पावसाळयापूर्वी साथीच्या आजारांना रोखण्याकरता महापालिकेच्या आरोग्य विभागाने एक कृती आराखडा तयार केला होता. तरीही साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत.
मुंबई- पावसाळयापूर्वी साथीच्या आजारांना रोखण्याकरता महापालिकेच्या आरोग्य विभागाने एक कृती आराखडा तयार केला होता. तरीही साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यंदा जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिसार (गॅस्ट्रो) आणि कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची कबुली महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी दिली. त्यामुळे, पावसाळ्याच्या सुरुवातीला गाजावाजा करत अनेक उपाययोजना केल्याचे तसेच रुग्णांसाठी सोयी उपलब्ध केल्याचे महापालिकेचे दावे फोल ठरले आहेत.
शहरात साथीच्या अनेक आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे साथीच्या आजारांना कसे रोखावे, असा पालिकेच्या आरोग्य यंत्रणेसमोर प्रश्न आहे. प्रति दिवस ७० रुग्णांना लागण होत असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. मुंबईतील अनेक जलवाहिन्या या गटारांतून जात आहेत. देखभालीअभावी कित्येक जलवाहिन्या फुटल्याने त्यात सांडपाणी मिसळून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यातच यंदा जुलै महिन्यात मुंबईत ५१ टक्के पाऊस पडला. परिणामी, आतापर्यंत गॅस्ट्रोचे १,३१९ रुग्ण आढळले आहेत.
तसेच कॉलराचेही रुग्ण वाढत असल्याची कबुली पालिकेने दिली आहे. तर दुसरीकडे मलेरिया, ताप, लॅप्टोचे रुग्ण कमी झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. गॅस्ट्रो आणि कॉलराला रोखण्याकरता आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. खासकरून बी., ई., जी. दक्षिण आणि एम. मध्य या चार प्रभागांमध्ये सातत्याने गॅस्ट्रो आणि कॉलराचे रुग्ण आढळत असल्याचे साथरोग नियंत्रण कक्षातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्या परिसरातून पालिकेने दूषित पाण्याचे दीडशे नमुनेही तपासले आहेत.