बारा वर्षे उलटूनही इमारतीचा पत्ता नाही, शैक्षणिक वातावरण नाही; विद्यार्थ्यांची गैरसोय
वाडा – वाडा तालुक्यातील आमगाव परिसरातील आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावेत यासाठी आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत १५ जून २००६ मध्ये आमगाव येथे आश्रमशाळेची स्थापना करण्यात आली. मात्र बारा वर्षे उलटूनही येथे इमारत झालेली नसल्याने विद्यार्थाना दाटीवाटीने भाडय़ाच्या इमारतीत शिक्षण घ्यावे लागते. परिणामी विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
आदिवासी विकास विभागाकडून तालुक्यात पाली, गारगाव, गुहीर, गुंज व आमगाव येथे शासकीय आश्रमशाळा आहेत. यातील गुंज व आमगाव या आश्रमशाळांना स्वतंत्र इमारती नाहीत. गुंज या आश्रमशाळेची इमारत मोडकळीस आल्याने येथील विद्यार्थाना पाली येथील आश्रमशाळेत गेल्या दोन वर्षापासून हलविण्यात आले आहे. तर आमगाव येथील आश्रमशाळा भाडय़ाच्या घरात भरवली जात आहे. आमगाव येथे पहिली ते दहावीपर्यंतची शाळा असून या शाळेत ३६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये मनोर, जव्हार, वाडा, विक्रमगड, नाशिक व ठाणे येथील विद्यार्थी आहेत. सन २००६ मध्ये या शाळेची स्थापना करण्यात आली. आज बारा वर्षे उलटूनही या शाळेला इमारत उपलब्ध झालेली नाही. भर गावात ही शाळा असून येथील पाच घरे भाडय़ाने घेण्यात आली असून, तेथेच शिक्षण व राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पाच घरे भाडय़ाने घेतली असतानाही ही जागा अपूर्ण पडते. कधी या घरात तर कधी त्या घरात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चकरा माराव्या लागतात. शाळा गावातच असल्याने आनंददायी शिक्षणाची वानवा असल्याचे दिसून येते. शाळेकडून इमारतीसाठी केव्हाच प्रस्ताव गेला आहे. मात्र हा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. येथे आदिवासी विकास विभागाने दोन एकर जागाही विकत घेतली आहे. मात्र इमारतीचे घोडे कुठे आडले, असा सवाल येथील आदिवासी बांधव विचारत आहेत.
राज्यात हजारो आश्रमशाळा व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे चालवली जातात. मात्र अनेक आश्रमशाळा व वसतिगृहांची अवस्था यापेक्षा वेगळी नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे वाडय़ाचे सुपूत्र विष्णू सवरा हे भाजप सरकारमध्ये आदिवासी विकासमंत्री आहेत. गेली चार वर्षे ते या विभागाचा कार्यभार हाकतात. मात्र त्यांच्या तालुक्यात असलेल्या आश्रमशाळांना गेल्या चार वर्षात इमारती होऊ शकत नाहीत, ही शोकांतिका म्हणावी लागेल.
एकच स्नानगृह व शौचालयावर विद्यार्थिनींचा भार
आमगाव येथील आश्रमशाळेत एकूण १७७ मुली शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थिनींसाठी एक स्नानगृह व शौचालय आहे. पहाटे पाच वाजल्यापासून उठून विद्यार्थिनींना नंबर लावावे लागतात. त्यानंतर विद्यार्थ्यांचा नंबर लागतो. त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय होते. त्यातच वीज गेल्यावर विहिरीवरून पाणी आणावे लागत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
आमच्याकडून केव्हाच नवीन इमारतीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
– सुरेश भांगरे, मुख्याध्यापक
आमगाव आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत त्याला मंजुरी मिळालेली नाही.
— पी. एस. सोनाळीकर,
बांधकाम अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार