मुंबई महापालिकेचा चुकीचा प्रारूप विकास आराखडा मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्याने मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना जाग आली आहे.
मुंबई- मुंबई महापालिकेचा चुकीचा प्रारूप विकास आराखडा मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्याने मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना जाग आली आहे. हा आराखडा बनवणा-या सल्लागार कंपन्यांची चौकशी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी घेतला आहे. या आराखडयात मोठया प्रमाणात चुका झाल्यामुळे याचे खापर महापालिकेच्या नावावर फोडले गेले.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी विकास नियोजन विभागातील वरिष्ठ पदावरील अधिकारी, सर्व सल्लागार कंपन्यांचे प्रमुख तसेच वास्तुविशारद यांची एक बैठकच आयुक्तांनी आयोजित केली आहे. त्यात आराखडयाबाबत आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाबाबत चर्चा केली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रारूप विकास आराखडयात चुकांचे प्रमाण अधिक असल्यामुळे तो रद्द केला आहे. त्यानंतर हा विकास आराखडा बनवणा-या सल्लागार कंपन्यांची चौकशीचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने पावले उचलली आहेत.
गुरुवारी विकास आराखडयात नक्की चुका कुणामुळे झाल्या? कशामुळे झाल्या? या सर्वाची कारणे जाणून घेण्यासाठी आयुक्त सीताराम कुंटे यांनी विकास नियोजन विभागांसह कंपन्यांच्या प्रमुख अधिका-यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्वच प्रकरणांवर चर्चा होणार आहे. या बैठकीला विद्यमान भू वापर नकाशा बनवणारे ‘आरेवा’, सल्लागार कंपनी असलेली मेसर्स ग्रुप एसीई आणि ईजीस जीवो कंपनी आदी कंपन्यांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याशिवाय व्ही.व्ही.पाठक हे वास्तुविशारदही उपस्थित राहणार आहे. महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सर्व गोष्टींचा विचार करून कंपन्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा-मनसेची मागणी
मुंबईचा प्रारूप विकास आराखडा जनतेसमोर मांडून त्यावर हरकती व सूचना जाणून घेतल्या जात होत्या. असे असताना मुख्यमंत्र्यांनी हा नियोजित विकास आराखडाच रद्द केला. त्यामुळे आधी नको त्या भूखंडावर आरक्षणे टाकून जनतेत गोंधळ आणि भीती निर्माण केली. त्यानंतर आता हा विकास आराखडाच रद्द झाल्यामुळे पालिकेचेही १२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी मनसे नगरसेवक व सुधार समितीचे सदस्य संतोष धुरी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्तांना निवेदनही सादर केले.
विकास आराखडा तयार करणा-यांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई शहराचा प्रस्तावित वादग्रस्त विकास आराखडयातील त्रुटी व चुका हेतूपुरस्सर करण्यात आल्या आहेत की चुकून झाल्या आहेत हे तपासण्यासाठी संबंधितांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सूत्रांकडून समजते.
मुंबईचा वादग्रस्त आराखडा तयार करताना सरकारचे कोटय़वधी रुपये पाण्यात गेले आहेत. त्यास जे अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांसह अन्य पक्ष, संघटनांकडून करण्यात येत आहे.
राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करून याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. मोकळया आरक्षित भूखंडावरील झोपडपट्टया वगळणे, धार्मिक स्थळे, कोळीवाडे, आदिवासी पाडे वगळण्याच्या त्रुटींची कसून चौकशी करण्यात येणार आहे.