बॉलिवूडला आपल्या चित्रपटांमधून सादर करण्यासाठी आवडणारा सण म्हणजे रक्षाबंधन. चित्रपटसृष्टीतील दर ५ चित्रपटांमागे एका चित्रपटात हा सण पाहायला मिळतो. त्याचा कथानकाशी भावनिक संबंध जोडून हा सण रुपेरी पडद्यावर उत्साहात आणि वेगवेगळय़ा मूडमध्ये पाहायला मिळतो. या रक्षाबंधनावर आजवर असंख्य गाणी तयार झाली आहेत. त्यातील बहुसंख्य गाणी ही वर्षानुवर्षे ओठांवर रेंगाळताना दिसतात. राखीच्या रेशमी धाग्याची आणि प्रेक्षकांची वीण घट्ट करून चित्रपटसृष्टीने प्रेक्षकांना बांधलेली ही राखी कशी आहे, याची छोटीशी झलकही आनंद देणारी ठरेल.
बॉलिवूडच्या बहुतेक सगळय़ा कलाकारांनी पडद्यावर रक्षाबंधन साजरे केले आहे. कितीही अँग्री यंग मॅन असला अथवा कठोर असला तरी बॉलिवूडचा भाऊ हा राखी बांधताना भावुक झालेला दिसला आहे. बॉलिवूडच्या संगीतक्षेत्रातील दोन अजरामर तारे म्हणजे शंकर-जयकिशन. यांनी त्यांच्या अखेरच्या टप्प्यात दिलेल्या संगीतापैकी एक चित्रपट म्हणजे १९७४ सालचा ‘रेशीम की डोर’. या चित्रपटातील भाऊ आहे तो बॉलिवूडचा ही मॅन धर्मेद्र. त्याच्यासाठी त्याची बहीण कुमुद चुघानी राखीचे गीत गाते. ते म्हणजे, ‘बेहना ने भाई की कलाई पे प्यार बांधा है।’ या गाण्याने सुमन कल्याणपूर यांचा आवाज हिंदी चित्रपटसृष्टीत लता आणि आशाच्या युगातही अजरामर राहिला. बॉलिवूडची किंवा कोणत्याही वाहिनीवर रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम साजरा केला तर तो या गीताशिवाय अपूर्ण आहे असेच वाटते.
धमाकेदार चित्रपट देणारा निर्माता-दिग्दर्शक म्हणजे देव आनंद. १९७१ साली देवानंद यांनी तत्कालीन परिस्थिती, चरस, रजनीश यांच्या पार्श्वभूमीवर काढलेला चित्रपट म्हणजे ‘हरे राम हरे कृष्ण.’ यात देव आनंद आणि झीनत अमान हे बहीण-भाऊ आहेत. पण त्यांच्या लहानपणापासूनचे त्यांचे रक्षाबंधनाचे बहीण- भावाच्या नात्याची महती सांगणारे गीत म्हणजे ‘फुलोंका तारोंका सबका केहना है, सारी उमर हमे संग रहना है’ लता मंगेशकर आणि किशोरकुमार यांनी गायलेल्या या गाण्याची सुरुवात झाल्यावरच लक्षात येते की, यांची ताटातूट होणार आहे. हे गीतच दोघांना एकत्र आणणार हे दे मार चित्रपटाच्या मसालापटाला धरूनच आहे. पण देवानंदने या चित्रपटात तब्बल १३ सुपरहिट गाणी दिलेली असतानाही हे गाणे त्यात आपली जागा वर्षानुवर्षे राखून आहे. आनंद बक्षी यांच्या या गीतांना संगीत दिलेले आहे अर्थातच आर. डी. बर्मन यांनी.
बॉलिवूडचे दादामुनी अशी ओळख असलेल्या अशोक कुमार यांचा ‘राखी’ हा १९६२ चा चित्रपट. यामध्ये अशोक कुमार आणि वहिदा रेहमान हे बहीण-भाऊ आहेत. वहिदा रेहमान म्हणजे भारतीय स्त्रीचे खरे रूप असे म्हणता येईल. कोणत्याही भूमिकेत ती चपखल जाणवते. बहीण असो, आई असो वा प्रेयसी या प्रत्येक रूपात सर्वागसुंदर दिसणारी वहिदा रेहमान अशोक कुमारला राखी बांधते तो हा चित्रपट. यातील ‘राखी धागोंका त्यौहार’ हे मोहंमद रफी यांनी गायलेले आणि रवी यांनी संगीत दिलेले गीत बरेच गाजले होते. या गाण्याच्या चित्रीकरणातील साधेपणा हाच या नात्याची जवळीक अधिक घट्ट करताना दिसतो.
आपल्या सहजसुंदर अभिनयाने थक्क करायला लावणारा ६० च्या दशकातील अभिनेता म्हणजे बलराज सहानी. बलराज सहानी यांचे रक्षाबंधन झाले ते ‘छोटी बहन’ या चित्रपटात. यात नंदा किंवा बेबी नंदा ही त्यांची बहीण आहे. यातील ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’ या गीताची अवीट गोडी आजही कायम आहे. शंकर जयकिशन यांचे संगीत असलेले हे शैलेंद्र यांचे गीत लता मंगेशकर यांनी गायलेले आहे. अत्यंत सामान्य गरीब कुटुंबातील भाऊ-बहिणीच्या निव्र्याज प्रेमाचा सर्वागसुंदर आविष्कार आणि भाव या गाण्यात पाहायला मिळतात. बहीण म्हणून नंदाचे दिसणे आणि चेह-यावरचे भाव टिपताना कॅमे-यालाही कसरत करावी लागेल, असे बलराज सहानी यांचे भाव टिपताना खूप आनंद मिळतो.
बॉलिवूडमध्ये भारतकुमार या नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे मनोज कुमार. नेहमी दोन नायिका, एक मरणार, दुसरीशी याचे जमणार या फॉम्र्युल्यात रमलेल्या मनोजकुमारने ‘बेईमान’ या चित्रपटात मात्र बहिणीवर माया केलेली दिसते. या चित्रपटात नजमा ही कलाकार त्याची बहीण आहे. लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेले ‘ये राखी बंधन है ऐसा’ या गाण्याला संगीतबद्ध केलेले आहे ते शंकर जयकिशन यांनी. गंमत म्हणजे या चित्रपटात मनोजकुमारची हिरोईन राखी आहे. पण कथेतील राखी मात्र नजमाकडून तो बांधून घेतो आणि या राखीवर प्रेम करतो.
बाल कलाकारातून नायक नायिका बनलेली एक जोडी म्हणजे सचिन आणि सारिका. गीत गाता चलसारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर १९७० च्या दशकात रक्षाबंधन नावाचा या दोघांचा चित्रपट आला होता. पौराणिक, चमत्कारावर आधारित कथानक असलेल्या या चित्रपटात सारिकाचा मानलेला भाऊ सचिन यात आहे. विशेष म्हणजे हा नागकुमार असतो आणि या मानलेल्या अनाथ बहिणीसाठी दरवर्षी रक्षाबंधनाला येत असतो. लहानपणापासून सावत्र आईचा त्रास सहन करणारी सारिका आपल्या भावाची आतुरतेने वाट पाहत असते. तेव्हा ती राखी गीत म्हणते. ‘तेरी अमर हो गई आशा’ हे ते गीत. कवी प्रदीप यांच्या या गीताला सी. अर्जून या संगीतकाराने स्वरबद्ध केलेले आहे. रक्षाबंधन या विषयाभोवतीच फिरणारा तो चित्रपट असल्यामुळे त्याचा उल्लेल आवश्यक आहे. तशी त्यातील गाणी फार हीट नाहीत. पण कथानकामुळे या चित्रपटाला महिलांनी डोक्यावर घेतले होते.
सुपरस्टार अमिताभ बच्चन, रजनीकांत यांचे रक्षाबंधन गिरफ्तार या चित्रपटात आहे. अमिताभची रक्षाबंधनव्यतिरिक्त बहिणीवरची गाणी अनेक आहेत. त्यातील दोन गाणी खूप गाजलेली आहेत. एक अदालत या चित्रपटातील बेहना हो बेहना हे मुकेश यांनी गायलेले गीत आणि दुसरे मजबूर या चित्रपटात अपंग असलेल्या फरिदा जलाल या आपल्या बहिणीला समजावताना म्हटलेले ‘नही मैं नही देख सकता तुझे रोते हुऐ’ हे गीत खूपच गाजलेले आहे. रजनीकांत म्हणजे एक चमत्कारच असतो.
त्यामुळे त्याचा हिंदीतील पदार्पणातला पहिला चित्रपट म्हणजे ‘अंधा कानून.’ यात त्याची बहीण आहे हेमामालिनी. ही आहे पोलीस इन्स्पेक्टर. भावाने आपल्या दुस-या बहिणीवर डोळय़ांसमोर अत्याचार होताना पाहिलेले आहेत, म्हणून तो सुडाने पेटलेला आहे. त्या प्राण, डॅनी, प्रेमचोप्राला अंधा कानूनचा फायदा घेत रजनीकांत मारतो. त्याचा पुरावा मिळवण्यासाठी नेहमी रागात असणारी बहीण हेमामालिनी इथे बहीण असूनही प्रेमाचे नाटक करते आणि रक्षाबंधनाची भेट म्हणून खून कसे केले हे सांगण्याची गळ घालून त्याला अडकवू पाहते. त्यासाठी या चित्रपटातील राखी गीत निर्मात्याने ठेवले असले तरी ते राखी गीत म्हणून महिला वर्गाने काळय़ा यादीत टाकलेले आहे. किशोरकुमार-आशा भोसले यांचे राखी गीत कुरघोडी करणारे आहे. अशी असंख्य गीते बॉलिवूडने दिली आहेत, त्यातील काही गीतांवर या ठिकाणी ऊहापोह केला आहे.