भारतातील वैविध्यपूर्णतेने भारावून गेलेले इंग्लंडमधील २५ हजार विद्यार्थी भारतात शिकायला येणार आहेत.
कोलकाता- भारतातील वैविध्यपूर्णतेने भारावून गेलेले इंग्लंडमधील २५ हजार विद्यार्थी भारतात शिकायला येणार आहेत. येत्या पाच वर्षात हे विद्यार्थी अल्प मुदतीचे अभ्यासक्रम पूर्ण करणार आहेत.
ब्रिटिश कौन्सिलच्या शैक्षणिक प्रमुख सुचिता गोकर्ण म्हणाल्या की, पुढीलवर्षीपासून आम्ही ‘जनरेशन यूके’ हा प्रकल्प राबवणार आहोत. या प्रकल्पाअंतर्गत आम्ही इंग्लंडमधील विद्यार्थ्यांना भारतात आणणार आहोत. दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत व्हावेत आणि दोन्ही देशातील नागरिकांनी एकमेकांकडे जाण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. विविध संस्थांमध्ये हे विद्यार्थी अल्प अभ्यासक्रमासाठी येतील. तसेच ते शाळांमध्ये शिकवण्यासाठी मदत करतील, असे त्या म्हणाल्या.
ब्रिटिश कौन्सिल विविध विद्यापीठांशी आणि शैक्षणिक संस्थांशी करार करण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांनी अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमात सहभागी व्हावे. हे अभ्यासक्रम दोन आठवडे ते महिन्याभराच्या मुदतीचे असतील. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक बंध तयार होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही गोकर्ण म्हणाल्या.
भारतीय कंपन्यांचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि शैक्षणिक संस्थांची माहिती करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०० जागांसाठी इंग्लंडमध्ये जवळपास ५ हजार अर्ज आले आहेत. २०१५ मध्ये पहिल्यावर्षी २०० ते ३०० विद्यार्थी भारतात येतील. त्यानंतर हळूहळू त्यांची संख्या वाढवली जाईल.