वयाच्या अवघ्या ९व्या वर्षीच महासूर्याची पत्नी म्हणून आंबेडकर घराण्यात प्रवेश करून ती सर्वांची लाडकी झाली आणि सुखाचा काळ कमी पण दु:खद घटनाच त्या माऊलीच्या वाटय़ाला जास्त आल्या. समाजातील सर्वात जास्त शिकलेला पती आपणास मिळाला याचा तिला नेहमी अभिमान वाटे, आनंद वाटे. लगेच तिला ही देखील जाणीव झाली की, आपली गाठ एका वादळाशी आहे. विस्तवाशी आपलं नातं जुळलेलं आहे आणि या जाणिवेनं आपल्याला आगीतून प्रवास करावयाचा आहे, अशी पक्की गाठ मनाशी बांधली होती. बाबासाहेबांचा वादळरूपी संसार सांभाळायला रमा ठामपणे उभी राहिली.
डॉ. भीमराव आंबेडकर हे आपल्या तमाम बहुजनांचे, दलितांचे कैवारी म्हणजे सर्वाचे बाबा आणि त्यांच्या पत्नी म्हणजे सर्व बहुजनांच्या महामाता म्हणजे रमाबाई भीमराव आंबेडकर होय. रमाई केवळ बाबासाहेबांच्या पत्नीचीच भूमिका बनून राहिल्या नाहीत, तर त्या बाबासाहेबांच्या प्रेरणा, स्फूर्ती बनल्या आणि आपल्या कार्याने, त्यागाने अजरामर ठरल्या.
रमाई प्रेमळ, सहनशील वृत्तीच्या त्यागी, कारुणेच्या मूर्ती होत्या. त्यांचे जीवनचरित्र वाचताना, सांगताना त्यांचा त्याग सहनशीलता व कारुण्य किती असामान्य होते, याची ठायी ठायी जाणीव होते.
एका गरीब कुटुंबात कष्टाळू पण प्रामाणिक भिकू रूक्मिणीच्या पोटी जन्म घेतलेली रमा बालपणातच संसाराचे प्रामाणिक पण कष्टाचं, सहनशीलतेचं सूत्र आत्मसात करत होती. बालवयातील आनंद हा जास्त काळ रमाईस लाभला नाही. आई-वडिलांचा सहवासही अल्पकाळच लाभला. संसाराचे ओझे घेऊन भावंडांची जबाबदारी सांभाळणारी रमा, बाल वयातील हृदय हेलावणारे प्रसंग आणि त्या प्रसंगाने इवलंस मन गुदमरून टाकणा-या समस्या ज्यावेळी तिच्या समोर उभ्या राहतात तेव्हा कसा सामना केला असेल त्या छोटय़ाशा वयात माझ्या रमाईने? ते दु:खाचे डोंगर मनावर कसे झेलले असतील, या विचाराने डोळे भरून येतात.
वयाच्या अवघ्या ९व्या वर्षीच महासूर्याची पत्नी म्हणून आंबेडकर घराण्यात प्रवेश करून ती सर्वांची लाडकी झाली आणि सुखाचा काळ कमी पण दु:खद घटनाच त्या माऊलीच्या वाटय़ाला जास्त आल्या. समाजातील सर्वात जास्त शिकलेला पती आपणास मिळाला याचा तिला नेहमी अभिमान वाटे, आनंद वाटे. लगेच तिला ही देखील जाणीव झाली की, आपली गाठ एका वादळाशी आहे. विस्तवाशी आपलं नातं जुळलेलं आहे आणि या जाणिवेनं आपल्याला आगीतून प्रवास करावयाचा आहे अशी पक्की गाठ मनाशी बांधली होती. बाबासाहेबांचा वादळरूपी संसार सांभाळायला रमा ठामपणे उभी राहिली. पितृतुल्य रामजी बाबांनीदेखील रमाईला हेच सांगितले आणि रमाईनेदेखील रामजीबाबांना वचन दिले की, भीमरावांच्या पाठीशी सदैव राहीन आणि रमाई त्याप्रमाणे ताठ उभी राहिली. अनेक संकटे झेलली, संसाराच्या आगीचे चटके भोगले. अपार कष्ट उपसले; पण त्याची इतर कुणालाही झळ पोहोचू दिली नाही. अगदी बाबासाहेबांना सुद्धा.
बाबासाहेब परदेशी शिक्षणासाठी गेले, पण त्यांच्या गैरहजेरीत मनाला घायाळ करणारे प्रसंग, आक्रोश करायला लावणारे दु:ख, लाचार गरिबी हे सारे आमची माता रमाई एकटे सहन करत होती. एक काळ असा होता की, एकेक बाळे तिच्यापासून हिरावली जात होती. हतबल झालेली, पायातील त्राण संपलेली रमाई दु:खावर मात करून पुन्हा पुन्हा स्वत:मध्ये बळ आणते आणि ताठ उभी राहते. आपल्या पतीलादेखील धीर देत काळावर मात करते आणि कष्टानं संसारास सुरुवात करते इतके असामान्य व्यक्तिमत्त्व आहे. खरंच हे सारं वाचताना रमाईची मूर्ती डोळय़ांसमोर सहज उभी राहते.
या महामातेची महानता किती वर्णावी तेवढी थोडीच आहे आणि म्हणूनच ७ फेब्रुवारी २०१५ रोजी माता रमाई स्मारक तिच्या माहेरी दापोली तालुक्यातील वणंद गावी, तिच्या सुनेच्या म्हणजे महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या पुढाकाराने बांधलेला राष्ट्रीय स्मारक पाहायला मिळतंय हे आमचे भाग्यच.
बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतलं. त्यासाठी ते परदेशी गेले, बॅरिस्टर झाले. सामाजिक क्रांतीचे अनेक लढे दिले. महाडच्या चवदार तळय़ाचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन, बहिष्कृत हितकारिणी अशा अनेक घडामोडींमागे माता रमाईची प्रेरणा होती. बाबासाहेबदेखील असे मानत होते.
धारवाडच्या वसतिगृहातील उपाशी मुलांसाठी स्वत: च्या सोन्याच्या बांगडय़ा विकून बाबांच्या समाजकार्याला रमाईने हातभार लावला.
बाबासाहेबांच्या संसाराची जबाबदारी स्वत:वर घेऊन बाबासाहेबांना समाजकार्यास प्रेरणा देऊन सहकार्य करणा-या रमाईचा आदर्श सर्व महिलांनी घेणे आवश्यक आहे. सारी दु:खे माझ्यावर सोपवा म्हणून बाबासाहेबांना संसाराच्या चौकटीतून मुक्त करणारी रमाई असंख्य लेकरांची महामाताच बनली. रमाईस माझे कोटी कोटी प्रणाम.