गेल्या १४ दिवसांत जम्मू-काश्मीरमधील महापुरातून २.२६ लाख नागरिकांची लष्कर व एनडीआरएफने सुटका केली.
नवी दिल्ली- गेल्या १४ दिवसांत जम्मू-काश्मीरमधील महापुरातून २.२६ लाख नागरिकांची लष्कर व एनडीआरएफने सुटका केली असून सैन्य दलांच्या ८० वैद्यकीय पथकांनी ५३ हजार जणांवर उपचार केले आहेत. राज्याच्या विविध भागात मदतकार्य अजूनही वेगाने सुरू आहे, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. काश्मीर खो-यात रेल्वे सेवा अंशत: सुरू झाल्याचे उत्तर रेल्वेने जाहीर केले.
लष्कराने पूरग्रस्तांवर तातडीने उपचार करण्यासाठी अवंतीपूर, पट्टण, अनंतनाग आणि जुन्या विमानतळावर तात्पुरती वैद्यकीय केंद्रे उभारली आहेत. तसेच श्रीनगरमध्ये तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारली आहे. तंबू, पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिटे दिल्लीहून मागवली आहेत.
जम्मू-श्रीनगर महामार्ग अजूनही बंदच
जम्मू-श्रीनगर महामार्ग सलग १२ व्या दिवशीही बंदच आहे. त्यामुळे काश्मीर खो-यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. ३०० किलोमीटरचा हा महामार्ग काश्मीरची जीवनवाहिनी आहे.
दरम्यान, काश्मीर खो-यातील रेल्वे सेवा अंशत: सुरू झाली आहे. पुरामध्ये नुकसान झालेले रुळ बदलण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. श्रीनगर ते बारामुल्ला भागातील सेवा पुन्हा सुरू झाली आहे, असे उत्तर रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
उत्तर रेल्वे आणि स्वयंसेवी संस्थातर्फे विविध रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना मोफत अन्न पुरवले जात आहे. रेल्वेचे डॉक्टर आणि वैद्यकीय पथक स्थानकांवर तैनात केले आहे. तसेच पूरग्रस्तांनासाठी २० आरओ प्लॅँट हैदराबादहून तर ४ आरओ प्लॅँट दिल्लीहून श्रीनगरला पाठवली आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या महापुराची दखल सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने घेतली. काश्मीरमधील जनतेला अन्न, पाणी, औषधे आणि इंधनाचा पुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे आदेश न्यायालयाने जम्मू-काश्मीरला दिले आहेत. पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचा विचार करावा तसेच बॅँकिंग सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच जम्मू-काश्मीरच्या मुख्य न्यायाधीशांनी राज्य सरकारच्या अतिथीगृहा किंवा न्यायाधीशांच्या निवासस्थानातून कार्य करावे, असे आदेश दिले.
दरम्यान, जम्मू-काश्मीर हे संवेदनशील राज्य असल्याने येथील मदत व बचाव कार्य हे लष्कर, आपत्कालिन व्यवस्थापन पथक (एनडीआरएफ) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केले आहे, अशी माहिती महाधिवक्त्यांनी न्यायालयाला दिली.