दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील अग्नितांडवात अग्निशमन दलाच्या दोन अधिका-यांचा मृत्यू झाला असून, आगीत होरपळून दोन अधिकारी गंभीररित्या जखमी झाले आहेत.
मुंबई – दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील अग्नितांडवात अग्निशमन दलाच्या दोन अधिका-यांचा मृत्यू झाला असून, आगीत होरपळून दोन अधिकारी गंभीररित्या जखमी झाले आहेत.
संजय राणे आणि महेंद्र देसाई हे दोन अधिकारी इमारतीच्या ढिगा-याखाली सापडून मरण पावले. अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर आणि उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन गंभीररित्या जखमी झाले असून, त्यांच्यावर ऐरोलीच्या बर्न रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काळबादेवी भागातील जुन्या हनुमान गल्लीतील ३३ गोकुळ निवास या इमारतील शनिवारी संध्याकाळी लागलेली भीषण आग आता विझली आहे मात्र नऊ तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत अग्निशमन दलाच्या अधिका-यांसह एकूण १० जण जखमी झाले आहेत.
संध्याकाळी साडेचारच्या सुमारास लागलेल्या आगीने पाहता पाहता रौद्ररुप धारण केले. सुरुवातीला ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाडया पाठवण्यात आल्या होत्या. मात्र आगीची भीषणता वाढल्याने तसेच आसपासच्या इमारतींना धोका निर्माण झाल्याने अग्निशमन दलाच्या तब्बल २२ गाडयांनी अथक प्रयत्न करुन अखेर आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असताना रात्री आठच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळून त्याखाली संजय राणे आणि महेंद्र देसाई हे अधिकारी गाडले गेले. मध्यरात्रीच्या सुमारास या दोन्ही अधिका-यांना ढिगा-खालून बाहेर काढून जवळच्या जीटी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गोकुळ निवास या इमारतीकडे जाणारा रस्ता अरुंद आणि चिंचोळ असल्याने अग्निशमन दलाला अनेक अडथळे पार करुन इमारतीपर्यंत पोहोचावे लागले. तो पर्यंत बराचवेळ निघून गेला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाडया उभ्या होत्या. या गाडया बाहेर काढल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब आत जाऊ शकले.
या भागात रस्ते अरुंद असून, इमारती खेटून उभ्या आहेत. त्यामुळे आग दुस-या इमारतीपर्यंत पोहचू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना प्रयत्नांची शर्थ करावी लागत होती. गोकुळ निवास या इमारतीचे बांधकाम लाकडी होते तसेच या इमारतीत कपडयाची दुकाने होती. त्यामुळे आग अधिक वेगाने भडकली.
आता या इमारतीची आग पूर्णपणे विझवण्यात आली असून, येथे जेसीबी लावून ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. एनडीआरएफची टिमही बचावकार्यात गुंतली आहे.
पोळ कुटुंबावर दु:खाचा डोंगर
गोकुळ निवासमध्ये व्यापारी कार्यालयांची संख्या जास्त असून, फक्त दोनच कुटुंबे रहात होती. त्यातील एक कुटुंब राजस्थान अजमेर येथे गेले असल्याने त्यांचे घर बंद होते तर, दुस-या घरात पोळ हे महाराष्ट्रीय कुटुंब रहाते. पोळ कुटुंबात पंधरा दिवसांनी लग्नसोहळा आहे. या आगीत त्यांचा संपूर्ण संसार उदध्वस्त झाल्याने पोळ कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या लग्नासाठी केलेली खरेदी, दागदागिने या आगीत जळून खाक झाले आहेत. पोळ यांची कन्या प्रियंकाचे पंधरा दिवसांनी लग्न आहे. आग लागली तेव्हा प्रियंका आणि तिचे वडील कामावर होते. घरात तीन महिला आणि एक लहान मुलगी होती.
सुधीर अमीन यांच्या पायावर शस्त्रक्रिया
काळबादेवीतील इमारतीच्या आगीत गंभीररित्या भाजलेले सुधीर अमीन यांच्यावर ऐरोलीच्या नॅशनल बर्न रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉ. केसवानी यांनी रविवारी सकाळी त्यांच्या दोन्ही पायावर शस्त्रक्रिया केली. मोठया प्रमाणावर धुर आत गेल्याने त्यांच्या फुप्फुसाला इजा झाली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असली तरी, स्थिर आहे.