राज्यात ई-स्कॉलरशिपसाठी असलेले संकेतस्थळ उघडले जात नसल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना अर्जच करता आला नाही.
अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना ई-स्कॉलरशिपसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरता १७ ऑगस्ट अंतिम मुदत होती. मात्र संकेतस्थळाच्या घोळामुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्जच करता आला नाही. त्यामुळे हे विद्यार्थी सरकारच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
‘ई-स्कॉलरशिप’पासून हजारो विद्यार्थी वंचित
राज्यात ई-स्कॉलरशिपसाठी असलेले संकेतस्थळ उघडले जात नसल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यातच अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना ई-स्कॉलरशिपसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरता १७ ऑगस्ट अंतिम मुदत होती. मात्र संकेतस्थळाच्या घोळामुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्जच करता आला नाही. त्यामुळे हे विद्यार्थी सरकारच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल आदी घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी विभागाकडून https://mahaeschool.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. मात्र या प्रक्रियेत निर्माण होत असलेल्या अनेक प्रकारच्या अडचणी आणि त्रुटींचा हजारो विद्यार्थ्यांना फटका बसत असून, यामुळे अनेकांना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागत आहे. यंदाही या ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळच सुरू होत नसल्याने ग्रामीण आणि शहरी भागातीलही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे यंदाही शेकडो विद्यार्थी सरकारच्या शिष्यवृत्तीला मुकण्याची शक्यता आहे.
संकेतस्थळ सुरू होत नसल्याबाबत राज्यभरातील समाज कल्याण कार्यालयात विद्यार्थ्यांकडून शेकडो तक्रारी करण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, रायगड येथे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, मागासवर्गीय विद्यार्थी-पालक संघटना आदींनी ई-स्कॉलरशीपसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठीअर्ज करण्यात अडचणी येत आहेत, अशांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जावेत, अशी मागणीही सामाजिक न्याय मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मात्र अद्याप या मागणीवर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या मुंबई अध्यक्षा तृप्ती निकाळजे यांनी सांगितले.
‘आयडॉल’चे प्रवेश घटले
मागील अनेक वर्षापासून प्रवेश आणि विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींसाठी वादाच्या भोव-यात सापडणा-या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन केंद्रातील (आयडॉल) ऑनलाइन प्रवेशाचा गोंधळ अद्यापही कायम आहे. ‘आयडॉल’च्या ऑनलाइन प्रवेशाचे संकेतस्थळच ‘हँग’ होत असल्याने असंख्य विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता
आला नाही, त्यामुळे यंदाची प्रवेशसंख्या मागील वर्षाच्या तुलनेत घटली आहे.
ऑयडॉलमध्ये जूनअखेरीस प्रवेशाला सुरुवात झाली असून, मोफत प्रवेशासाठी १६ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र संकेतस्थळात अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्याने केवळ ४० हजारांच्या दरम्यानच विद्यार्थ्यांनी पदवी, पदव्यूत्तर आदी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यातील केवळ २२ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. त्यामुळे या प्रवेशास किमान महिनाभराची मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.
आयडॉलच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या तक्रारी समोर येत असल्या, तरी संबंधित प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत आणि योग्य माहिती असलेले कर्मचारी उपलब्ध करण्यात आलेले नसल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक कर्मचा-यांना कंत्राटी आणि प्रवेशासंदर्भात अधिक माहिती नसल्यानेही विद्यार्थ्यांना अधिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष अमोल मातेले यांनी सांगितले. अनुसूचित जाती, जमातींच्या विद्यार्थ्यांना मिळणा-या शिष्यवृत्तीच्या संदर्भातही आयडॉलकडून कोणत्याही प्रकारची योग्य माहिती देण्यात येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी संचालक डॉ. हरीचंदन यांच्याकडे तक्रारी नोंदवूनही त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याचे सांगण्यात येते.
मागील वर्षी तीन टप्प्यांत प्रवेश
आयडॉलमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह विविध ३४ अभ्यासक्रम आहेत. यात बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. या अभ्यासक्रमांच्या पाच शाखा, तर पदव्युत्तरच्या एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी., एम. सीए., पीजीडीएफएम., पीजीडीओआरएम. या अभ्यासक्रमांच्या ११ शाखांच्या विविध विषयांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होते. मागील शैक्षणिक वर्षात आयडॉलसाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यांत पूर्ण झाली होती. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून तब्बल ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.