महापौर आणि आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला.
मुंबई- केईएम रुग्णालयातील तीन निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकांकडून झालेल्या मारहाणीनंतर मागील दोन दिवसांपासून पुकारण्यात आलेला संप रविवारी अखेरीस डॉक्टरांनी मागे घेतला.
मारहाण करणा-या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आणि ते कामावर रुजू झाले. मात्र डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर विपरीत परिणाम दिसून आला होता.
अबू सुफिया या साडेतीन वर्षाच्या मुलाला डेंग्यूची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी लोखंडी सळईने डॉ. सुहास चौधरी यांच्यावर हल्ला चढवला होता. या मारहाणीत त्यांच्या पाठीला व हाताला दुखापत झाली.
डॉ. चौधरीं यांना सोडविण्यासाठी गेलेल्या डॉ. कुशल व डॉ. पुनित गर्ग यांनाही नातेवाइकांनी मारहाण केली. या दोन्ही डॉक्टरांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यात गेल्या दोन महिन्यांत आठ वेळा डॉक्टरांना मारहाणीच्या घटना घडल्या असून त्यासाठी जबाबदार असणारे लोक मोकाटच आहेत. त्यांच्यावर कोणत्याही कायद्याचा धाक उरलेला नाही.
याशिवाय इंदापूर व नाशिकमध्येही डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकांकडून मारहाण झाल्याची घटना घडली. या हल्लेखोरांना पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. तसेच या घटना ताज्या असताना केईएम रुग्णालयात झालेल्या प्रकारानंतर दोघा आरोपींना अटक करून जामिनावर त्यांची सुटका करण्यात आलेली आहे. यावर तीव्र आक्षेप नोंदवून मारहाण करणा-या आरोपींना अटक होईपर्यंत संप सुरूच राहील, अशी ठाम भूमिका घेऊन डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले होते.
रुग्णालयातील घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने लगेच भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली. याशिवाय रुग्णालयात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून १४५ सीसीटीव्ही कॅमेरे, २१ वॉकीटॉकी व सुरक्षारक्षक वाढविण्याची मागणी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी केली. मात्र, तरीही यावर समाधान न झाल्याने डॉक्टरांनी संप सुरूच ठेवला.
संपाच्या दुस-या दिवशी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली. भेटीदरम्यान डॉक्टरांवर होणा-या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केईएम रुग्णालयात येत्या ३० ऑक्टोबपर्यंत महत्त्वाच्या ३२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील व चारही हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करू, असे आश्वासन दिले.
परंतु डॉक्टरांनी लेखी आश्वासनावर संप मागे घेतला नाही. मात्र, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून २९ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर डॉक्टरांनी लगेच संप मागे घेतला.