भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्त्रो’ने मंगळ मोहीम यशस्वी करुन संपूर्ण जगात भारताची शान वाढवली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्त्रो’ने मंगळ मोहीम यशस्वी करुन संपूर्ण जगात भारताची शान वाढवली आहे. मंगळ मोहिमेच्या यशामुळे संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. केवळ ४५० कोटी रुपये खर्च हे या मोहिमेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्ये होय. इतक नव्हे तर पहिल्या प्रयत्नातच मंगळ ग्रहावर पोहचण्याचा पराक्रम ‘इस्त्रो’ने केला आहे. असा पराक्रम अमेरिकेच्या नासा, युरोपियन अवकाश संशोधन संस्था(इएसए), रशियन अवकाश संशोधन संस्था अथवा चीनच्या अवकाश संशोधन संस्थेला देखील करता आला नव्हता. मंगळ मोहिमेच्या आधी ‘इस्त्रो’ने ‘चंद्रयान-१’ द्वारे स्वतःची क्षमता दाखवून दिली होती. ‘इस्त्रो’च्या ‘चंद्रयान-१’ मोहीमेमुळे नासा सारख्या संस्थेने खास अभिनंदन केले होते.
विशेष म्हणजे ‘नासा’ आणि रशिया यांनी १९६०पासूनच मंगळावर यान पाठवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना पहिल्या प्रयत्नात यश आले नव्हते. त्यामुळेच भारताची मंगळ मोहीम यशस्वी होईल का अशी शंका अनेक जण व्यक्त करत होते. पण जेव्हा ‘इस्त्रो’ने ‘चंद्रयान -१’ मोहीम हाती घेतली होती तेव्हाही अशी शंका अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांनी ‘चंद्रयान-१’ मोहीम यशस्वी करु दाखवली. इतक नव्हे तर भारताच्या चांद्रयानाने चंद्रावर पाण्याचे घटक असल्याचे सिद्ध केले आणि अंतराळमोहिमेत आघाडीवर असलेल्या नासासह संपूर्ण जगात खळबळ उडाली होती. ‘नासा’ आणि अन्य देशातील अंतराळ संशोधन संस्था चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी इतके वर्षे प्रयत्न करत होत्या. मात्र ‘इस्त्रो’ला त्यात यश आल्याने अनेकसंस्था अस्वस्थ झाल्या होत्या. मंगळमोहिमेच्या बाबतीतही पुन्हा एकदा तसेच घडले आहे. मंगळ मोहिमेची गरज काय, इतकी घाई कशाला असे सवाल इस्त्रोच्या माजी शास्त्रज्ञांनीच उपस्थित केले होते. मात्र इस्त्रोने पुन्हा एकदा आपली क्षमता सिध्द करुन दाखवली आहे.
या ग्रहावरील जीवसृष्टीची शक्यतेचा शोध घेणे हे मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे उद्दीष्टे आहे. त्यासाठी या ग्रहावर मिथेन वायूचे अस्तित्व आहे की नाही त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. या मिथेनचा शोध घेणारा एक सेन्सर व एक थर्मल स्पेक्ट्रोमीटर यानावर बसवण्यात आला आहे. या दोघांचा वापर करून मिथेनबाबत योग्य ती माहिती मिळवता येणार आहे.
मानवाच्या भविष्यातील वस्तीस्थान म्हणून मंगळाकडे पाहिले जाते. मंगळ आणि पृथ्वी या दोन्ही ग्रहांमध्ये साधर्म्य असल्यामुळे सर्वांचा प्रयत्न मंगळावर पोहचण्याचा आहे. अंत्यत विरळ वातावरण आणि पाण्याची शक्यात यामुळे मंगळावरील बदलाची आणि भविष्यातील वसतिस्थानाची शक्यता पडताळण्याचा प्रयत्न या मोहिमेतून केला जाणार आहे.
मंगळ मोहिमेची उद्दीष्टे
-मंगळावरील जीवन, वातावरण, भूगर्भ, त्याचे मूळ उत्कांती आणि त्याचे चिरंतनत्व याचा अभ्यास करणे
-मंगळावरील हवामान, वातावरण, जमीन याचा अभ्यास
-मंगळावरील विरळ वातावरण, चुंबकीय क्षेत्र, पाण्याचे वितरण, भूपृष्ठाचे छायाचित्रण आणि सर्त महत्वाचे मिथेनचे प्रमाण याचा शोध घेणे
काही महत्त्वाचे मुद्दे
– भारताच्या मंगळयानाने ७८० दशलक्ष किलोमीटरचे अंतर कापले
– मंगळ मोहिमेवर ५०० शास्त्रज्ञ गेल्या तीन वर्षापासून काम करत होते
– शास्त्रज्ञाच्या मते मंगळावर येत्या ३० वर्षात वस्ती स्थापन होण्याची शक्यता
– अमेरिका, रशिया व युरोपीय संघानंतर भारताचाही ‘रेड क्लब’मध्ये समावेश
– जगभरातील विविध अंतराळ संशोधन करणा-या संस्थांनी मंगळावर जाण्यासाठी ५१ मोहिमा आखल्या आहेत. त्यापैकी केवळ २१ मोहिमा यशस्वी झाल्या आहेत.
– ‘इस्त्रो’सोबत अमेरिकेनेही मंगळ मोहीम आखली आहे. अमेरिकेच्या या मंगळ मोहिमेचा खर्च ७३० दशलक्ष डॉलर्स एवढा म्हणजे ७३ कोटी डॉलर्स पण भारताच्या मंगळयान मोहिमेचा खर्च मात्र ७.३ कोटी डॉलर्स म्हणजे अमेरिकेच्या मोहिमेच्या खर्चाच्या केवळ एक दशांश एवढा.
– २००३ साली जपानने मंगळावर जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात जपानला अपयश आले होते.
– २०११मध्ये चीननेही असा प्रयोग केला पण तो पूर्णपणे स्वबळावर केला नव्हता. त्यासाठी रशियाची मदत घेतली होती. पण तरीसुद्धा त्यांच्या यानाने आणि उपग्रहाने मंगळाची दिशा पकडलीच नाही. उपग्रह पाण्यात कोसळला आणि मोहीम अयशस्वी झाली.
– मंगळावर दाखल होण्याचा पहिला मान रशियाला मिळाला होता. दोन डिसेंबर १९७१ रोजी रशियाचे ‘मार्स-३’ हे यान मंगळावर उतरले होते. त्याआधी ‘मार्स-२’ हे यान धुळीच्या वादळामुळे मंगळावर कोसळले होते. तर ‘मार्स-३’ने केवळ १४ सेकंद संदेश पाठवले होते. त्यानंतर ते अज्ञात कारणामुळे बंद पडले.