मुंबई, नागपूर, औरंगाबादपाठोपाठ आजपासून पुण्यातही अचानक हेल्मेटसक्ती करण्यात आली. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता हेल्मेटसक्ती केली जात असल्याने पुणेकर चांगलेच चिडले आहेत.
पुणे- मुंबई, नागपूर, औरंगाबादपाठोपाठ आजपासून पुण्यातही अचानक हेल्मेटसक्ती करण्यात आली. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता हेल्मेटसक्ती केली जात असल्याने पुणेकर चांगलेच चिडले आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजीही बोलून दाखविली. ‘सरकार काहीही करू शकत असले, तरी त्यासाठीही काही नियम आहेत.
वाहतूक विभागाने नागरिकांचे आधी प्रबोधन करावे, मगच महिन्याभरानंतर दंडात्मक कारवाई सुरू करावी. एका रात्रीतच हेल्मेटसक्ती कशी काय केली जाऊ शकते,’ असा सवाल पुणेकरांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सर्वत्र हेल्मेटसक्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्याचा परिवहन विभाग अंमलबजावणी करण्यासाठी काम करीत आहे. मुंबई, नागपूर व औरंगाबादमध्ये नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातही गुरुवारी सकाळपासूनच हेल्मेटसक्ती सुरू केली आहे. अनेक नागरिक स्वत:हून आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरत आहेत.
मात्र, जे लोक हेल्मेट वापरत नाहीत त्यांनी नाराजी व्यक्त केली. हेल्मेटसक्ती लागू करण्यापूर्वी सरकारने, प्रशासनाने याची पूर्वकल्पना द्यायला हवी होती. तुम्ही अचानक अशी सक्ती करून दंड वसूल करू शकत नाही.
इतर शहरांत नागरिकांचा प्रतिसाद मिळत असला तरी त्या त्या शहरातील वाहतूक पोलीस आयुक्तांनी महिनाभर आधी नागरिकांचे प्रबोधन केले व हेल्मेटसक्ती करीत असल्याचे जाहीर केले होते. पुण्यात यातील काहीही घडले नाही, त्यामुळे एका रात्रीतच हेल्मेटसक्ती कशी काय केली जाऊ शकते, असा सवाल पुणेकरांनी उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली.