मालवण-कसाल रस्त्यावरील खड्डेप्रकरणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आक्रमक, बांधकाम अधिका-यांना धरले धारेवर
मालवण – मालवण-कसाल मुख्य रस्ता खड्डेमय बनला आहे. वाहनचालकांना याच खड्डेमय रस्त्यातून वेदनादायी प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष व स्थानिक आमदार-खासदार अपयशी ठरल्याने रस्ते खड्डेमय बनले आहेत. असा आरोप करत दोन दिवसांत खड्डे बुजवण्याची कार्यवाही न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे देण्यात आला आहे.
खड्डेमय रस्ता प्रश्नी स्वाभिमान पदाधिकारी यांनी सोमवारी बांधकाम अधिका-यांना आनंदव्हाळ येथे बोलवत रस्त्याची दुर्दशा दाखवली. यावेळी उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांनी चतुर्थी पूर्वी खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. सुरुवातीला मुख्य रस्त्यावरील मोठे खड्डे पावसाळी डांबर वापरून तर अन्य खड्डे जांभ्या दगडाने बुजवले जातील. तर पावसानंतर डांबरीकरणाने सर्व खड्डे बुजवले जातील. अशी माहिती दिली.
यावेळी स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा सरचिटणीस महेश जावकर, लोकसभा मतदारसंघ उपाध्यक्ष बाबा परब, तालुकाध्यक्ष मंदार केणी, सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, नगरसेवक यतीन खोत, विभाग अध्यक्ष अशोक चव्हाण, गोळवण सरपंच संजय पाताडे, सतीश आचरेकर यासह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. जांभ्या दगडाने खड्डे बुजवल्यास पुन्हा खड्डे पडणारच. बुजवलेल्या खड्डय़ाचा उपयोग होणार नाही. तरी पावसाळी डांबरानेच खड्डे बुजवावेत. मालवण शहराच्या प्रवेशद्वारावर देऊळवाडा मार्गावर मोठमोठे खड्डे आहेत. हे सर्व खड्डे डांबराने गणेश चतुर्थीपूर्वी बुजवावेत, अशी भूमिका नगरसेवक यतीन खोत यांनी मांडली.
सत्ताधा-यांच्या अपयशी कारभारामुळे खड्डे
स्थानिक आमदार, खासदार आपल्या चार वर्षाच्या कारभारात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. सर्वच रस्ते खड्डेमय आहेत ही शोकांतिका आहे. सत्ताधा-यांच्या अपयशी कारभारामुळे रस्ते खड्डेमय झाल्याचा आरोप मंदार केणी, अशोक सावंत, बाबा परब यांनी केला.