महाराष्ट्र राज्याचे हरितक्रांतीचे प्रणेते आणि शेतक-यांना फलोत्पादनातून आर्थिक उन्नती निर्माण करण्याचा मार्ग दाखवणारे धोरणी व कर्तबगार माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा १ जुलै हा जन्मदिवस, दरवर्षी कृषिदिन म्हणून साजरा केला जातो. जून महिन्यात झालेल्या पावसामुळे दरवर्षी या दिवशी राज्यातले वातावरण हिरवेगार असते. सगळीकडे नवतेचे वारे वाहायला लागतात.. पण यावर्षी सारे काही भकास आहे. दडी मारलेल्या पावसाच्या चिंतेमध्ये मंगळवारी राज्यात ठिकठिकाणी कृषिदिनाचे कार्यक्रम झाले. या पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीचा आपण सर्वानीच गांभीर्याने विचार करायला हवा!
राज्यभर मंगळवारी कृषीदिनाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राज्य सरकारच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागातर्फे जिल्ह्यातील शेतक-यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यामध्ये कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, कृषी क्षेत्रातील अभ्यासक आणि कृषी विकासामध्ये योगदान दिलेले शेतकरी उपस्थित होते. पण या मेळाव्याचे आयोजन होते ते केवळ सोपस्कार म्हणून केले जाते. तसे होता कामा नये. भविष्याच्या दृष्टीने शेतक-यांपर्यत समस्यांची उकल पोहोचायला हवी. शेतक-यांनीही सजग व्हायला हवे.
दोन वर्षापूर्वी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये १ कोटी ७ लाख वृक्ष संगोपन प्रक्रिया पूर्ण केल्याचे प्रशासनाने जाहीर केले. ती झाडे आज हयात आहेत का? हा खरा प्रश्न आहे.
आपण जिल्ह्याच्या फलोत्पादनातून पर्यटन विकासाकडे वाटचाल करत आहोत. या मागची पार्श्वभूमी आणि शेतक-यांना लाभदायी ठरणा-या फलोत्पादनाची निकड समजावून देण्याची गरज आहे. शेतक-यांची आर्थिक उन्नती वाढवणे, पर्यावरणाचा होणारा -हास थांबवणे अशी यामागील उद्दिष्टेही ठेवण्यात आलेली आहेत. मात्र, त्यांची किती पूर्तता होते, याचे आत्मचिंतन व्हायला हवे. महाराष्ट्र राज्यामध्ये १९७० पासून हरितक्रांतीला सुरुवात झाली. यामागे दूरदृष्टी ठेवून राज्याचा कारभार सांभाळणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान होते. त्याचेच हे फलित आहे, अशी यामागची पार्श्वभूमी आहे. १९७० ते ७३ या कालावधीमध्ये राज्यात ३ वष्रे दुष्काळ पडला. या दुष्काळावर मात करण्याचे आव्हान तत्कालीन सरकारच्या समोर होते. ५० लाख दुष्काळग्रस्त शेतक-यांना व भूमिहीन शेतमजुरांना उत्पादक रोजगार मिळवून देण्याची महत्वाकांक्षी योजना वसंतराव नाईक यांनी रोजगार हमीच्या स्वरूपात राज्यात राबवली. मागेल त्याला काम देण्याची हमी या योजनेतून त्यांनी राज्याला दिली. या योजनेची उपयुक्तता लक्षात घेऊन भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार व भूमिहीन रोजगार हमी योजना अंमलात आणल्या. या योजना प्रत्यक्षात येण्यामागे नाईक यांची दूरदृष्टी कारणीभूत होती. वसंतराव नाईक त्यावेळी पंचायत राज निर्मितीच्या समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार १९६२ मध्ये पंचायती राज पद्धती महाराष्ट्रात सुरू झाली. जिल्हा नियोजन पद्धतीसुद्धा अर्थात जिल्हा नियोजन समिती त्यांच्याच कारकीर्दीमध्ये सुरू झालेली आहे. जिल्हा व तालुका पातळीवर पंचायत राज निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य म्हणून नावलौकिकास आले. त्यापासून प्रेरणा घेऊन देशामध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू झाली.
पुरोगामी महाराष्ट्राचे जनक पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांना शेतक-यांबद्दल फार आपुलकी होती. त्यांच्या सर्वागीण विकासासाठी अनेक योजना त्यांनी प्रत्यक्षात आणल्या. शेतक-यांच्या हिताचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. राज्यात कापूस एकाधिकार योजना, ज्वारी, गहू, भात या अन्नधान्य पिकांसाठी आधारभूत किमती या योजनाही त्यांनीच सुरू केल्या. महाराष्ट्रात कृषी, औद्योगिक समाजरचना निर्माण करण्यासाठी सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या अशा प्रकारच्या कृषी उद्योगांना त्यांनी सदैव प्रोत्साहन दिले. विज्ञानामुळे शेतक-यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यास मदत होईल, या दृष्टीने शेतीविषयक संशोधनाचे महत्त्व सर्वप्रथम त्यांनी लक्षात घेतले. त्यासाठीच शेतक-यांना शेतीचे शास्त्रीय शिक्षण मिळावे व त्यायोगे राज्यात अन्नधान्याचे उत्पादन वाढावे आणि पर्यायाने सर्वसामान्य शेतक-यांचे जीवनमान सुधारण्यास मदत व्हावी यासाठी त्यांनी राज्यात ४ कृषी विद्यापीठांची स्थापना केली. यात कोकणसाठी दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ साकारले.
त्यांनी घालून दिलेल्या कृषी आणि फलोत्पादन विकासाच्या मार्गावरून आपला शेतकरी चालला तर कोटय़वधींच्या वृक्ष लागवडीतून प्राप्त होणा-या फळांच्या उत्पादनातून अब्जावधी रुपयांची आर्थिक सुबत्ता राज्यात निर्माण होईल. यात सिंधुदुर्ग जिल्हा अग्रभागी असला पाहिजे. या उदात्त हेतूने शेतक-यांनी आपल्या बांधापासून पडीक जमिनींमध्ये फलोत्पादन देणारी वृक्ष लागवड केली पाहिजे आणि आर्थिक सुबत्ता निर्माण केली पाहिजे. खरे तर शेती वाचली तरच आपण वाचणार आहोत; हे लक्षात घ्यायला हवे.
आज पावसाने ओढ दिली आहे. उभी शेती करपून गेली आहे. देवाला जलाभिषेक करुन साकडे घालण्यात येऊ लागले आहे. पावसाला विनवणी सुरू आहे. येरे बाबा. अजून अंत पाहू नको.. असे सांगताना त्याला खूश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जनता पावसाच्या या अनियमिततेने हबकून गेली आहे. पण एकदा तो आला की ‘पाणी वाचवा..झाडे जगवा’ या कडे नेहमीच दुर्लक्ष होते. हे पुढचे संकट येईपर्यंत शेतकऱ्याच्या लक्षातच येत नाही. शेती यंत्रयुगाकडे वळत असताना सजग शेतकरी होण्याचा संकल्प करायला हवा. हीच काळाची गरज आहे.