मुंबई-गोवा महामार्गापासून आदिवासी वाड्याकडे जाणा-या रस्त्यावर चिखलच चिखल झाला आहे.
नागोठणे- मुंबई-गोवा महामार्गापासून आदिवासी वाड्याकडे जाणा-या रस्त्यावर चिखलच चिखल झाला आहे. पूर्वी खडीकरण केलेल्या रस्त्यावर ठेकेदाराने मातीचा भराव टाकून रस्त्याची वरवरची मलमपट्टी केली. मात्र, त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याचा चिखल झाला आहे. त्यामुळे गोरगरीब आदिवासींना या मार्गाने ये-जा करणे कठिण झाले आहे. या बाबत वासगाव येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते जानू कोकरे आणि येथील धनगर समुदायाने संताप व्यक्त केला आहे.
नागोठणे शहराच्या पूर्वेला अतिदुर्गम अशा डोंगराळ भागात वासगाव, कातकरवाडी, पिंपळवाडी, लाव्याची वाडी, ढोकवाडीसह अनेक वाडय़ा येतात. आठ वर्षापूर्वी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मारुती देवरे यांनी पुढाकार घेत तत्कालीन वन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रवीशेठ पाटील यांच्या माध्यमातून ५२ लाख रुपये खर्च करून या रस्त्याचे मजबुतीकरण व खडीकरण केले होते. त्यामुळे रस्ता सुस्थितीत झाला त्यानंतर रस्त्यावरून दुचाकी तसेच चारचाकी वाहने धावू लागली.
नागोठणे ते वासगाव मार्गे लाव्याची वाडी या रस्त्याची लांबी सात हजार एकशे अठरा मीटर इतकी आहे. या रस्त्याचे डांबरीकरण केले जावे, यासाठी माझ्यासह रोहे पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद गायकर, जि. प. सदस्या सखुबाई िपगळा, झिमा कोकरे, जानू कोकरे यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारकडे मागणी केल्यानंतर या रस्त्याला पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत निधी मंजूर करण्यात आला, असे मारुती देवरे यांनी सांगितले. तर, जानू कोकरे यांच्या म्हणण्यानुसार नंतरच्या काळात सरकार बदलल्याने केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे हस्ते काही महिन्यांपूर्वी भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला आणि कंत्राटदाराने कामाला प्रारंभ केला. मात्र, कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्ता चिखलात गेला आहे.
या रस्त्याचे कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर ई-टेंडर काढून कंत्राटदाराला काम देण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने पूर्वीच्या मजबूत रस्त्यावर मातीचा भराव केला. पावसाळ्यापूर्वी रस्ता आणखी मजबूत झाला असे भासवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र पावसाळ्यात रस्त्याचे खरे रुप उघडकीस आले. असे ग्रामपंचायत सदस्य झिमा कोकरे, नरेश देवरे, यशवंत आखाडे, हरीश कोकरे, महादू हंबीर, केशव कोकरे, कोंडू कोकरे, किशोर कोकरे हताशपणे सांगतात. त्यामुळे पूर्वीचा रस्ताच चांगला होता,असेही त्यांनी स्पष्ट केले. वासगाव येथे धनगर समुदाय तर इतर वाडय़ांवर आदिवासींची वस्ती आहे.
दूधविक्री, बाजारहाट, नोकरीव्यवसाय करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयासाठी दररोज नागोठणे शहरातच यावे लागत असते. सध्या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशाच झाली असल्याने या रस्त्यावरून येणार तरी कसे, असा त्यांचा सवाल आहे.
भूमीपूजन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आदिवासीवाडीवर सभा घेतली. या सभेत त्यांनी आता लवकरच एसटी बस सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासनही बारगळले आहे. एसटीचा विचार नंतर करा, निदान रस्ता पूर्वीसारखा दुरुस्त करून द्या,अशी गावक-यांची मागणी आहे. रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल कंत्राटदाराला ग्रामस्थांनी जाब विचारला तेव्हा, त्याने उर्मट उत्तरे दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा मुख्यमंत्र्याकडे तक्रार करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.