सर्व सणांप्रमाणे स्वातंत्र्यदिनही चाळीत धूमधडाक्यात साजरा होई. गुढीपाडव्याला घरोघरी गोड पदार्थ असेच. पण त्या दिवशी गोड पदार्थ तोंडात टाकण्याआधी कडुनिंबाची पानं आणि गूळ खाण्याची पद्धत या आयटीच्या जगात विसरलो नाही. यासारख्या कितीतरी चांगल्या सवयी चाळीने लावल्या..
वयाची सत्तरी उलटली तरीही डिलाइल रोडच्या इराणी चाळीच्या आठवणी विसरू शकत नाही. आज मी जी आहे ती या चाळीत घडले. शिस्त, चांगले संस्कार आणि निर्भयता याचं शिक्षण तिथंच मिळालं. शेजारधर्म कधीच विसरलो नाही; कारण सर्व चाळकरी म्हणजे एक कुटुंब होतं. भोगले, नाईक, सावंत, कांडरकर या मालवणी तर देसाई, पाटील या घाटावरच्या लोकांचा शेजार आम्हाला लाभला. गोडीगुलाबीने राहणं, हे आम्हा सर्वाचं वैशिष्टय होतं. सर्व खोल्या प्रत्येकी दहा बाय दहाच्या होत्या. प्रत्येक घरात सहा ते सात मुलं आणि आई-वडील असं दहा ते अकरा जणांचं बिहा-ड होतं. काही बिहा-डात तर आजी-आजोबा, चुलता-चुलतीही असायचे. गावातून पै-पाहुणेही यायचे.
एक-दोन दिवसांच्या नाहीतर चांगले पंधरा पंधरा दिवसांच्या मुक्कामाला. पण कधी ‘गर्दी होतोय,’ अशी कुरबूर कानावर आली नाही. खोलीसमोरच्या ‘कॉमन गॅलरी’चा वापर प्रत्येकाकडून व्हायचा. माझी आई इथेच बसून मोठया जात्यावर दळण दळीत असे. रेशनिंगचे तांदूळ कांडीत (सडीत) असे. शेजारच्या बायकाही मदतीला येत. आम्ही दोघी किंवा तिघी मिळून तांदूळ कांडीत असू. त्यावेळी चुली होत्या. त्यावर उतू गेलेल्या चहाचा वास अजूनही माझ्या लक्षात आहे. सर्व सणांप्रमाणे स्वातंत्र्यदिनही चाळीत धूमधडाक्यात साजरा होई. गुढीपाडव्याला गोड पदार्थ असेच. हा गोड पदार्थ तोंडात टाकण्याआधी कडुनिंबाची पानं आणि गूळ खाण्याची पद्धत या आयटीच्या जगात विसरलो नाही. होळीला घरोघरी पुरणपोळया नि कटाची आमटी, असा फर्मास बेत असायचा.
नागपंचमीला खांटोळी, दहीहंडीला शेगलाची भाजी नि आंबोळी, गणपतीला उकडीचे मोदक अशा कितीतरी पक्वान्नांचा घाट चाळीत घातला जाई. आणि मुख्य म्हणजे या सर्व जिन्नसांची एकमेकांना देवाणघेवाण केली जायची. गणपतीच्या पहिल्या दिवशी कांडरकर मामींकडे आमच्या मजल्यावरच्या ११ खोल्यांना जेवणाचं आमंत्रण असे. त्यांच्या मदतीला मला माझी आई पाठवीत असे. तिथंच मी साच्याच्या वापराशिवाय उकडीचे मोदक सुबक करायला शिकले. दिवाळीच्या फराळाच्या सामानाची जमवाजमव तर महिनाभर अगोदरच सुरू होई. दिवाळीही अशीच धूमधडाक्यात साजरी होई. दिवाळीला आम्ही स्वत: कंदील बनवायचो. दारापुढे कलात्मक रांगोळी काढायचो. माझे शेजारीही माझ्याकडून रांगोळी काढून घ्यायचे.
चाळीतील बहुतेक लोक गिरणीत नोकरीला होते. त्यामुळे त्यांना दिवसपाळी व रात्रपाळी असे. रात्रपाळीवाल्यांना झोप मिळावी म्हणून दुपारी आम्हा मुलांवर गडबड न करण्याचं बंधन असे. संध्याकाळी आमच्या खेळांना ऊत येई. व्हरांडय़ात बाहुला-बाहुलीचं लग्न लावलं जाई. त्यावेळी ठकी नावाची लाकडी बाहुली मिळायची. ज्यांच्याकडे नसायची ते हिराच्या झाडूपासून बाहुली तयार करायचे. बाहुलीचं लग्न लागल्यानंतर संध्याकाळी नाटक बसवण्याचा कार्यक्रम चालायचा. कोऱ्या नऊवारी साडीची घडी मोडण्याचा मान मला मिळत असे. म्हणून लहानपणापासूनच मी नऊवारी नेसायला शिकले.
नळ सार्वजनिक होता. कधीतरी बायकांचे वादविवाद होत; परंतु ते तेवढय़ापुरतंच. वसईचे दादा दूध घेऊन येत. त्यांना गव्हाचा कोंडा देऊन दूध घ्यायचो. शिळं अन्न घ्यायला दुस-या दिवशी सकाळी सखू यायची. ताजे मासे घेऊन गंगू कोळीण यायची. आणीबाणीच्या परिस्थितीत चाळकरी आपल्या चाळीच्या रक्षणासाठी रात्रीचा पहारा द्यायचे. त्या पहारेकरांना प्रत्येक घरांतून खाणं, चहा दिला जाई. सगळी चाळच जागरुक असायची.रात्रीच्या वेळी जेवणं झाली की, आम्हा मुलांना शेजारचे वामन मामा गोष्टी सांगत. दुस-या बाजूला सर्व बायका आणि आबामामा यांच्या गजाली रंगायच्या. मंडळी या आठवणी न संपणा-या आहेत. पुढचे सात जन्मही पुरणार नाही.
आज चाळ दुरुस्तीच्या नावाखाली अनेक वर्ष बिल्डरच्या ताब्यात आहे. सर्व बि-हाडं सायनला प्रतीक्षा नगरमध्ये राहतात. अनेक जण हयात नाहीत. चाळीतली आपली खोली म्हणजेच थोरलं घर केव्हा मिळेल, याची वाट बघत आहेत.