भुजबळांविरोधात माफीचे साक्षीदार व्हा, असे सांगून या अधिका-यांवर पोलिसांकडून दबाव टाकला जात आहे. आम्ही कोणत्याही कामात अनियमितता केलेली नाही.
मुंबई – भुजबळांविरोधात माफीचे साक्षीदार व्हा, असे सांगून या अधिका-यांवर पोलिसांकडून दबाव टाकला जात आहे. आम्ही कोणत्याही कामात अनियमितता केलेली नाही. आमच्यावरील सर्व आरोप चुकीचे व बिनबुडाचे असून भुजबळ कुटुंबीय निर्दोष असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी राज्यातील भाजपा सरकारने भुजबळ कुटुंबीयांभोवती ‘ईडी’कडून (अंमलबजावणी संचलनालय) चौकशीचा ससेमिरा लावला आहे. यावर बोलताना, ‘केंद्र व राज्यातील भाजपा सरकार ठरवून भुजबळ कुटुंबीयांविरोधात हालचाली करत असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला.
अमेरिका दौ-यावरून परतल्यानंतर मुंबई विमानतळावर समर्थकांचे विराट शक्तिप्रदर्शन घडवणा-या भुजबळांनी राज्यातील फडणवीस सरकारवर विविध आरोपांचा बॉम्बगोळाच टाकला आहे. आपण सर्व प्रकारच्या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत असताना केवळ सुडबुद्धीने पुतण्या समीरला अटक व्हावी, हे योग्य नसल्याचे भुजबळ म्हणाले.
आपण कुठेही पळून गेलेलो नव्हतो. पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही. जर एखाद्याला पळूनच जायचे असते तर आमच्याविरोधात गेल्या जूनमध्ये ‘ईडी’ने एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर इतके दिवस वाट पाहिली असती का? असा सवालही त्यांनी केला. आपण अमेरिकेतील संसद सदस्यांच्या नोंव्हेबर २०१५ मध्ये नियोजित कार्यक्रमासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच गेल्याचे भुजबळ यांनी यावेळी पुराव्यांसह सांगितले.
३१ जानेवारीच्या रात्री निघालो व दुस-या दिवशी लगेच पुतण्या समीर भुजबळ याला अटक होते. हे चुकीचे झाले. कारण समीर या सर्व चौकशांना पूर्ण सहकार्य करत होते. त्यांच्याकडे पंधरा वर्षापूर्वीपासूनचे हिशेब ‘ईडी’ने मागितले. हिशेब सादर करण्यासाठी त्यांनी थोडा वेळ मागितला. गेल्या २८ जानेवारी रोजी समीरने ‘ईडी’ला पत्र पाठवले की हिशेब तयार आहेत. मात्र ‘ईडी’च्या अधिका-यांनी त्यानंतरही त्यांना अटक केली. याबद्दलही भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. समीर व पंकज भुजबळांनी ज्या कंपन्या काढल्या त्यात कोणताही ‘मनी लाँडरिंग’चा भाग नाही.
तो नियमानुसार व सर्वत्र होणारा आर्थिक व्यवहार आहे. ८७० कुठले? सर्व मिळून त्या इमारत बांधकामात दोनशे कोटीही नसतील व जेव्हा इमारती पूर्ण होतील तेव्हा काय तो पाच दहा टक्के फायदा होईल, असा दावा भुजबळ यांनी यावेळी केला. महराष्ट्र सदन, आरटीओ इमारती व कलिना येथील लायब्ररीचे बांधकाम प्रकरणात भुजबळ, समीर भुजबळ व पंकज भुजबळांसह अनेकांविरोधात तीन ‘एफआयआर’ दाखल करण्यात आले आहेत. याची सविस्तर माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली. अंधेरीमधील आरटीओ इमारत व परीक्षण ट्रॅक बांधून देण्याचा प्रस्ताव ‘एसआरए’साठी २००३-०४ पासून सुरू होते. ते दोन तीन वेळा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखालील पायभूत सुविधा उपसमितीकडे गेले. तेथे कोणताही विषय जातो त्या आधी वित्त व नियोजन नगरविकास, महसूल, गृह आदी संबंधित विभागांकडून तपासूनच जातो. आधी मुख्यमंत्र्यांची समिती प्रशासकीय मान्यता देते नंतरच टेंडरलाही त्यांचीच मान्यता असते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या सर्व प्रकरणात वृत्तपत्रातून ‘क्लीन चिट’ आल्यानंतर फडणवीस सरकारने संबंधित अधिका-यांवर आकसाने कारवाया केल्या आहेत. हे सारे ठरवून चालले आहे. ज्या फाईलींचा सहा महिने अभ्यास करून क्लीन चिट दिली गेली ती फाईल सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे महिनाभर होती. नंतरच त्यांनी स्वाक्षरी केली. माझ्याविरोधात माफीचा साक्षीदार व्हा, असा दबाव पोलिसांच्या माध्यमातून या अधिका-यांवर टाकला जात असल्याचा गंभीर आरोपही भुजबळ यांनी यावेळी केला. इतर पक्षांतील नेतेही माझ्या मागे उभे राहिले, असे ते म्हणाले. मात्र शिवसेनेतील कोणी तुम्हाला फोन केला, यावर ही गोष्ट पडद्याआड आहे ती पडद्याआडच राहू द्या, असे त्यांनी मश्किलपणे सांगितले.
विमानतळावर शक्तिप्रदर्शन
अमेरिकेतून मुंबईत परतलेल्या छगन भुजबळ यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई विमानतळावर त्यांच्या समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. या गर्दीला आवरणे पोलिसांनाही कठीण होऊन बसले होते. नाशिक, येवला परिसरातून आलेल्या भुजबळ समर्थकांनी फडणवीस सरकारच्या सुडबुद्धी राजकारणाचा निषेध नोंदवला. आम्ही केवळ भुजबळ साहेबांना पाठिंबा देण्यासाठी येथे आलो आहोत, असेही अनेकांनी सांगितले. भुजबळांनी विमानतळावर उतरल्यानंतर आपल्या समर्थकांशी संवाद साधतांना त्यांना शांत राहण्याचे आवाहनही यावेळी केले.
कारवाई सूडबुद्धीने
केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाचा वर्षभरात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये सलग पराभव झाल्याने त्यांच्यात कमालीचे नराश्य आले आहे. त्यामुळे भाजपा सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात सुरू असलेली कारवाई ही याच सूडबुद्धीचे ज्वलंत उदाहरण असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. काँग्रेसच्या गांधी भवन येथील कार्यालयात मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध यापूर्वीच्या राज्यपालांनी खटला चालवण्याची परवानगी नाकारली आहे. तरीही राजकीय दबाव आणून सरकारने सीबीआयला पुन्हा परवानगी मागण्यास भाग पाडल्याचेही विखे-पाटील म्हणाले.