पारंपरिक शेतीला फाटा देऊन दुष्काळी परिस्थितीत बारामतीतील का-हाटी येथील शेतक-याने कलिंगडाचे यशस्वी उत्पादन घेतले.
पारंपरिक शेतीला फाटा देऊन दुष्काळी परिस्थितीत बारामतीतील का-हाटी येथील शेतक-याने कलिंगडाचे यशस्वी उत्पादन घेतले. एकरी २५ टन उत्पादन मिळाल्याने जवळपास सव्वादोन लाख रुपयांचा फायदा त्यांना झाला. मुंबईतील व्यापा-याने जागेवरच या कलिंगडाची खरेदी केली. त्यामुळे वाहतूक खर्चदेखील वाचला आहे.
का-हाटी येथील घनश्याम जयसिंग पवार या शेतक-याने नुनहैमन्स इंडिया कंपनीच्या आयशा जातीच्या कलिंगडाची लागवड केली. त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. या भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. तरीदेखील ठिबकद्वारे वेळेत पाणी, खते, औषधे दिली. त्यामुळे ओसाड माळरानावर एक एकरात २५ टन कलिंगडाचे उत्पादन घेतले. सुरुवातीला पुणे, मुंबईच्या बाजारात कलिंगडे विक्रीसाठी पाठवली. तेथील व्यापा-यांनी शेतावर येऊन कलिंगडे खरेदी केली. त्यामुळे वाहतूक खर्चदेखील वाचला आहे. दुष्काळात वेगळा प्रयोग म्हणून पवार यांनी या पिकाची लागवड केली होती. त्यासाठी फक्त ३० हजार रुपये खर्च झाला. उत्पादन खर्च वगळता सव्वादोन लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी कंपनीचे सोमनाथ माकर, आशीष वानखेडे यांनी मदत केली.
पवार यांना एकूण १५ एकर क्षेत्र आहे. मात्र पाण्याअभावी त्यांनी केवळ २ एकर क्षेत्रातच पीक उत्पादन घेतले आहे. त्यापैकी एक एकरामध्ये कलिंगड, एक एकरात शेवगा लागवड केली आहे. त्यामध्ये शेवगा पिकात भेंडीचे अंतरपीक घेतले आहे. हे दोन्ही शेतीप्रयोग यशस्वी करण्यासाठी कमी पाण्यामुळे पवार यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. पवार यांनी सांगितले की, दिवसेंदिवस शेतीच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन कमी पाण्यावर पिके घेण्यासाठी शेतक-यांनी पुढे येण्याची गरज आहे. उत्पादन खर्चामध्ये बचत करणे आणि उत्पादित मालाच्या नफ्यात वाढ होण्यासाठी सामूहिक शेतीची संकल्पना स्वीकारणे आवश्यक आहे. त्यातून शेती व्यवसायाला निश्चितच चांगले दिवस येतील.