नवी दिल्ली – भारतीय रेल्वे गेल्या काही वर्षामध्ये वेळापत्रकापेक्षा अत्यंत उशिरा धावत असल्याचे दिसत आहे. २०१७-१८ या वर्षी ३० टक्के ट्रेन उशिरा धावल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल २०१७ – मार्च २०१८ या कालावधीमध्ये केवळ ७१.३९ टक्के फे-याच वेळेवर झाल्या. त्या आधीच्या वर्षापेक्षा म्हणजे २०१६-१७ या वर्षी ७६.६९ टक्के इतक्याच फे-या वेळेनुसार झाल्या होत्या. कॅगला मात्र भारतीय रेल्वेच्या मंदयाळीचे कारण समजले आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅगने भारतीय रेल्वेमध्ये होत असलेल्या विविध गोंधळाच्या बाबी उजेडात येत आहेत. केंद्र सरकारने घोषित केलेल्या स्थानकांच्या पुनर्विकास योजनेतील त्रुटींमुळे हा उशीर होत असल्याचे कॅगचे म्हणणे आहे. या योजनेमुळे स्थानकांवर रेल्वे थांबण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही व त्यामुळे वेळापत्रक कोलमडते.
कॅगने यासंदर्भात संसदेत अहवाल सादर केला. त्यात कॅगने निरीक्षणे नोंदवली आहेत. २४ डब्यांच्या रेल्वे थांबतील अशी स्थानकांवर पुरेशा प्लॅटफॉर्म्सची सुविधा नाही तसेच वॉशिंग पिट लाइन्स आणि स्टॅबलिंग लाइन्स नसल्यामुळेही रेल्वेला उशीर होतो असे मत कॅगने नोंदवले आहे. कॅगने भारतीय रेल्वेच्या १० विभागांपैकी १५ स्थानकांचा अभ्यास केला.
गेल्याच आठवडय़ात या प्रकारेच आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली होती. २०१४ साली पाठवलेले खत रेल्वेने संबंधित स्थळी २०१८ साली पोहोचवले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मालगाडीतून उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी खत पाठवले गेले. २०१४ मध्ये ही मालगाडी तेथून निघाली. तिला १४०० किमी अंतर पार करून बस्ती येथे जायचे होते. या खताची किंमत १० लाख इतकी होती. बस्ती येथे खताची डिलिव्हरी झाली नसल्याचे लक्षात येताच भारतीय रेल्वेशी संपर्क करण्यात आला.
मात्र रेल्वेला हे डबे शोधता आले नाहीत. हे डबे भारतभर एका स्टेशनमागे दुस-या स्टेशनमध्ये फिरत राहिले आणि शेवटी ३.५ वर्षानी बस्ती येथे पोहोचले आहेत. यामधील सर्व खत खराब झाले असून त्याचे मालक रामचंद्र गुप्ता यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला आहे. आपण गेली साडेतीन वर्षे रेल्वेकडे चौकशी केली मात्र रेल्वेने कोणतेही उत्तर दिले नाही.