‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाल्याने आनंद झाला. माझ्या आईसह देशातील सर्व मातांना हा पुरस्कार समर्पित करतो, असे विक्रमवीर सचिन तेंडुलकरने सांगितले.
मुंबई- ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाल्याने मला खूप आनंद झाला. माझ्या आईसह देशातील सर्व मातांना हा पुरस्कार समर्पित करतो, असे विक्रमवीर सचिन तेंडुलकरने रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
आज जो काही मी आहे तो क्रिकेटमुळे, असे सांगताना विक्रमवीर सचिन तेंडुलकरने क्रिकेटसह सर्वांचे आभार मानले. क्रिकेटमधील निवृत्तीनंतर रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सचिनने प्रसारमाध्यमांच्या सर्वच प्रश्न दिलखुलास उत्तरे दिली.
खेळपट्टी मला देवळासारखी
‘‘क्रिकेटच्या २२ यार्डाच्या खेळपट्टीने मला खूप काही दिले आहे. ती खेळपट्टी माझ्यासाठी देवळासारखी आहे. पुन्हा खेळपट्टीवर येता येणार नाही, हे मला ठाऊक होते. त्यामुळे निरोप घेताना भावूक झालो. क्रिकेटने मला घडवले. सर्व काही दिले. क्रिकेटचे माझ्यावर खूप उपकार आहेत,’’ ही सचिनने दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून गेली.
निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ
‘‘क्रिकेटमधून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ होती, असे मला वाटते. त्यामुळे त्या निर्णयाबद्दल खेद वाटत नाही, असेही त्याने स्पष्ट केले. ‘‘क्रिकेट सोडण्याचे मला दु:ख वाटत नाही. कारण आयुष्यातील ३० वर्षे मी सातत्याने क्रिकेट खेळत आहे. त्यातच क्रिकेट हे माझे फक्त आयुष्यच नाही तर माझ्यासाठी ऑक्सिजन आहे. ते पाहता खेळाशी माझे काय नाते आहे, याचा अंदाज येऊ शकतो. मला निवृत्तीबाबत सातत्याने काही वर्षे सतत विचारले जात आहेत. सांघिक कामगिरीत योगदान देऊ शकणार नाही, असे वाटेन तेव्हा निवृत्त होईन, असे मी म्हटले होते. तसे वाटल्यानंतरच मी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. मैदानावरील कामगिरी अपेक्षित होत नाही, असे मला गेल्या काही महिन्यांपासून जाणवले. मनाचे ऐकण्याचे ठरवल्याने निर्णय घेणे सोपे गेले,’’ असे सचिनने म्हटले.
थोडी विश्रांती घेऊ द्या..
‘भविष्यात काय करणार’ या प्रश्नावर मात्र सचिनने थेट उत्तर देणे टाळले.‘‘निवृत्त होऊन एक दिवसच होत आहे. ते पाहता मला २४ दिवसांची तरी विश्रांती द्या,’’ असे त्याने म्हटले.
निरोपाचा प्रसंग भावनाविवश करणारा
भारताने मालिका जिंकल्यावर खेळपट्टी सोडताना भावनांना आवर घालणे कठीण झाल्याचे सचिनने सांगितले. ‘‘संघसहका-यांनी ज्या प्रकारे मला निरोप दिला तो अतिशय भावनाविवश करणारा होता. मी सहसा भावनेला स्थान देत नाही. मात्र भारताकडून पुन्हा खेळता येणार नाही, हे माझ्यासाठी यातनादायक होते. पॅव्हेलियनकडे परतत असताना वेस्ट इंडिज संघातील क्रिकेटपटूंनी माझे अभिनंदन केले डोळ्यात अश्रू असल्याने खाली मान घालूनच सर्वाना शेकहॅँड केले,’’ असे सचिनने स्पष्ट केले.
सुनील गावस्करांचा ‘थँक यू’
शेवटच्या कसोटीत वानखेडेवर ७४ धावांवर बाद झालो तेव्हा समालोचक सुनील गावस्कर ‘थॅँक यू सचिन. थॅँक यू सचिन’ असे सतत म्हणाले. त्यांचा ‘थँक यू’ कायम लक्षात राहील.
विद्यमान क्रिकेटपटू गुणवान आणि मेहनती
सचिनने भारतीय संघातील युवा क्रिकेटपटूंचेही कौतुक केले. ‘‘संघसहका-यांमध्ये कोण चांगला हा भेदभाव करता येत नाही कारण तो सांघिक खेळ आहे. त्यात भुवनेश्वर कुमारसारखे माझे संघसहकारी मी जेव्हा खेळायला लागलो तेव्हा जन्मालाही आले नव्हते. ही बाब मी जेव्हा बोलून दाखवली तेव्हा सर्वजण मला मजेत ‘गुडमॉर्निग सर’ असे म्हणू लागले. हा विनोदाचा भाग सोडल्यास भारताचे युवा क्रिकेटपटू गुणवान आणि मेहनती आहेत,’’ याकडे सचिनने लक्ष वेधले.
अॅशेस मालिका रंगतदार होईल
येत्या गुरुवारपासून (२१ नोव्हेंबर) सुरू होणारी अॅशेस मालिका रंगतदार होईल, असे मत सचिनने व्यक्त केले. ‘‘अॅशेस मालिका ही नेहमीच रंगतदार असते. त्यातच इंग्लंड हे पुन्हा ऑस्ट्रेलियात अॅशेस जिंकण्याचा प्रयत्न करतील. याउलट ऑस्ट्रेलिया पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न करतील. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन (मुंबई इंडियन्सकडून खेळतो) अॅशेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो,’’ असे मत सचिनने व्यक्त केले.
परदेशी प्रसारमाध्यमांचा सचिनला सलाम
कराची /लंडन / मेलबर्न- क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेला विक्रमवीर सचिन तेंडुलकरबद्दल पाकिस्तानसह इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी (मीडिया) भरभरून लिहिले आहे. जवळपास सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर सचिनची निरोपाची छबी झळकली आहे. त्याच्या निरोपाच्या भावनांनाही अनेकांनी ठळकपणे प्रसिद्धी दिली आहे.
‘सचिन’ या मथळय़ाखाली अनेक प्रमुख दैनिकांनी सचिनवर अग्रलेख लिहिला आहे. इंग्लंडमधील दैनिकांनी आठवणी जागवताना सचिनच्या अविस्मरणीय कारकीर्दीचा लेखाजोगा मांडला आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वच प्रमुख दैनिक आणि टॅब्लेटनी सचिनच्या निवृत्तीच्या बातमीला छायाचित्रांसह प्राधान्य दिले असल्याचे दिसले.
आईला ‘सरप्राइझ’ देऊ शकलो नाही
माझी आई आजारी असते. तिचा विचार करून वानखेडेवर माझा शेवटचा सामना ठेवावा, अशी विनंती मी बीसीसीआयला केली होती. हे गुपित कुणाला कळू नये, असे मला वाटत होते. त्या योगो आईला ‘सरप्राइझ’ देण्याचा विचार होता. मात्र मीडियाकडून तिला ती गोष्ट समजली आणि माझे ‘सरप्राइझ’ हुकले, ही बाबदेखील सचिनने यावेळी सांगितले. आईचा त्याग आणि मोठा होण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचा त्याने पुन्हा उल्लेख केला.
अर्जुनला स्वातंत्र्य द्या
अर्जुन तेंडुलकरच्या क्रिकेट निवडीबाबत सचिनला विचारले असता ‘त्याला मोकळीक द्या,’ अशी विनंती सचिनने प्रसारमाध्यमांना केली, ‘‘मी क्रिकेटमध्ये कामगिरी केली तशीच कामगिरी माझ्या मुलाने करावी, ही अपेक्षा धरता येणार नाही. वडिलांप्रमाणे मुलाने करावे, असे अपेक्षित धरले तर माझ्या हातात वडिलांप्रमाणे लेखणी असती. मात्र तसे घडले नाही. अर्जुनला मनापासून क्रिकेट आवडते. त्यामुळे तो या खेळात आला आहे. त्याला स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. तरच तो मनमोकळेपणे खेळू शकेल,’’ असे सचिनने म्हटले.
आचरेकर सरांचे ‘वेल प्लेड’
सचिनने वानखेडे स्टेडियमवरील त्याच्या मनोगतात आचरेकर सरांनी गेल्या काही वर्षात आपल्याला ‘वेल प्लेड’ (चांगला खेळलास) म्हटले नसल्याचा उल्लेख केला होता. मात्र भारतरत्न मिळाल्यानंतर आचरेकर सरांनी आपल्याला फोन करून ‘वेल डन’ म्हटले. ही बाब आपल्यासाठी खूप मोठी आहे, असे सचिनने मोठय़ा अभिनानाने सांगितले.
‘‘भारतरत्न हा पुरस्कार खूप मोठा आहे. या पुरस्कारासाठी माझी शिफारस झाली, हा माझा सन्मान समजतो. तुम्हा सर्वांच्या वतीने हा पुरस्कार मी स्वीकारतो. देशासाठी खेळण्याची खूप इच्छा होती. २४ वर्षे खेळणे, हा अभिमान समजतो. मी योग्यवेळी निवृत्ती घेतली असे मला वाटते. माझ्या निर्णयाबाबत कुठलाही पश्चाताप नाही. यापुढे मी मैदानावर नसेन. मात्र ह्दयाने भारतीय क्रिकेटसोबत असेन,’’असे सचिनने यावेळी सांगितले.
२२ यार्डाची जागा माझ्यासाठी मंदिर आहे, क्रिकेट हा माझ्यासाठी प्राणवायू आहे, अजूनही क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यासारखे वाटत नाही, गेली २४ वर्षे देशासाठी खेळण्याचे मला अभिमान आहे, यापुढेही कुठे ना कुठे तरी आणखी क्रिकेट खेळणार आहे, देशासाठी आणखी खेळण्याची इच्छा होती, पण वयाच्या मानाने पेलवत नाही, याचे संकेत मिळाल्यामुळेच आपण निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे सचिनने सांगितले.