‘उन्हाच्या झळा कुणाला कळा, उभा आसमंत डहुळे तळा’ या काव्यपंक्तीची आठवण करुन देणारे उष्ण तापमान सध्या शहरात आहे.
ठाणे- ‘उन्हाच्या झळा कुणाला कळा, उभा आसमंत डहुळे तळा’ या काव्यपंक्तीची आठवण करुन देणारे उष्ण तापमान सध्या शहरात आहे. त्यामुळे फाल्गुनातील या घामाझोकोळ वातारणामुळे ठाणेकरांच्या अंगाची चांगलीच लाही लाही सुरु होत आहे.
या उष्ण वातावरणापासून वाचण्यासाठी अनेकांनी अडगळीत ठेवलेल्या छत्र्या वापरायला काढल्या आहेत. तर शितपेयांची दुकाने, फळरसविक्रे त्यांच्या दुकानातही गर्दी दिसत आहे. बाजारात मडके विक्रेतेही दिसू लागले आहेत.
होळी गेल्यानंतर वातावरणात उष्णता जाणवत असते, असा सालाबादाप्रमाणचा अंदाज आहे. पण यंदा माघ महिन्यापासूनच शहरातील तापमान वाढायला सुरुवात झाली. माघ सरल्यानंतर मात्र तापमानात जास्तच वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.
१ फेब्रुवारी रोजी शहराचे तापमान कमाल ३७.४ होते. तर रविवारी हे तापमान ४१.५ अंश झाले आहे. एकेकाळी ठाणे शहरात मोठया प्रमाणात हिरवळ होती. पण वाढत्या नागरीकरणाने सिमेंट कॉंक्रिटचे जंगल वाढल्याने बेसुमारे वृक्षतोड झालेली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच चालला आहे.
वाढत्या तापमानाचा सामना शहरवासीय करत असताना ग्लोबल वार्मिगच्या इशारा पर्यावरणप्रेमींकडून देण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेची वृक्ष प्रधिकरण समिती आहे. शहरातील वृक्षतोडीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समितीवर असताना त्यांच्याकडूनच कानाडोळा करण्यात येत असल्याने या कत्तलीवर कोणताही घरबंद राहिलेला नाही.
वाढत्या नागरीकरणाने एकीकडे वृक्षतोड होत असताना खाडीजवळची कांदळवनेही नष्ट करण्यात येत आहेत. या धोक्याच्या घंटा असूनही महापालिका प्रशासन त्यावर उपाय शोधत नसल्याबाबत पर्यावरणप्रेमींकडून नाराजीचा सूर उमटत आहे.