आसाममधील सोनितपूर आणि कोक्रोझार जिल्ह्यात मंगळवारी एनडीएफबी(एस)च्या संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या ६५ वर पोहोचली आहे.
गुवाहाटी – आसाममधील सोनितपूर आणि कोक्रोझार जिल्ह्यात मंगळवारी एनडीएफबी(एस)च्या संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या ६५ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे.
एनडीएफबी(एस)च्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सोनितपूर जिल्ह्यातील मैताबूल बस्ती येथील ३० तर जंगली बस्तीतील सहा जण ठार झाल्याची माहिती पोलिस अधिक्षक संजुक्ता परसार यांनी दिली.
तर कोक्राझोर जिल्ह्यातील पाखिगुरी भागात पाच तर उल्तापानी येथे १२ जणांची हत्या करण्यात आल्याचे तेथील पोलीस अधीक्षक सुनिल कुमार यांनी सांगितले.
या हल्ल्यात ठार झालेले सर्व जण आदिवासी आहेत. आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या सीमेजवळील भागात हा हल्ला करण्यात आला. गृहमंत्री राजनाथ सिंग आज हल्ला झालेल्या ठिकाणी भेट देणार आहेत आणि तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममध्ये झालेला हल्ला हा भ्याड हल्ला असल्याचे सांगत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने आसाम सरकारच्या विनंतीवरून निम लष्करी दलाचे पाच हजार जवान राज्यात पाठवले आहेत.