‘अच्छे दिन येणार’ असे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात सत्ता मिळविणा-या युती सरकारने सर्वाचीच घोर निराशा केली आहे. पारदर्शी कारभार असल्याचा डंका पिटणा-या राज्यातील देवेंद्र व केंद्रातील नरेंद्र मोदीच्या सरकारात देशविदेशातील पर्यटकांना देखील ‘बुरे दिन’ भोगावे लागत आहेत.
‘अच्छे दिन येणार’ असे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात सत्ता मिळविणा-या युती सरकारने सर्वाचीच घोर निराशा केली आहे. पारदर्शी कारभार असल्याचा डंका पिटणा-या राज्यातील देवेंद्र व केंद्रातील नरेंद्र मोदीच्या सरकारात देशविदेशातील पर्यटकांना देखील ‘बुरे दिन’ भोगावे लागत आहेत. पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आलेल्या सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावरच गोवा सीमेवरील इन्सुली आरटीओच्या तपासणी नाक्यावर स्थानिक दलालाकरवी आरटीओ विभागाकडून पर्यटक व वाहनचालकांची लूट राजरोसपणे सरू आहे.
अवजड वाहनांबरोबरच पर्यटकांच्या वाहनांना अडवून या ना त्या कारणाने दंडात्मक कारवाईच्या नावाखाली लाखो रुपयांचे तोडकाम या नाक्यावर सुरू आहे. विशेष म्हणजे काही स्थानिकांना हाताशी धरून आरटीओ अधिकारी या दलालांकरवी लाखोंची लूट करीत आहेत. तर या अधिका-यांच्या जीवावर स्थानिक दलालही गब्बर झाल्याने या नाक्याची अवस्था ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ अशीच झाली आहे.
गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन राज्य असल्याने देशविदेशातील पर्यटक तिन्ही हंगामात गोव्यात ये-जा करीत असतात. राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वरून पर्यटकांची वाहने जात असतात. याच महामार्गावर झाराप-पत्रादेवी बायपासवर गोवा सीमेवरील बांदा-इन्सुली येथे आरटीओ व पोलीस विभागाची दोन तपासणी नाकी सुरू करण्यात आली आहेत. यापूर्वी आरटीओचे तपासणी नाके जुन्या इन्सुली मार्गावर होते. वरिष्ठ कार्यालयाकडून कोणताही आदेश नसताना अधिका-यांच्या संगनमताने हे तपासणी नाके बेकायदेशीररित्या बायपासवर थाटण्यात आले आहे. मुळात महामार्गावरील तपासणी नाकी बंद करण्याचा आदेश असतानाही हे तपासणी नाके सुरू आहेत. वाहनांची तपासणी भरारी पथकाद्वारे करण्याची सूचना आरटीओ अधिका-यांना असतानाही इन्सुलीत बसून हे अधिकारी वाहन तपासणीच्या नावाखाली पर्यटकांना लुटत आहेत.
या तपासणी नाक्यावर रोटेशन पद्धतीने अधिकारी डय़ुटी बजावत असले तरी या विभागात खादाड संस्कृती बळावल्याने प्रत्येक अधिकारी या नाक्यावर मलई खात असताना दिसतो. किंबहुना हे तपासणी नाके क्रीम चेकपोस्ट म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेत. या नाक्यावर डय़ुटी करण्यासाठी काही अधिकारी वरिष्ठांना वशिला लावून येतात. वाहनधारक, पर्यटकांत जागृती झाल्याकारणाने लाचलुचपत विभागाच्या जाळय़ात अडकू नये यासाठी या अधिका-यांनी नामी शक्कल लढविली आहे.
एखाद्या वाहनधारकाकडून स्वत: पैसे न स्वीकारता त्यांनी स्थानिक दलाल ठेवले आहेत. काही स्थानिक दलालांकरवी हे अधिकारी वाहनधारकांकडून पैशांची मागणी करीत असतात. या चेकपोस्टवर अधिका-यांपेक्षा या दलालांचाच वरचष्मा आहे. या चेकपोस्ट परिसरात हे दलाल रात्रंदिवस घिरटय़ा घालत असतात. एखाद् दुसरा कागद कमी असला की त्या वाहनधारकाला हे अधिकारी या दलालांच्या स्वाधीन करतात. सावज आयतेच गळाला लागल्याने हे दलाल संबंधित पर्यटक चालकांना कोप-यात घेऊन सेटलमेंट करतात. विशेष म्हणजे दलालांचा हा शासकीय कामातील हस्तक्षेप अधिका-यांच्या डोळय़ादेखत सुरू असतानाही हे अधिकारी धृतराष्ट्राची भूमिका घेऊन बसलेले असतात.
या दलालांमुळे इन्सुलीतील आरटीओ तपासणी नाक्याची प्रतिमा दिवसेंदिवस मलीन होत चालली असून पर्यटकांत आरटीओ विभागाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. या नाक्यावर दरमहा १ लाख रुपये पकडले तर किमान वर्षाला १ कोटी रुपये या दलालांकडून सहजरित्या या अधिका-यांना मिळत आहेत. मुख्य म्हणजे याबाबत पर्यटकही कोणत्याही प्रकारची तक्रार करताना दिसत नाही. पर्यटक हे परराज्यातील असल्याने त्यांच्याशी वादविवाद करण्यापेक्षा हे पर्यटक या दलालांच्या हातात नोटी कोंबून मार्गस्थ होतात. पर्यटकांच्या या दुखण्याचा फायदा घेऊन दलालांकरवी हे अधिकारी पर्यटकांची लुटमार करीत आहेत.
या तपासणी नाक्याच्या जीवावर या अधिका-यांचे हे दलाल गब्बर झाले आहेत. यातील एका दलालाने आलिशान बंगला बांधला असून स्विमिंग टँक, परदेशी माशांचे टँक बंगल्याच्या परिसरात बांधले आहेत. अधिकारी व या दलालांची मिलीभगत असल्याने या नाक्यावर दिवसरात्र वाहनधारकांची लूट सुरू आहे. वाहनधारकांची ही होणारी लूट ऐकिवात आल्यानंतर ब-याच वेळा काही राजकीय पुढा-यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रारी देखील केल्या होत्या.
वरिष्ठांकडे तक्रार आल्यानंतर काही दिवस या दलालांना हे अधिकारी भूमिगत करतात. मात्र, पुन्हा या दलालांना बोलावून ‘ये रे माझ्या मागल्या’ या म्हणीप्रमाणे त्यांचे हे लुटमारीचे काम सुरूच असते. दरम्यान, आरटीओकडून होणा-या या आर्थिक लुटारूपणामुळे पर्यटकांच्या मनात जिल्हय़ातील आरटीओ पोलिसांबाबत प्रतिमा मलीन होत चालली आहे. तर पर्यटकांची होणारी ही लूट थांबणार कधी असा सवाल पर्यटकांमधून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने या जिल्हय़ातही देशविदेशातील पर्यटकांचा ओढा वाढत चालला आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्ग जिल्हय़ातून गेल्यामुळे पर्यटकांची ये-जा या महामार्गावर होत असते. असे असताना पर्यटकांना सहकार्य किंवा त्यांचे आदरातिथ्य करायचे सोडून जिल्हय़ाच्या प्रवेशद्वारावरच इन्सुली आरटीओ तपासणी नाक्यावर दलालांकरवी पर्यटकांची राजरोसपणे लुटमार सुरू आहे. अवजड वाहनांबरोबरच पर्यटकांच्या वाहनांना अडवून किरकोळ कारणे पुढे करून कारवाईच्या नावाखाली लाखो रुपयांचे तोडकाम या नाक्यावर सुरू आहे. स्थानिक दलालांना हाताशी धरून आरटीओ अधिकारी वाहनधारकांची लुटमार करीत आहेत. तर या अधिका-यांच्या जीवावर हे दलाल देखील गब्बर झाल्याने या नाक्याची गत ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ अशीच झाली आहे.