सिंधुदुर्ग जिल्हयात १० ते ३० मे कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा आशावर्कस् युनियनच्या माध्यमातून तालुक्याच्या प्रत्येक तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
मालवण- सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स् (सीटू) ने केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभर ‘मे दिन ते सीटू स्थापना दिन’ या कालावधीत श्रमिक जागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हयात १० ते ३० मे कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा आशावर्कस् युनियनच्या माध्यमातून तालुक्याच्या प्रत्येक तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याप्रमाणे शुक्रवारी मालवण तहसील कार्यालयावर मोर्चा काढून केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध करणारे निवेदन तसेच आशा व गटप्रवर्तक यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यासाठी मागणी करण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या अध्यक्षा अर्चना धुरी, जिल्हा सचिव विजया राणे-पाटील, विजया घाडीगांवकर, समिधा गांवकर, अदिती धुरी, शामल आईर, प्रीती कदम, रुपाली धुरी, गौरी सुकाळी, समीक्षा शिंदे आदी सभासद यावेळी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनामध्ये २०१५-१६ च्या आर्थिक अर्थसंकल्पात विकास व रोजगाराच्या नावाखाली राष्ट्रीयीकृत उद्योग सेवा, कृषी क्षेत्रावर अन्याय करण्यात आला असून जनता व राष्ट्राच्या मालकीची संसाधने व संपत्ती यांची खुलेआम लूट करण्याचे परवाने विदेशी भांडवलदार व मोठया व्यापा-यांना देण्यात आले आहेत. याला विरोध दर्शविण्यात आला आहे.
तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान कोणत्याही परिस्थितीत कायमस्वरूपी करा, आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य सेवक म्हणून सामावून घेतानाच आशांना ७ हजार रुपये व गटप्रवर्तकांना १० हजार रुपये मासिक मानधन द्या. अभियानातील निधीमध्ये दुप्पट वाढ करा. कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर यांच्या मुळावर उठणारे धोरण बंद करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.