काशीमिरा स्मशानभूमीत कर्तव्यावर गैरहजर असलेल्या दोघा कर्मचा-यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.
भाईंदर – काशीमिरा स्मशानभूमीत कर्तव्यावर गैरहजर असलेल्या दोघा कर्मचा-यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. अंत्यविधीसाठी कर्मचारी नसल्याने स्थानिक नगरसेवकासह मृताच्या नातलगांनी मृतदेह पालिका मुख्यालयासमोर ठेवत निषेध नोंदवला होता. मांडवी पाडय़ातील मंजू गुप्ता (३८) हिचा भाजल्याने मृत्यू झाला होता.
सोमवारी दुपारी चारच्या सुमारास नातलगांनी हा मृतदेह काशीमिरा पालिका स्मशानभूमीत नेला. मात्र नेहमीप्रमाणे अंत्यविधिसाठी कर्मचारी नव्हते. नगरसेवक अनिल भोसले मृताच्या नातलगांसह रात्री आले व त्यांनी मृतदेह पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठेवला. कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर काशीमिरा स्मशानभूमीत रात्री अंत्यविधी उरकण्यात आला.
प्रशासनाने याप्रकरणी कर्तव्यावर असूनही स्मशानभूमीत नसलेल्या त्रिभूवन सोलंकी व पुम्मास्वामी पुम्मालय यांना मंगळवारी निलंबित केले. काशीमिरा स्मशानभूमीत कर्तव्यावरील सफाई कामगार कधीच जागेवर नसतात. याआधीही कर्मचारी नसल्याने मृतदेह तासन् तास ताटकळत ठेवण्याचे प्रकार घडले आहेत. प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे अनिल भोसले यांनी सांगितले.