून विकला जात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गातील आंबा बागायतदार या विषयावर साधी चर्चा करतानाही दिसत नाहीत. परप्रांतातून येणा-या या आंब्याची विक्री कोकणातील हापूस म्हणून होत आहे. यामुळे जशी ती ग्राहकांची फसवणूक आहे तशीच कोकणातील हापूस आंब्यासंबंधी लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणारी आहे. इथे प्रांतिकवाद आणायचा नाही. परंतु त्याचबरोबर जगभरात नाव असलेल्या कोकणातील हापूस आंब्याची इमेज मात्र डागळली जाणार आहे. यासाठीच आंबा बागायतदार शेतक-यांनी संघटितपणे याचा विचार करणे आवश्यक आहे.