अन्न, रोजगार, आरोग्य, शेती, महिला सबलीकरण, उद्योगासारख्या मुद्दय़ावर सरकारने लक्ष केंद्रित करून राज्यातील जनतेला दिलासा देणारा अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.
मुंबई- अन्न, रोजगार, आरोग्य, शेती, महिला सबलीकरण, उद्योगासारख्या मुद्दय़ावर सरकारने लक्ष केंद्रित करून राज्यातील जनतेला दिलासा देणारा अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना,‘ लोकसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला नसल्याचे सांगत विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने ते असे आरोप करत असल्याचा पलटवार त्यांनी केला. विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढताना त्यांनी राजकीय टोलेबाजी केली.
आघाडी सरकार लोकाभिमुख कारभार करत असल्याने मागील १५ वर्षे सत्तेत आहोत, हे सांगत आम्ही पोकळ घोषणा करत नसल्याचे पवार यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. २००४ साली वीजबिल माफीची घोषणा आघाडीतर्फे करण्यात आली होती. ती पाळण्यात आली आहे. मात्र २००९ साली हीच घोषणा युतीने केली होती. मात्र ती प्रत्यक्षात येणार नाही, हे जनतेला माहीत होते. युतीची घोषणा पोकळ असल्याचे जनतेच्या लक्षात आल्याने त्यांनी आम्हालाच पुन्हा निवडून दिल्याचे सांगत पवार यांनी विरोधकांची टर उडवली. ‘रेटून बोला पणे खोटे बोला’ ही विरोधकांची सवय असल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
काही स्मारके उभारताना न्यायालयीन अडचणी येत आहेत. त्या मिटवल्या पाहिजेत ही सरकारची भूमिका आहे. मात्र ‘भावा भावातील वाद मिटण्याचे नाव घेत नाहीत मग न्यायालयाचे वाद काय मिटणार, अशी टोलेबाजी त्यांनी शिवसेना आणि मनसेच्या सदस्यांकडे पाहत केली. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ केला. ‘तुम्ही बोलत असताना मी बोललो नाही आता तुम्ही ही मध्ये बोलू नका’, असेही त्यांनी बजावून सांगितले. गडकरी मुंडे वादाला वाट करून देताना एक नेते म्हणतात, महाराष्ट्र टोलमुक्त करणार दुसरे म्हणतात ते शक्य नाही. ही निव्वळ फसवाफसवी सुरू आहे. त्यामुळे भाजपने आमच्यावर आरोप करून नयेत. जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुस-यांच्या घरावर दगड फेकू नये, असे सांगत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
सरकारचा महसूल मद्यविक्रीतून वाढत आहे. यावरून हे राज्य मद्यपींचे झाल्याच्या आरोपाची त्यांनी खिल्ली उडवली. जनतेने मद्य घेऊ नये, आम्ही त्यावरचा टॅक्स वाढवला पण तरी पिणारे पितात व आमचा महसूल वाढतोय यात आमचा काय दोष, असा प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला. काही पक्ष वारेमाप आरोप करत असून काही जण मराठीचा मुद्दा घेऊन बोलत आहेत. पण त्यांचीच मुले इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. त्यांनी जरा तारतम्य बाळगण्याची गरज आहे, अशी टोलेबाजीही
त्यांनी केली. मागील १५ वर्षे सत्तेत नसल्याने विरोधक बिथरले असून ही त्यांच्यासाठी अखेरची संधी असल्याने ते असे वागत आहेत. टोलचा मुद्दा मागील पाच वर्षापासून नव्हता, तो आत्ताच कसा आला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर
नागरी सुविधा पुरवण्यात सरकार यशस्वी
राज्याच्या उत्पन्नात वाढ
उद्योगासाठी पोषक वातावरण
महसुली तूट लवकरच भरून काढणार
टोलसाठी जूनच्या अर्थसंकल्पात वेगळी तरतूद
राज्यातील काही टोल बंद व्हावेत किंवा माफ केले जावेत, यासाठी जूनमध्ये सादर होणा-या अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. २० कोटींपर्यंतच्या प्रकल्पांचा यासाठी विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. शिवाय ज्या वाहनांना टोल माफ आहे त्याच्यासाठी टोलनाक्यावर वेगळी मार्गिका काढण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर असल्याचा उल्लेखही त्यांनी या वेळी केला.