मराठी भाषकांचे राज्य निर्माण होण्यासाठी एक जबरदस्त आणि विलक्षण असा लढा याच मराठी जनतेने दिला. त्याच्या आघाडीवर कामगार होता आणि शेतकरीही होता. हे दोन महत्त्वाचे घटक पाच वर्षे चाललेल्या या संघर्षात कायमचे आघाडीवर राहिले. ते तसे राहिले नसते तर ही विराट चळवळ उभी राहिली नसती. अलीकडच्या काळात अग्रलेखाच्या जागेवर चित्र टाकण्याचा मोह अनेकांना होतो. ‘प्रहार’ने ही गोष्ट जाणीवपूर्वक टाळली. परंतु आज हे चित्र जे आम्ही प्रसिद्ध करत आहोत, ते महाराष्ट्राचे खरे मानदंड आहेत.
बघता बघता अर्ध शतक उलटले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील त्यावेळची एक पिढी संपूनही गेली. त्या लढय़ाचे काही साक्षीदार आहेत. ते ही कालचक्राप्रमाणे काळाच्या पडद्याआड हळूहळू जातील. चळवळीतील दुस-या पिढीला संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाचे प्रभावीपण आपण सांगितलेले नाही. छपन्न वर्षापूर्वी आज रात्री १२ वाजता पंडित नेहरू यांच्या हस्ते आणि यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत ज्या ज्या महाराष्ट्र राज्याच्या नकाशाचे प्रज्ज्वलन झाले तो मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आजच्या पिढीला सुखाने मिळालेला नाही. मराठी भाषकांचे राज्य निर्माण होण्यासाठी एक जबरदस्त आणि विलक्षण असा लढा याच मराठी जनतेने दिला. त्याच्या आघाडीवर कामगार होता आणि शेतकरीही होता. हे दोन महत्त्वाचे घटक पाच वर्षे चाललेल्या या संघर्षात कायमचे आघाडीवर राहिले. ते तसे राहिले नसते तर ही विराट चळवळ उभी राहिली नसती. अलीकडच्या काळात अग्रलेखाच्या जागेवर चित्र टाकण्याचा मोह अनेकांना होतो. ‘प्रहार’ने ही गोष्ट जाणीवपूर्वक टाळली. परंतु आज हे चित्र जे आम्ही प्रसिद्ध करत आहोत, ते महाराष्ट्राचे खरे मानदंड आहेत. महाराष्ट्रातील खेडय़ा-पाडय़ांतील शेतकरी चवताळून उठल्यासारखा या लढय़ात सामील झाला. मार खायला तयार झाला. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवणारच..’ ही गगनभेदी गर्जना ज्या कामगारांनी केली तो मुंबईचा लढाऊ कामगार आज उदध्वस्त झाला असला तरी या पाच वर्षाच्या लढय़ात प्राण फुंकण्याची कामगिरी मुंबईतील कामगारांची, गिरणी कामगारांची आणि ग्रामीण भागातील शेतक-यांची होती. या १०६ लढवय्यांनी आपल्या रक्ताचे शिंपण करून महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणाची पर्वा केली नाही. त्यांचे हे प्रतिकात्मक स्मारक इतके अनुरूप आहे की, कामगार आणि शेतकरी हेच या लढय़ाचे प्रतिक होते. पण त्याचवेळी केवळ मराठी भाषकांचा हा लढा नव्हता. जे १०६ शूरवीर धारातिर्थी पडले या १०६ पैकी १५ लढवय्ये हे मराठी भाषिक नव्हते याची नोंद इतिहासाने घेतलेली आहे. आजच्या पिढीला हे मुद्दाम सांगावे लागेल की, या लढय़ात शहीद झालेल्या कमळाबाई मोहिते या भगिनी तर सातव्या महिन्यातील गरोदर होत्या. त्यांच्या पोटात वाढत असलेले बाळ रस्त्यावर चिंधडय़ा होऊन पडले. जे बिगर मराठी १५ मराठी शहीद झाले त्यात मुन्शी वझीरअली, सय्यद कासम, महम्मद अली हे मुस्लिम बांधव जसे होते त्याचप्रमाणे, जोसेफ डेव्हीड, पी. एस. जॉन हे ख्रिश्चन बांधव होते. बेदी सिंग हा सरदारजी होता. बालन्ना मुतन्ना कामाठी हा दाक्षिणात्य होता. रामचंद्र भाटीया होता. असे हे विविध भाषिक मुंबईच्या गिरणीत काम करत होते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ासाठी रस्त्यावर उतरलेले होते. महाराष्ट्रातील दहा शेतकरी या लढय़ात शहीद झालेले आहेत. जगात असा कोणताही लढा नाही जो सतत पाच वर्षे चालला आणि तो शेतकरी आणि कामगारांनी प्रामुख्याने लढवला.
आज या विषयाची चर्चा करताना लढय़ात शहीद झालेले हे सर्व हुतात्मे असे डोळय़ांसमोर येतात, तो सगळा लढा एखाद्या चित्रपटाची फिल्म डोळय़ांसमोरून जावी, तसा डोळय़ांसमोर तरळतो. ते मोर्चे, ते लढे, त्या घोषणा, ते लाठीमार, ते गोळीबार आणि पेटून उठलेला महाराष्ट्र डोळय़ासमोर येतो. कामगार आणि शेतकरी यांच्या प्रचंड त्यागातून हे राज्य आपल्याला मिळाले आहे. पण स्वर्गातून हे दोन्ही डोळे आम्हाला प्रश्न विचारत असतील की, आम्ही लढलो, आमचे रक्त सांडले. पण आज ५६ वा वाढदिवस साजरा करीत असताना मुंबई आणि महाराष्ट्रातील कामगारांची स्थिती काय आहे? त्या कामगारांना कुचलून टाकलेले आहे. उद्ध्वस्त केलेले आहे. कोणताही कामगार कायदा आज कामगाराच्या मदतीला येत नाही. या देशात गेल्या ५० वर्षात देशाचा उद्योगपती ३ लाख कोटी रुपये बुडवू शकतो आणि त्याचा बालही बाका होत नाही, तो मिजाशीत लंडनला पळून जाऊ शकतो, त्याचे काही वाकडे केले जात नाही. प्रामुख्याने या राज्यात कामगारांना कुचलून टाकले जात आहे. मुंबईचा गिरणगाव उद्ध्वस्त करून गिरण्यांच्या मालकांनी सोन्याची लंका उभी केली. जिथे गिरणी कामगार राबला आणि मुंबईत सोन्याचा धूर निघत होता तिथेच त्या कामगाराचे दफन करण्यात आले. त्याला देशोधडीला लावले. त्याला हवे होते एका खोलीचे घर.. तेही आपण देऊ शकलो नाही. आणि मुंबई महाराष्ट्राची म्हणणा-या मराठी माणसांच्या हातून ही मुंबई कधीच निघून गेली आहे. आकाशाला चुंबायला निघालेले हे प्रचंड टॉवर बिगर मराठी माणसांच्या मालकीचे झाले. ज्या गिरणगावात संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्याची मशाल कामगार खांद्यावर घेऊन लढला त्या चौकात आज ओसवाल, शर्मा, वर्मा यांचे प्रचंड टॉवर उभे राहिले आणि त्या खाली कामगाराला चिरडून टाकलेले आहे. एका खोलीचे घर मिळावे म्हणून कामगार भिका-यासारखा सरकारच्या मागे लागलेला आहे आणि त्या कामगाराला खोटी आश्वासने देऊन हे सरकार त्याची फसवणूक करत आहे. ज्या कामगारांनी पेटून उठायला पाहिजे त्या कामगारांची मुंडी दाबून टाकली आहे. पैशाने सगळी व्यवस्था कोलमडली आहे. काल जे फाटके होते ते एका रात्रीत आणि ‘प्रभात’ झाल्याबरोबर करोडोपती बनले आहेत.
इकडे ही कामगारांची अवस्था. मुंबईच्या मराठी माणसाच्या हातात कसलाही उद्योग राहिला नाही. मराठी माणूस मुंबईत दुय्यम झाला आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे टक्केवारीच्या भाषेमध्ये गब्बर झाले. त्यांच्या घोषणा मराठी माणसांच्या हिताच्या, त्यांची भाषणे म्हणजे ‘आम्ही असली औलाद नाही, आणि तसली औलाद नाही’, अशी टाळय़ाखाऊ. पण, या मुंबईच्या मराठी माणसाच्या हातून उद्योग निघून गेला आणि ‘वडा पाव’च्या गाडय़ावर मुंबईतील मराठी माणूस आज या घोषणावाल्यांच्या मागे धावतो आहे. सरकारने फसवणूक केलीच. या सेनावाल्यांनीही फसवणूक केली. राज्यसभेत त्यांचे खासदार ‘रोखठोक’ बोलताना दिसत नाहीत आणि ‘सच्चाई’ही सांगत नाहीत. महाराष्ट्रात आले की, टिवटिव सुरू, दिल्लीत गप्प. महाराष्ट्रात भाषा मराठी माणसाची आणि व्यवहार टक्केवारीचा.
५६ वर्षात मराठी माणूस पार निकालात निघाला, कामगार निकालात निघाला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकरीही निकालात निघाला आहे. भाजपाचे राज्य आल्यापासून तर हे सरकार म्हणजे ४२० सरकार आहे. फसवणूक करणारे सरकार आहे, हे एकच कलम या सरकारला लावता येईल. ज्या शेतक-यांना त्यांनी मोठी स्वप्ने दाखवली होती त्या शेतक-याच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी लाज वाटावी असा हा आकडा आहे. गेल्या दोन वर्षात तीन हजार शेतक-यांच्या महाराष्ट्रात आत्महत्या आणि त्याची कबुली केंद्रातील सरकारने लोकसभेत दिली. तरीही महाराष्ट्रातील बेशरम सरकारला त्याची खंत नाही. संतापाच्या पलीकडची ही अवस्था आहे. महाराष्ट्रातील कामगार आणि शेतकरी आज हे सगळे सहन करतो आहे.
महाराष्ट्राच्या ५६ व्या वाढदिवसाची सुप्रभात उद्या सकाळी होईल. त्या दिवशी एक संकल्प करूया की, ‘कामगार आणि शेतक-याला कुचलून टाकणारे हे सरकार उलथून टाकणे’, या एकाच कामात आता कामगार आणि शेतक-यांची सगळी शक्ती एकवटून, सगळे अत्याचार सहन करून, या सरकारला पराभूत करणे, हाच महाराष्ट्र दिनाचा संकल्प असला पाहिजे.