जे वातावरणात बदल घडत आहेत, ते बदल लक्षणीय आहेत. त्यामुळे लाट येते, फुटते आणि ओसरते; पण वादळ घोंगावत राहते. जी वातावरणातील नैसर्गिक स्थिती आहे, तीच नेमकी राजकीय स्थिती आज मुंबईच्या राजकीय वातावरणात निर्माण झालेली आहे. गेल्या वर्षी खूप मोठी लाट आली होती. आता ती ओसरत आहे आणि या वर्षी लाट ओसरत असताना मुंबईत एक नवीन वादळ आलेले आहे आणि हे वादळ राजकीय संदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे वेगळी दिशा देणारे वादळ आहे.
गेले तीन दिवस मुंबईत सगळीकडे हवेत धूळ भरून राहिली आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी पौर्णिमा असते. त्यामुळे सागरालाही उधाण आलेले आहे. लाटा जोरात उठलेल्या आहेत. पण लाटांचा गुणधर्म असा की, लाट टिकत नाही. ती फुटते आणि ओसरते; पण गेल्या काही दिवसांत अचानक आलेले वादळ मुंबईभर टिकून आहे. विमाने उतरवताना एक ‘व्हिजीबिलीटी’ नावाची गोष्ट वैमानिकासाठी आवश्यक असते. किमान पाच हजार फुटावरून धावपट्टी दिसायला हवी, तर वैमानिकाला विमान उतरवणे सोपे होते आणि सुरक्षितही होते. गेल्या काही दिवसांत वातावरणात विलक्षण बदल झाले आहेत आणि पश्चिम किना-यावर एक मोठे वादळ आले आहे. या वादळाचा परिणाम असा झाला आहे की, कोचीनपासून पोरबंदरपर्यंतची पश्चिम सागरावरील बंदरे असुरक्षित झाल्याने या बंदरांमधल्या बहुसंख्य जहाजांना सुरक्षित बंदरांचा आसरा घ्यावा लागला आहे. मुंबईभर सगळीकडे हवेत या वादळाचे परिणाम जाणवत आहेत. एक धुसरपणा आलेला आहे. उन्हाचा तडाखा किंचित कमी झालेला आहे. गार वारेही सुटलेले आहेत. एप्रिल महिन्याला विसंगत अशी ही नैसर्गिक परिस्थिती वातावरणात आज भरून राहिलेली आहे. त्यामुळे मुंबईतले हे नैसर्गिक वातावरण बदल वृत्तपत्रांची बातमी ठरले. छायाचित्रकारांसाठी छायाचित्रांचे विषयही ठरले. लाट ओसरणे, हा जसा निसर्गाचा नियम आहे, तसा वादळ येणे हाही निसर्गनियम आहे.
जे वातावरणात बदल घडत आहेत, ते बदल लक्षणीय आहेत. त्यामुळे लाट येते, फुटते आणि ओसरते; पण वादळ घोंगावत राहते. जी वातावरणातील नैसर्गिक स्थिती आहे, तीच नेमकी राजकीय स्थिती आज मुंबईच्या राजकीय वातावरणात निर्माण झालेली आहे. गेल्या वर्षी खूप मोठी लाट आली होती. आता ती ओसरत आहे आणि या वर्षी लाट ओसरत असताना मुंबईत एक नवीन वादळ आलेले आहे आणि हे वादळ राजकीय संदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे वेगळी दिशा देणारे वादळ आहे. या वादळात अनेक प्रस्थापितांची पडझड होणार आहे. अनेक मोठी झाडे पडणार आहेत. अनेक मोठी नावे छोटी ठरणार आहेत आणि हे नैसर्गिक वादळ आज जसे पश्चिम किनारपट्टीला आहे तसे मुंबईतले राजकीय वादळ पूर्व किनारपट्टीला आहे, फरक एवढाच आहे. पूर्व आणि पश्चिममध्ये एकच रस्ता आहे. पश्चिमेकडून थोडसे पूर्वेला सरकल्यानंतर पश्चिम द्रूतगती मार्ग आहे. त्याला अजून कोणी पूर्व द्रुतगती मार्ग म्हणत नाही. या द्रूतगती महामार्गावर उभे राहिल्यानंतरही वांद्रे पूर्वमध्ये आलेल्या वादळाची जाणीव आता लोकांना होऊ लागलेली आहे. हे वादळ निर्माण करणारे जे नेते आहेत त्यांचे नाव अर्थातच नारायण राणे. ते या निवडणुकीला उभे नसते, तर वांद्रे पूर्वची ही वादळी निवडणूक वृत्तपत्रांनी सिंगल कॉलममध्ये बातमी म्हणून आतल्या पानात घेतली असती. तासगावलाही याच दिवशी विधानसभा निवडणूक आहे. तिथेही आमदाराच्या दु:खद निधनामुळेच पोटनिवडणूक होत आहे. त्या मृत आमदाराची पत्नीच तिथे निवडणुकीला उभी आहे. पण त्या तासगावच्या निवडणुकीची बातमी होत नाही. तिथे वादळ उठत नाही. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये ऑक्टोबर २०१४ च्या निवडणुकीत आलेली लाट आता पूर्णपणे ओसरून गेली आहे आणि नारायण राणे यांच्या नावाचे वादळ आता तिथे घोंगावत आहे, हेही आता मतदारांना जाणवू लागले आहे. राणेसाहेब या निवडणुकीला उभे नसते, दुसरा कोणी उमेदवार उभा असता तर वांद्रे पूर्व मतदारसंघाचाही तासगाव मतदारसंघ झाला असता; पण व्यक्ती महात्म्याचे सामर्थ काय असते याचा प्रत्यय वांद्रे पूर्व निवडणुकीत येत आहे. या मतदारसंघातला सगळा समाज आता आपला आवाज उठवणारा कोणी तरी आपल्या बरोबर उभा आहे, या जाणीवेनेच खडबडून जागा झाल्यासारखा दिसतो आहे. त्यामुळे या निवडणुकीत हे वादळ येण्याचे पहिले गमक नारायण राणे यांची उमेदवारी आहे. हे वादळ आल्यानंतर सगळय़ा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. या मतदारसंघात ढिगभर प्रश्न आहेत आणि हे प्रश्न लावून धरणारा आमदार या मतदारसंघात नव्हता. त्यामुळे या निवडणुकीचे स्वरूप काहीसे एकतर्फी होईल, अशी अनेक राजकीय पंडितांनी वर्तवलेली शक्यता आहे. ज्यांनी हे वादळ आणले ते नारायण राणे सध्या सत्तेत नाहीत; पण जेव्हा वादळ येत असते, तेव्हा ते सत्तेत आहेत की नाहीत, याचा विचार कोणीच करत नसते. खुद्द नारायण राणे हेही आपण सत्तेत आहोत, की नाहीत, यापेक्षा लोकांना न्याय कसा देता येईल, याचे तंत्र आणि मंत्र त्यांना माहीत आहे. या मतदारसंघात अन्य पक्षाचे दोन उमेदवार आहेत. त्यातल्या एका उमेदवारातर्फे प्रचार करताना सेनेच्या खासदाराने प्रश्न मुद्दाम उपस्थित केला आहे की, राणेसाहेब जुहूला राहतात. मोदी वाराणसीत उभे राहिले, तेव्हाही हाच प्रश्न लोकांना विचारता आला असता. राणेसाहेब कुठे राहतात, हा प्रश्न गौण आहे. त्यांचे कार्यालय कुठे आहे, हा प्रश्नही गौण आहे. जेव्हा त्यांच्या नावाचे वादळ घोंगावते, तेव्हा हा नेता कुठे राहतो आणि कुठे बसतो, हे प्रश्न गौण ठरतात. कारण मतदारांना एक निश्चित खात्री अशी आहे की, नारायण राणे हा नेता कुठेही बसो, कुठेही असो, विधानसभेत निवडून गेल्यानंतर लोकांच्या प्रश्नासाठी फडणवीस सरकारच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाहीत. कोणता प्रश्न कसा लावून धरायचा, सरकारला कोंडीत कसे पकडायचे, विधानसभेतील संसदीय आयुधे कशी वापरायची, हे राणेसाहेबांना जेवढे माहिती आहे, तेवढे फार थोडय़ांना माहिती आहे. धनुष्य-बाण ही पक्षाची नुसती निशाणी असून भागत नाही. त्या धनुष्याला प्रत्यंचा लावता आली पाहिजे आणि प्रत्यंचा लावल्यानंतर धनुष्य खेचता आले पाहिजे. शेती करताना जसे लुमन कसे धरायचे हे त्या शेतक-याला माहीत असायला लागते, नाही तर फाळ एकीकडे आणि लुमन एकीकडे. त्याचप्रमाणे धनुष्यबाण निशाणी घेणा-यांना तो बाण चालवता आला पाहिजे. कारण सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाताशिवाय बाण चालणार कसा? त्यामुळे धनुष्यबाण निरुपयोगी ठरतो आणि हात प्रभावी ठरतो. राणेसाहेबांचे वादळ प्रभावी ठरते, याचे कारण सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवणारा एक तगडा नेता, त्यामुळे विधानसभेत एक नवे वादळ उभे करू शकेल. ही हिंमत त्यांच्यात आहे आणि म्हणूनच सरकारी कर्मचा-यांची वांद्रे पूर्व येथील वसाहत जर उद्या सरकार पाडायला आले तर त्या बुलडोझर पुढे उभे राहण्याची हिंमत असलेला नेता म्हणजे राणेच आहेत आणि त्या वादळातच ती शक्ती आहे. मुंबईत सध्या आलेले नैसर्गिक वादळ काही दिवसांनी निघून जाईल; पण नारायण राणे यांच्या रूपाने आलेले वादळ महाराष्ट्रात काँग्रेसला शक्ती देऊन जाईल.
[EPSB]
महाराष्ट्र आणि पंजाब
घुमानचे साहित्य संमेलन चांगलेच घुमले आहे, गाजले आहे. मराठीचा गजर पंजाबमध्ये झाला. याचाही काही संदर्भ आहे. देशाच्या कोणत्याही राज्याला कमी न लेखता असे ठामपणे सांगता येईल की, पंजाब आणि महाराष्ट्राचे नाते काही वेगळे आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल, क्रांतिकारकांच्या चळवळीत महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल याचे नाते काही वेगळे आहे.
[/EPSB]