जैतापूर प्रकल्पग्रस्तांचा जमीन प्रश्न आम्ही सोडवला आता केवळ साखरीनाटे येथील मच्छीमारांचा प्रश्न बाकी असून त्यांचा प्रश्नही लवकरच मार्गी लावला जाईल व त्यांना मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करेन, अशी ग्वाही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली.
सावंतवाडी- जैतापूर प्रकल्पग्रस्तांचा जमीन प्रश्न आम्ही सोडवला असून ९८ टक्के प्रकल्पग्रस्तांना प्रति एकरी साडे बावीस लाख रुपये मोबदला मिळवून दिला आहे. आता केवळ साखरीनाटे येथील मच्छीमारांचा प्रश्न बाकी असून त्यांचा प्रश्नही लवकरच मार्गी लावला जाईल व त्यांना मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करेन, अशी ग्वाही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली. या निवडणुकीत शिवसेनेने कच्चा उमेदवार दिल्याने खा. डॉ. निलेश राणे हे दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील. तसेच महाराष्ट्रातीलही आघाडीच्या ४८ पैकी ३१ जागा निश्चितपणे निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी दौ-यावर आलेल्या नारायण राणे यांनी येथील संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत युवा नेते नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष बाळा गावडे, प्रांतिक सदस्य विकास सावंत, सनी कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस संजय परब, शहर अध्यक्ष मंदार नार्वेकर, मनोज नाईक आदी उपस्थित होते.
राजापूर तालुक्यातील जैतापूरच्या औष्णिक प्रकल्पामुळे महाराष्ट्राची वीज समस्या कायमची मिटणार आहे. हा केंद्राचा प्रकल्प असून यामुळे स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. या ठिकाणी आता कोणताही विरोध उरला नसून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. ९८ टक्के लोकांना जमिनीचा मोबदला दिला असून मच्छीमारांचे प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहेत. दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते चांगले काम करीत असून २५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच प्रचाराची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र व राज्य सरकारने अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत. पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याच्या विकासासाठी मीसुद्धा अनेक योजनांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. खासदार डॉ. निलेश राणे यांनीही पाच वर्षात चांगलं काम केलं आहे. दोन्ही जिल्ह्यांत सातत्याने संपर्क ठेवून केंद्राच्या विविध योजना गावागावात प्रभावीपणे राबवल्या आहेत. त्यात शिवसेनेचा उमेदवार अत्यंत कच्चा आहे. स्थानिकांचे कोणतेही प्रश्न विरोधकांनी सोडवलेले नसल्याने त्यांना मत मागण्याचा नैतिक अधिकारच नाही, असेही उद्योगमंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीतील आघाडीच्या नाराजीबद्दल बोलताना ते आमचे मित्र आहेत. नाराजी लवकरच दूर होईल हा राज्यस्तरावरील विषय आहे. प्रत्येकाने आघाडीचा धर्म पाळावा ही माझी भूमिका आहे. पक्षाच्या हितासाठी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार वागणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हा विषय एका मतदारसंघापुरता नाही. नारायण राणे जिल्ह्यापुरता मर्यादित नाही. आम्हीही राज्यभर प्रचारात सहभागी होणार आहोत. प्रत्येक जागा आघाडीसाठी महत्वाची आहे. त्यात वैयक्तिक स्वार्थ नाही. पक्षहित महत्त्वाचे असे सांगतानाच खा. डॉ. निलेश राणे यांना कोणत्याही परिस्थितीत दोन लाखांवर मताधिक्य मिळवून देणारच, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या वेळच्या तुलनेत ही निवडणूक फारच सोपी आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगले काम सुरू आहे. सावंतवाडी तालुक्यातूनही डॉ. निलेश राणे यांना २२ हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच गेल्या दहा वर्षात अन्नसुरक्षा योजना, राजीव गांधी आरोग्य योजना, मनरेगासारख्या अनेक लोकोपयोगी योजना मार्गी लागल्या आहेत. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठीही राज्य सरकारच पुढे आले आहे. त्यामुळे जनतेचा काँग्रेस आघाडीवर विश्वास आहे. विरोधकांची परिस्थिती मात्र फारच बिकट असून एक ना धड भाराभर चिंध्या अशीच त्यांची गत झाली आहे.
‘एकटेच मोदी व राजनाथ सिंग’ अशी भाजपची परिस्थिती असून त्यांचा आलेख खाली घसरत आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस आघाडीच्या ४८ पैकी ३१ जागा निश्चितपणे निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.