माझ्या आयुष्याची जमापुंजी खर्च करून जमीन घेतली, घर बांधले. महामार्ग चौपदरीकरणासाठी माझी सर्व जमीन सरकारने काढून घेतली तर मी कोठे राहू? माझ्या वयाची ७२ वर्षे पूर्ण झाली.
कणकवली – माझ्या आयुष्याची जमापुंजी खर्च करून जमीन घेतली, घर बांधले. महामार्ग चौपदरीकरणासाठी माझी सर्व जमीन सरकारने काढून घेतली तर मी कोठे राहू? माझ्या वयाची ७२ वर्षे पूर्ण झाली. पुन्हा घर बांधण्याचे माझे वय तरी आहे का? अधिका-यांकडून चोर पावलाने येऊन जमिनीची मोजणी केली जाते.
विचारायला गेल्यास उद्धट उत्तरे दिली जातात. मिळतील ते पैसे घ्या, अन्यथा सरकोर ही जमीन जबरदस्तीने घेणार आहे, असे सांगून आम्हाला भीती दाखविली जाते. घर, जमीन, झाडे,विहीर आयुष्यभराची ही कमाई ओरबडून घेण्याचा प्रयत्न सरकारने चालविलेला आहे. ब्रिटिशांसारखी हुकूमत पुन्हा एकदा सुरू झालेली आहे.
यातून तुम्हीच मार्ग काढा आणि आमच्यावरील अन्याय दूर करा, अशी कैफियत महामार्ग चौपदरीकरणात सरकार ज्यांच्याकडून संमती नसतानाही जमीन घेत आहेत अशा कुटुंबातील वयोवृद्धांनी आमदार नितेश राणे यांच्यासमोर मांडली.
आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील ओसरगाव, वागदे, जानवली, हुमरट, बेळणे या गावातील रस्ता चौपदरीकरणात जमीन जाणा-या कुटुंबीयांची भेट घेऊन थेट संवाद साधला. या बैठकीदरम्यान अनेकांनी चौपदरीकरणात आपण भूमिहीन होणार अशी भीती व्यक्त केली.
वागदे येथील वासुदेव मर्गज या वयोवृद्धाने सरकारने कितीही पैसे दिले तरी आयुष्यभर खस्ता खाऊन उभे केलेले वैभव पुन्हा उभे करण्याची ताकद आपल्यामध्ये राहिलेली नाही, असे सांगितले. आप्पा गोलतकर यांनी सरकार आणि त्यांचे अधिकारी चौपदरीकरणाची भूमिकाच स्पष्ट करत नाही.
प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करून महामार्गाची मोजणी करत असल्याचे सांगितले. आमदार नितेश राणे यांनी अधिकारी आणि शासनाला आमच्या वतीने जाब विचारावा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली न्याय मिळावा, अशी अपेक्षा गोलतकर यांनी व्यक्त केले.
चौपदरीकरणामुळे कर्ज काढून व्यवसाय करणा-या अनेक जणांना देशोधडीला लावण्याचे काम हे सरकार करत आहे. जमीन मोजणी दरम्यान नोटिसा काढून त्या नोटिसांमध्ये याबाबतची इत्थंभूत माहिती नोंद करून बजावल्या जाव्यात अशी माहितीही ग्रामस्थांनी केली.
प्रत्येक गावातील प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने गाव म्हणून आम्ही सर्व जण उभे राहू आणि जोपर्यंत शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे मोजणीचे काम करू देणार नाही, असा निर्धारही यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.
आनंद जाधव, कृष्णा नाईक, वसंत परुळेकर, सुनील मेस्त्री या कुटुंबांवर जमीन नावावर नसल्यामुळे भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने प्रथम निर्णय घ्यावा अन्यथा चौपदरीकरणाचे कोणतेही काम सुरू होऊ देणार नाही. सातबारावर वने असल्याचे सांगून भीती घालणा-या अधिका-यांवर पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.