नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत परदेशात असलेल्या काळ्या पैश्यासंदर्भात विशेष तपास पथक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवी दिल्ली- शपथविधीच्या दुस-याच दिवशी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आपल्या कामाला सुरुवात केली. मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत परदेशात असलेल्या काळ्या पैश्यासंदर्भात विशेष तपास पथक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एम.बी.शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात येणार आहे. या समितीमध्ये माजी महसूल सचिव, सीबीआय आणि आयबीचे संचालक, अंमलबजावणी संचलनालयातील अधिकारी, सीबीडीटीचे अध्यक्ष, आरबीआयचे डेप्युटी गर्व्हनर हे या समितीचे सदस्य असतील. तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अर्जीत पसायत हे या विशेष पथकाचे उपध्यक्ष असतील.
गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला यासंदर्भात विशेष तपास पथक नेण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारने आपल्या पहिल्याच बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार काळ्या पैश्यासंदर्भात विशेष तपास पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारसाठी हा महत्त्वाचा विषय असल्याचे कायदा आणि दूरसंपर्क मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विशेष तपास पथक नेमण्याची मुदत बुधवारीपर्यंत होती. त्यामुळे यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक होते, प्रसाद यांनी सांगितले. हे पथक वेळच्या वेळी न्यायालयास आपल्या कामाचा आढावा सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोमवारी मोदींचा शपथविधी झाल्यानंतर त्यांनी लगेच मंगळवारी खातेवाटप जाहीर केले. त्यानंतर आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसह तब्बल दीड तास बैठक घेतली.
दरम्यान, सोमवारी उत्तर प्रदेशमध्ये दिल्ली-गोरखपूर एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात ठार झालेल्या २८ जणांच्या मृत्यूबद्दल मंत्रिमंडळाने शोख व्यक्त केला.