ऊसाचा पहिला हप्ता तीन हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ४८ तास बंदच्या पहिल्याच दिवशी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कोल्हापूर- ऊसाचा पहिला हप्ता तीन हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ४८ तास बंदच्या पहिल्याच दिवशी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आंदोलनामुळे सर्व सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
ऊसदरासाठी स्वाभिमान शेतकरी संघटना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दहा ठिकाणी रस्तारोको आंदोलन केले. जिल्ह्यातील कोकण प्रवेशद्वार मानले जाणा-या गगनबावडाच्या मुख्य रस्त्यावर कुडित्रे, बालिंगा येथे रस्तारोको करण्यात आला होता. तर राधानगरी रोडवरील कोथळी फाटा, रत्नागिरी रोडवरील वडणगे आदी ठिकाणी रस्त्यावर झाडे तोडून आणि टायर पेटवण्यात आले होते.
कागल तालुक्यातील शाहू साखर कारखान्याच्या कसबा सांगाव येथील कार्यालयाची आंदोलकांनी तोडफोड केली. शेतकरी संघटनेच्या या हिंसक आंदोलनामळे एसटीच्या कोल्हापूर तालूका डेपोतून गाड्या सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तसे एसटीच्या उत्पन्नातही घट झाली.
दरम्यान हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.