वसंतरावांच्या नेतृत्वामुळेच पुरोगामी, समृद्ध आणि विकासाभिमुख राज्य म्हणून महाराष्ट्र नावारूपास आला,’ असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले.
मुंबई- ‘देशभर तीव्र राजकीय अस्थिरता असताना स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला राजकीय आणि आर्थिक स्थैर्य दिले. वसंतरावांच्या नेतृत्वामुळेच पुरोगामी, समृद्ध आणि विकासाभिमुख राज्य म्हणून महाराष्ट्र नावारूपास आला,’ असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त कुलाबा येथील डॉ. होमी भाभा सभागृहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या जन्मशताब्दी सोहळय़ाचा सांगता समारोह सोमवारी पार पडला.
‘नाईक यांचे विविध क्षेत्रांतील योगदान महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी होते. नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष असताना त्यांनी आपल्याला अनेक मौल्यवान सूचना केल्या होत्या. पहिल्या तीन योजनांत असलेल्या अडचणी दूर करून चौथ्या योजनेच्या वेळी गाडगीळ समितीच्या सल्ल्यानुसार सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांच्याशी विचारविनिमय करण्यात आला. या वेळी प्रत्येक राज्याचे प्रश्न निराळे असल्याची भूमिका मांडत निधी वाटपात लवचिकता गरजेची असल्याचे मत त्यांनी मांडले होते. त्यामुळेच प्रत्येक राज्यासाठी वेगळे नियोजन करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण रोजगार हमी योजनेची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवण्यात आली,’ अशी माहिती मुखर्जी यांनी या वेळी दिली.
महाराष्ट्राला संपन्न राज्य बनवण्यासाठीचे धोरणात्मक निर्णय वसंतरावांनी घेतले होते. कापूस एकाधिकार योजना, पंचायत समित्यांबाबत निर्णय, कृषी विद्यापीठांची स्थापना आणि महाराष्ट्राला अन्नधान्याच्या दृष्टीने संपन्न बनवण्यासाठी वसंतरावांनी अखंड आणि टोकाचे प्रयत्न केले. त्यांच्या कारकीर्दीत राज्याने शेती, उद्योग, नागरीकरण, शिक्षण अशी चौफेर प्रगती केल्याचे शरद पवार यांनी या वेळी सांगितले.
या वेळी राष्ट्रपतींच्या हस्ते नाईक यांच्यावरील विशेष टपाल पाकिटाचे अनावरण करण्यात आले. तर नाईक यांच्या विधिमंडळातील भाषणांचे संकलन असलेल्या ‘चतुरस्त्र’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमास राज्यपाल के. शंकरनारायणन्, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
जन्मशताब्दीच्या निमित्ताने
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा वसंतरावांचा जन्मशताब्दी समारोह उत्सवी स्वरूपात साजरा करता आला नाही. मात्र वसंतरावांच्या विचारांवर निष्ठा ठेवून राज्य प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी बोलून दाखवला. वसंतराव नाईक यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परभणी येथील कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ असे नाव देण्याचा निर्णय झाला आहे. स्व. नाईक यांच्या जन्म गावी गहुली येथे दोन कोटी रुपये तर पुसद येथे सहा कोटी रुपये खर्च करून त्यांचे स्मारक तयार करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. या गावांना जोडणा-या रस्त्यांचे चौपदरी करून दुतर्फा झाडे लावण्यात येतील. वसंतराव नाईक यांनी शिक्षण घेतलेल्या नागपूर येथील मॉरिस कॉलेज प्रिसरात १७५० आसन क्षमतेचे सभागृह व त्यांच्या जीवनावरील संग्राहलयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.