बिरवाडी ग्रामपंचायतील २५ वष्रे जुन्या पाणीपुरवठा योजनेतील साठवण टाकीला गळती लागली आहे.
शहापूर- बिरवाडी ग्रामपंचायतील २५ वर्षे जुन्या पाणीपुरवठा योजनेतील साठवण टाकीला गळती लागली आहे. साठवण टाकी आणि पाइपलाइनमधून पाणी झिरपत असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. बिरवाडी गाव व जवळील ५ आदिवासी पाडय़ांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या एकमेव पाणीपुरवठा योजनेतून होतो. त्यामुळे या योजनेद्वारा भातसा धरणातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा उपसा करूनही बिरवाडीवासीयांना ऐन पावसाळय़ात पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
पंचाहत्तर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या बिरवाडी ग्रामपंचायतील बिरवाडी, पेंढरघोळ, सासेपाडा, मेंगाळपाडा, कातकरी वाडी, लिमनपाडा या आदिवासी पाडय़ांना सध्या साठवण टाकीला गळती लागल्याने अपुरा पाणीपुरवठा होत आहे. गावात पाण्याचे अन्य जलसाठे असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. बिरवाडीत जीवन प्राधिकारणाने राबविलेली पाणी योजना ही जुनाट असल्याने पाइपलाइन व साठवण टाकीला गळती लागली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने योजनेवर लाखो रुपये खर्च करून तात्पुरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाइपलाइनची गळती थांबत नसल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे येथे लोखंडी पाइपलाइन टाकावी आणि नवीन साठवण टाकी बांधावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
पावसाळय़ात मुख्य जलस्त्रोत भरले असले तरी साठवण टाकीला गळती असल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बिरवाडी पाणी योजनेची पाइपलाइन बदलावी आणि २ लाख लिटर क्षमतेची नवीन टाकी बांधावी. तसेच पेंढरघोळसाठी पूरक पाणीपुरवठा योजना राबवावी. – पद्मा बरोरा, पंचायत समिती सदस्य
भारनियमनाचा फटका
विद्युत मंडळाच्या मनमानी कारभाराचा फटकाही बिरवाडी व परिसरातील आदिवासींना बसत आहे. गेल्या महिनाभरापासून विविध दुरुस्तीच्या नावाखाली वीज मंडळातर्फे गावाचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. याचा परिणामही येथील पाणी योजनांवर होत आहे. खर्डी परिसरातील सुमारे १५ हजार लोकवस्तीला पाणीपुरवठा करणारे पाणी उपसा पंप हे भातसा पाणलोट क्षेत्रात कार्यरत आहे. बिरवाडी व सारंगपूरी पाणी योजनेचे पंप ही इथेच कार्यरत आहेत. सततच्या भारनियमनामुळे खर्डी, बिरवाडी व सारंगपूरी परिसरातील सुमारे २० ते २५ हजार लोकांना अपु-या पाणी उपसामुळे कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, याबाबत शहापूर महावितरणचे उपअभियंता जेकब वर्गीस यांच्याशी संपर्क साधला असता तांत्रिक दोष शोधण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, येथील कंपन्यांना अधिक दाबाने वीज पुरवठा करण्यासाठी वीज मंडळातील अधिकारी व कर्मचारी येथे वीज खंडित करतात, असा आरोप आटगांवचे सरपंच भास्कर बरोरा यांनी केला आहे.