मुंबईत गेल्या तीन वर्षात १६ हजार झाडांची कत्तल झाल्याची बातमी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी मोठय़ा प्रमाणात झाडांची कत्तल झालेली असणार.
जो गिरणगाव म्हणून पूर्वी प्रसिद्ध होता, त्या गिरणगावातल्या बहुसंख्य गिरण्यांच्या सभोवती खूप मोठी वृक्षराजी होती. या गिरण्यांची जागा विकून टाकण्यात आल्यानंतर पूर्वीचा गिरणगाव आता नव्याने न्यूयॉर्कमधील ‘मॅनहटन’सारख्या गगनचुंबी इमारतींनी व्यापला गेला आणि श्रमिकांच्या या जगाऐवजी आता ‘हाय-फाय’वाल्यांचे जग दुस-या शब्दात एक ‘ग्लोबल जग’ त्या ठिकाणी उभे राहिले आहे. केवळ मुंबई शहर नव्हे; तर सगळी शहरे झपाटय़ाने वाढत आहेत. रस्ते रुंद होताहेत. हे करणे अपरिहार्य आहे. पण त्याचवेळी मोठय़ा प्रमाणात वृक्षांचा संहार करून नव्या वस्त्या उभ्या होत आहेत. अलीकडेच मानखुर्द टू कलिना असा जो एक नवीन मार्ग विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाच्या काळात निर्माण केला गेला, तो रस्ता करताना किती झाडांची कत्तल झाली असेल, याचा हिशोब नाही. आजही कलिना विद्यानगरीकडून कुर्ला स्थानकाकडे जातानाच्या दुतर्फा रस्त्याचे रुंदीकरण वेगाने सुरू आहे आणि या रुंदीकरणामध्ये किमान शंभर वृक्षांची तोड होणार आहे. तिथे रस्ता सिमेंट क्राँकिटचा होतो आहे. त्यासाठी करोडो रुपये खर्च होत आहेत आणि करोडो रुपये खर्च करून तयार केलेला हा रस्ता खासगी कंपन्या जुन्या गाडय़ा विकण्यासाठी, त्या गाडय़ांचे प्रदर्शन भरवून त्यांनी चक्क रस्त्यावरच विक्रीचा बाजार मांडला जात आहे. झाडांची कत्तल करून रस्ता रुंद करण्याचा जो उद्देश आहे, त्या रुंदीकरणासाठी करोडो रुपयांचा खर्च केलेला आहे. ती जागा आपल्या बापाच्या मालकीची आहे, असे समजून खासगी मालक हा रस्ता आपल्या धंद्यासाठी सर्रास वापरत आहेत. ना मुंबई महापालिकेला त्याची चिंता आहे, ना ‘आरटीओ’वाल्यांना तिकडे बघायला वेळ आहे. इतकी मोठी झाडे तोडायची, रस्ते रुंद करायचे. त्याचा वापर खासगी मालकांनी आपल्या धंद्यासाठी सर्रास करायचा, ही मुजोरी मोडून काढण्याची ताकद ना प्रशासनात आहे, ना महापालिकेत आहे. ना झगडे महाराजांमध्ये आहे. झगडे आरटीओ म्हणून अधिकारावर आले; पण वाहतुकीला शिस्त लावण्यात त्यांना कसलाही रस नाही.
मुंबईमध्ये होणारी वृक्षतोड मुंबईचा रखरखाट करीत आहे. एकूणच महाराष्ट्रातल्या बहुसंख्य शहरांची लोकसंख्या वेगाने वाढत चालल्यामुळे झाडे तोडून नवीन रस्ते सर्रासपणे उभे केले जात आहेत. ही झाडे मुळापासून हलवण्याची एक व्यवस्था करता येण्यासारखे आहे. दुसरीकडे त्या झाडांचे रोपण करता येते; परंतु तसे होताना दिसत नाही.?झाडे मुळापासून तोडली जात आहेत. नवीन झाडे लावली जात नाहीत. सामाजिक संस्था त्यात फार मोठा पुढाकार घेत नाहीत. मोहन धारियांची ‘वनराई’ संस्था गेली २५ वष्रे काम करत नसती तर महाराष्ट्र कधीच उजाड झाला असता. या ‘वनराई’ने फार मोठय़ा प्रमाणात सामाजिक काम हाती घेतले आणि त्यामुळे नागपूर, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी ‘वनराई’ने नव्याने खूप मोठय़ा प्रमाणात झाडे लावली; पण गेल्या काही दिवसांत झाडे तोडण्याचा कार्यक्रम जोरात सुरू झाला आहे. या देशामध्ये सर्वाधिक हिरवेगार शहर जसे दिल्ली आहे, त्याच्या खालोखाल नागपूर आहे. मुंबई आता उजाड होत आहे.
जेव्हा शहरांचा विकास साधायचा असतो तेव्हा निसर्गाची काळजी घेऊनच तो विकास करावा लागेल. निसर्गाच्या विरोधात जाऊन विकास कधीही होणार नाही. पुढच्या काळात जी काही निर्मिती करायची असेल किंवा शहरांची भरभराट करायची असेल ती निसर्गाची काळजी घेऊन करावी लागेल. अन्यथा पर्यावरण उजाड झाल्यानंतर या देशामध्ये पावसाचे प्रमाण सातत्याने कमी होत जाणार आहे. जर या ठिकाणची शेती समृद्ध करायची असेल, तर ती नैसर्गिक पाण्याच्या जोरावरच समृद्ध करता येईल. कारण महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर शक्यतो सगळे पाणी अडवल्यानंतरसुद्धा १८ टक्के जमिनीपेक्षा जास्त सिंचन होऊ शकणार नाही. म्हणजे निसर्गावर अवलंबून राहणे, हा एकमेव मार्ग कोरड शेतीसाठी आहे. आता निसर्ग कशावर अवलंबून आहे? निसर्ग हा वनांच्या दाटीवर अवलंबून आहे. चेरापुंजी आणि महाबळेश्वर येथे पाऊस मोठय़ा प्रमाणात कोसळतो, याचे कारण तिथे असलेले घनदाट जंगल. जिथे जिथे जंगल साफ होईल तिथे तिथे पाऊस येणार नाही. या विषयातल्या तज्ज्ञ मंडळींनी २००५ साली दिलेला एक अहवाल असा आहे की, मध्य महाराष्ट्र आणि पूर्ण मराठवाडा इथे मोठय़ा प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पुढच्या दहा वर्षात (२००५ पासूनची दहा वष्रे म्हणजे बरोबर २०१५) पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाणार आहे आणि त्याचा प्रत्यय आता येऊ लागलेला आहे. म्हणून इथून पुढे अतिशय आवश्यक आहे ते जंगलांचे संरक्षण आणि शहरातल्या झाडांचे संरक्षण. माणसाची नाळ जशी शेतीशी जोडलेली आहे, तशी ती निर्सगाशीही जोडलेली आहे. ती नाळ तुटली तर उद्याची शेती अवघड होईल. हा देश अजून तरी ७० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असलेला देश आहे. अमेरिकेत आठ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि आपल्याकडे ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीवर जेवढी जास्त माणसे अवलंबून राहतील, तेवढी शेती न परवडणारी होईल. त्यामुळेच खेडय़ातील माणसांचा शहराकडे वाढलेला ओघ रोजगाराकरिता आहे आणि हा रोजगार खेडय़ात नाही, शहरात आहे. एकीकडे रोजगार वाढवणेही गरजेचे आहे, दुसरीकडे शेतीवरचा माणसांचा भार कमी करणे आवश्यक आहे आणि तिसरीकडे पर्यावरणाचे संतुलन साधणेही तेवढेच महत्त्वाचे. निसर्गाचा समतोल साधायचा असेल तर माणसाच्या हातात जे जे आहे, त्यामध्ये पहिल्या प्रथम झाडांची कत्तल थांबवणे, जिथे शक्य आहे तिथे झाडे मुळापासून उचलून ती दुसरीकडे लावणे, नवीन झाडे लावणे, बोडके डोंगर हिरवेगार करणे?आवश्यक आहे. रशियामध्ये आजही त्यांच्या ऑक्टोबर क्रांतिदिनी संपूर्ण देशातील प्रत्येक जण किमान एक झाड लावतो.?आपल्याकडे वन महोत्सवाची कल्पना टिंगलवारी नेली जाते. वृक्षारोपण हा फोटो प्रसिद्धीचा कार्यक्रम होतो. या विषयाचे राष्ट्रीय गांभीर्य लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे झाडांची कत्तल करणे, यात काही घातक दडले आहे, याची जाणीव अजून आपल्याला होत नाही. परिणामी, अतिशय वेगाने झाडांची कत्तल सुरू झालेली आहे आणि एक दिवस ती घातक ठरणार आहे. कोणत्याही परिस्थितीत अतिशय खंबीर भूमिका घेऊन झाडांची कत्तल रोखली पाहिजे. नाही तर उद्याचा महाराष्ट्र उजाड झाल्याशिवाय राहणार नाही.
[EPSB]
दहावी-बारावी
बारावीची परीक्षा सुरू आहे आणि आता दहावीची परीक्षा सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात या दोन्ही परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दोन परीक्षांमधला एक फरक कमालीचा लक्षणीय आहे.
[/EPSB]