महिलांनी आपले ध्येय गाठण्यासाठी, चाकोरीबाहेर पडावेच लागणार, या विचारावर ठाम राहायला हवे, असे आवाहन अभिनेत्री जुही बब्बर-सोनी यांनी केले.
मुंबई- ‘‘समाजात स्वत:ची ओळख कायम ठेवण्यासाठी तसेच ती नव्याने निर्माण करण्यासाठी महिलांनी त्यांच्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर येणे आवश्यक आहे. एकाच वेळी अनेक जबाबदा-या सांभाळणे, म्हणजेच ‘मल्टिटास्किंग’मध्ये महिलांचा हातखंडा असतो. त्यामुळे कोण काय बोलतोय, कुठला गट आपल्याबद्दल काय विचार करतोय, अशा क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेण्यात वेळ दवडू नये. महिलांनी आपले ध्येय गाठण्यासाठी, आपल्याला चाकोरीबाहेर पडावेच लागणार, या विचारावर ठाम राहायला हवे,’’ असे आवाहन अभिनेत्री जुही बब्बर-सोनी यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त ‘प्रहार’च्या कार्यालयात गुरुवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री जुही बब्बर-सोनी, शास्त्रीय गायिका डॉ. मीनल माटेगावकर, ‘मेन अगेन्स्ट व्हॉयलन्स अँड अब्युज’चे सचिव हरीश सदानी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी ‘प्रहार’चे संपादक महेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत ‘प्रहार’मधील महिला सहका-यांशी मनमोकळा संवाद साधला. जुही बब्बर यांनी आपला बालपणीचा काळ, त्यांचा नाटय़ व सिनेक्षेत्रातील कारकिर्दीबरोबरच ‘रिअल लाइफ’मध्ये पार पाडाव्या लागणा-या ‘आई’च्या भूमिकेचा प्रवास उलगडला.
‘‘माझा या क्षेत्रात प्रवेश सहज झाला नाही. घरात अभिनयाचे वातावरण असले तरी, ते माझ्यासाठी पूरक नव्हते. माझे वडील राज बब्बर यांना मी नाटकात वा चित्रपटात काम करावे, असे कधीच वाटले नाही. आपले मुलगे या क्षेत्रात आहेत, याचा त्यांना अभिमान होता. परंतु इथे आपली मुलगी नको, असे त्यांना वाटत होते आणि असे वाटण्यामागे काही गैर नव्हते. ते त्यांच्या जागी बरोबरच होते. त्यावेळी त्यांनी या क्षेत्रात पाहिलेल्या गोष्टी त्यासाठी कारणीभूत असाव्यात. माझी आई प्रगतीशील विचारांची असल्याने तिने मला पाठिंबा दिलाच. पण हा पाठिंबा एका स्टेजनंतर कमी झाला.
त्या वेळी माझ्या आजीने वडिलांना समजावले, तिला अभिनय करायचाय, तर करू दे. त्यानंतर कुठे वडिलांनी माझ्यासाठी ‘काश आप हमारे होते’ या चित्रपटाची निर्मिती केली. आता जर त्यांना माझ्या या क्षेत्रातील प्रवेशाबद्दल विचारले तर, त्यांचे उत्तर असेच असेल, ती या क्षेत्रात आहे ते चांगलेच आहे. या क्षेत्रात नसती, तर आणखीच चांगले असते,’’ असे जुई बब्बर यांनी सांगितले.
कलेची जाणीव केवळ मराठी जनतेलाच
महाराष्ट्रातील मराठी समाजालाच केवळ कलेची जाणीव आहे. उत्तर भारतीयांना कलेबाबत फारसे प्रेम नसते. कलेची जाण असणारा माणूस फक्त महाराष्ट्रातच सापडेल. इथे मराठी माणसाने चित्रपट, नाटक, संगीत प्रत्येक गोष्टीला डोक्यावर घेतलेले आहे. – जुही बब्बर-सोनी, अभिनेत्री
सगळेच पुरुष हिंसक नसतात. मात्र स्त्री अत्याचाराचे चित्र बदलण्यासाठी लैंगिक शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावू शकते. – हरिश सदानी, सामाजिक कार्यकर्ते.
महिलांना घर आणि करिअर सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. पण हे शिवधनुष्य स्त्री यशस्वीपणे पेलतेच. – डॉ. मीनल माटेगावकर, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका.