महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी प्रचंड उष्मा वाढलेला असताना समुद्रसपाटीपासून २,३७८ फू ट उंचीवर असलेल्या आंबोली गिरिस्थान (हिल स्टेशन) येथे मात्र सध्या अवघे २८ अंश इतके तापमान असल्याने पर्यटकांची गर्दी या ठिकाणी वाढू लागली आहे.
आंबोली – महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी प्रचंड उष्मा वाढलेला असताना समुद्रसपाटीपासून २,३७८ फू ट उंचीवर असलेल्या आंबोली गिरिस्थान (हिल स्टेशन) येथे मात्र सध्या अवघे २८ अंश इतके तापमान असल्याने पर्यटकांची गर्दी या ठिकाणी वाढू लागली आहे. गेल्या चार वर्षात प्रथमच आंबोलीतील हवेत गारवा निर्माण झाला असून हवामानतज्ज्ञही याच्या कारणाचा शोध घेत आहेत.
पावसाळी अन् हिवाळी हंगामात आंबोलीत जेवढा गारवा असतो तितकाच गारवा कमी-अधिक प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळी हंगाम पर्यटकांनी हाउसफुल होण्याची शक्यता आहे. अलीकडेच दोन दिवस अवकाळी पावसाने धुवांधार बरसात केली. काही ठिकाणी तर चक्क गारांचा पाऊसही झाला. त्यामुळे हा गारवा अधिकच वाढला आहे.
सदाहरित निसर्गाचे वरदान लाभलेले आंबोली हे कोकणातील एकमेव हिल स्टेशन आहे. कोल्हापूर, बेळगाव, गोवा या सर्व ठिकाणांहून जवळ असलेली व सर्व ऋतूंमध्ये सदाबहार असलेली आंबोली वर्षभर गजबजलेली असते. पावसाळ्यात कडय़ावरून कोसळणा-या धबधब्यांमुळे आणि घनदाट धुक्यामुळे आंबोलीचे सौंदर्य कितीतरी पटीने वाढते.
आंबोलीचे धबधबे सर्वपरिचित आहेत. पावसाळी हंगामात लाखो पर्यटक या धबधब्याखाली स्नानाचा आनंद लुटतात. त्यामुळे आंबोलीची ‘वर्षा पर्यटन’ अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. शिवाय विविध पर्यटन स्थळांमुळे आंबोलीची ख्याती आहे. महादेवगड, नारायणगड, कावळेसाद पॉइंट, सूर्यास्त दर्शन, पूर्वीचा वस देवस्थान, शिरगावकर परिक्षित, नांगरतास धबधबा, हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान आदी प्रसिद्ध पॉइंट आहेत. या सर्व पॉइंटवरून निसर्गाचे अत्यंत विलोभनीय दर्शन घडते.
यंदाचा उन्हाळी हंगाम पर्यटकांसाठी ‘कुल कुल’च ठरला आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत ४० अंशावर तापमान गेल्याने अंगाची लाही लाही होत असताना आंबोलीत मात्र २८ अंश इतके तापमान आहे. हा सुखद बदल या वर्षी झाल्याने पर्यटकांची रीघ या ठिकाणी लागली आहे.
आता सुट्टीचा हंगाम असल्याने सहकुटुंब पर्यटक आंबोलीला मुद्दामहून भेट देऊ लागले आहेत. परिणामी सर्व हॉटेल, लॉज जवळपास आतापासूनच आरक्षित झाली आहेत. या ठिकाणी फक्त सूर्य माथ्यावर आला की काही प्रमाणात उष्मा जाणवतो. परंतु, पुन्हा सारे काही ‘कुल कुल’ होते. निसर्गाच्या या अजब चमत्कारामुळे पर्यटन स्थळात पुन्हा एकदा आंबोलीचे नाव हिल स्टेशन म्हणून गौरवले जाणार आहे.
its my village