‘आरटीओ’मधील भ्रष्टाचारावर दस्तुरखुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच हल्लाबोल केला.
नवी दिल्ली- ‘आरटीओ’मधील भ्रष्टाचारावर दस्तुरखुद्द केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच हल्लाबोल केला.
चंबळच्या खो-यातील दरोडेखोरांपेक्षा जास्त लूटमार विभागीय परिवहन कार्यालयात (आरटीओ) होत असल्याचा गंभीर आरोप गडकरी यांनी केला आहे.
नविन मोटार कायदा ‘रोड ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी बिल’ हे विधेयक गेले आठ महिने मंजुरीच्या प्रतीक्षेत संसदेत अडकून पडले आहे. या विधेयकाविरोधात आरटीओचे अधिकारीच सर्वात पुढे असून त्यांनीच राज्य सरकारच्या संबंधित मंत्री व अधिका-यांचे कान भरले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
देशातील सर्वाधिक भ्रष्ट खाते म्हणून आरटीओ ओळखले जात असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. नविन मोटार कायदा लागू करण्यास होणा-या विलंबावर त्यांनी चिंता व्यक्त केली. हे विधेयक संमत झाले तर हे संपूर्ण परिवहन विभाग सुधारेल आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यास त्यामुळे यश येईल, असा गडकरींचा दावा आहे.
मात्र आरटीओतील पारदर्शी आणि संगणकीकरणाला काही जण मुद्दामहून विलंब करत असून ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, तेच भ्रष्ट अधिकारी या विधेयकाला विरोध करत असून या विरोधावर गडकरींनी तीव्र नाराजी वर्तवली.
भारताप्रमाणे अन्य कोणत्याही देशात इतक्या सहजासहजी वाहतूक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळत नाही. भ्रष्ट अधिका-यांमुळे देशातील ३० टक्के लायसन्स हे बोगस आहेत. त्यामुळे सुधारित विधेयक मंजूर झाल्यास यामध्ये बदल होतील. ऑनलाइन परमिट आणि अन्य सुधारणाही या बिलात प्रस्तावित आहेत. संपूर्ण वाहतूक व्यवस्था बदलण्याची क्षमता या विधेयकात असून संसदेच्या अधिवेशनात ते मंजूर व्हावे, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली आहे.